प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज – हिंदु राष्ट्र-स्थापनेचे आदर्श

वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. तथापि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना असे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण संतांमध्ये काळाच्या पडद्याआड पहाण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच अशा द्रष्ट्या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, हीच आपली साधना आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता आहे. यासाठी ६ डिसेंबर २०१६ या दिवसापासून ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या नियमित सदरास आरंभ करत आहोत. आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर श्री हनुमंताचा वाटा उचलण्याची प्रेरणा यातून मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !

 

१. प्रभु श्रीराम

‘आज लाखो वर्षे उलटली, तरी श्रीरामाचे राज्य लक्षात रहाते; कारण ते सर्वाधिक आदर्श राष्ट्र होते. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या तुलनेतच प्रभु श्रीरामाचे आदर्शत्व खालील सूत्रांवरून सहज लक्षात येईल.

१. कुठे जनतेच्या एकाही तक्रारीची दखल न घेणारे सध्याचे राज्यकर्ते, तर कुठे एका धोब्याच्या (परिटाच्या) चुकीच्या तक्रारीचीही नोंद घेऊन ‘निर्दोष’ पत्नीचा त्याग करणारा आदर्श राजा श्रीराम !

२. कुठे धर्माचरण न करणारे आणि धर्माच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन करणारे सध्याचे राज्यकर्ते, तर कुठे धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्याने ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणून ओळखला जाणारा आदर्श राजा श्रीराम !

३. कुठे प्रत्येक निवडणुकीत जनतेला विकास करण्याची वचने देऊन ती न पाळणारे सध्याचे राज्यकर्ते, तर कुठे ‘एकवचनी’ म्हणून इतिहासात अजरामर झालेला आदर्श राजा श्रीराम !’

४. कुठे भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊनही सत्तेची खुर्ची न सोडणारे सध्याचे राज्यकर्ते, तर कुठे प्रथम अयोध्या, मग किष्किंधा आणि नंतर लंकेचे राज्य दुसर्‍यांसाठी सोडणारा विरक्त वृत्तीचा आदर्श राजा श्रीराम !

५. कुठे अनारोग्याच्या समस्येवर उपाय न काढणारे सध्याचे राज्यकर्ते, तर कुठे जनतेला रोग अन् अपमृत्यू नसलेले ‘रामराज्य’ देणारा आदर्श राजा श्रीराम !

६. ‘कुठे घुसखोरांना मोकाट सोडून देशाच्या चारही सीमा असुरक्षित करणारे, शत्रूराष्ट्राकडून कूटयुद्धात पराभूत होणारे आणि नक्षलवादी अन् आतंकवादी यांच्याकडून प्रतिदिन हरणारे सध्याचे राज्यकर्ते, तर कुठे शत्रूच्या (रावणाच्या) राज्यात जाऊन त्याचा नाश करणारा आणि अश्‍वमेध यज्ञासाठी दिग्विजय करणारा आदर्श राजा श्रीराम !’

७. कुठे भ्रष्टाचार करून जनतेचे कुपोषण करणारे सध्याचे राज्यकर्ते, तर कुठे प्रजेला हितकारक असलेले सर्वच दृष्ट्या समृद्ध आणि आदर्श ‘रामराज्य’ देणारा आदर्श राजा श्रीराम !’ असे प्रभु श्रीराम हेच खरे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे आदर्श ठरतात.’ (५.२.२०१२)

२. छत्रपती शिवाजी महाराज

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी ‘हिंदवी स्वराज्या’चे जे ध्येय ठरवले, ते त्यांनी आयुष्यात प्रत्यक्षात साकारून दाखवले. कार्य करतांना यश संपादन करायचे असल्याने पराभूतांचा आदर्श ठेवला जात नाही, तर विजयी विरांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवला जातो, हेच भारतभरातील संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्यामागील तत्त्व आहे.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’)