संसारात राहून साधना करत भावभक्तीचा आदर्श निर्माण करणारे संत सावता महाराज !

संत सावता महाराज यांची आज पुण्यतिथी, त्या निमित्ताने…

संत सावता महाराज

संत सावता महाराज आपल्या मळ्यात भाजी आणि इतर बागाईत करतांना प्रभूच्या नामस्मरणात इतके रममाण होई की, त्यांना प्रभुकर्म करतांना आत्मानंदाचीच अनुभूती येई. तेव्हा त्यांना प्रभुचे दर्शन होत असे.’ – प.पू. परशराम पांडे महाराज

कांदा, मुळा भाजी । अवघी विठाई माझी ॥
लसण मिरची कोथंबिरी । अवघा झाला माझा हरि ॥
स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातो हात ॥
सावत्याने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥

संसारातील कर्तव्ये विठ्ठलरूप स्मरून करत रहाणे; यालाच संत सावता महाराज ‘कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।’ म्हणतात.

संत सावता महाराज यांच्या समाधी मंदिरातील स्वयंभू विठ्ठल मूर्ती ! हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विठ्ठलाकडे बळ मागूया !
संत सावता महाराज यांच्या समाधी मंदिराचा चैतन्यमय कळस
अरण, ता. माढा, जि. सोलापूर येथील संत सावता महाराज यांच्या मूळ समाधीचे स्थान. त्यांच्या मूर्तीला भावपूर्ण नमस्कार करूया !

सावत्या माळ्याने हो, माळ्याने लाविला मळा ।
प्रेमभक्तीचा मळा लावूनी नाम ठेविले ‘विठ्ठल’ मळा ॥

संत सावता महाराजांचा अरण गावातील हाच तो मळा !

संत सावता महाराज (संत सावता माळी) यांचा काळ वर्ष १२५० ते १२९५ चा आहे. सावता माळी हे ‘कर्तव्य आणि कर्म करीत राहणे, हीच खरी ईश्‍वरसेवा’, अशी प्रवृत्तीमार्गी शिकवण देणारे संत ! वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले.

फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय ! ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात. ‘ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतांनाच काया-वाचे-मने ईश्‍वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असे ते म्हणत. धार्मिक प्रबोधनाचे आणि ईश्‍वरभक्तीच्या प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने अन् ‘व्रत’ म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यांतील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग सध्या उपलब्ध आहेत.

अरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे आषाढ कृष्ण पक्ष चतुर्दशी, शके १२१७ (१२ जुलै १२९५) या दिवशी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा विशेष रूपाने त्यांना भेटावयास येत असते.

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ भारतभर भ्रमण करून प्राचीन वास्तू, गड आणि संग्राह्य वस्तू यांच्या छायाचित्रांचा संग्रह करत आहेत. त्यामुळेच आपल्याला या प्राचीन वास्तूंचे, तसेच संतांच्या मंदिरांचे घरबसल्या दर्शन मिळते. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात