स्त्री-पुरुष समानता

मंदिरांच्या गर्भगृहात प्रवेश मिळण्याची मागणी

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील काही पुरो(अधो)गामी महिलांनी तथाकथित स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली हिंदूंच्या मंदिरांत बळजोरीने घुसण्याची चळवळ चालू केली आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांवर अन्याय होतो, मंदिरांच्या गर्भगृहात पुरुषांसमवेत स्त्रियांनाही प्रवेश मिळायला हवा, मंदिरात जेथे जेथे पुरुष जातो आणि ज्या ज्या धार्मिक कृती करतो, त्या सर्व ठिकाणी जाण्यास आणि धार्मिक कृती करण्यास स्त्रियांना अधिकार मिळाला पाहिजे. नव्हे तो आमचा हक्कच आहे, असे या पुरो(अधो)गामी महिला प्रसारमाध्यमे, पत्रकार परिषदा, आंदोलने या ठिकाणी सांगू लागल्या. शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्‍वर येथे स्थानिकांचा धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी होणारा सनदशीर विरोध झुगारून आणि खोटेनाटे आरोप करत पुरो(अधो)गामी महिलांनी शेकडो वर्षांच्या धर्मश्रद्धांवर आघात केला. धर्मातील जाणकार त्यांना त्याविषयी शास्त्र सांगत असतांना या (अ)सुधारणावादी महिलांनी तो विषय थट्टेवारी नेला आणि प्रथा-परंपरा मोडण्याचा हट्ट कायम ठेवला. विरोध करणार्‍यांवरच मंदिरातील देवीच्या गर्भगृहात महिलांनाच जाऊ न देणे हा स्त्री-शक्तीचा केवढा मोठा अपमान आहे, नारी शक्तीवर अन्याय आहे, अशी ओरड केली आणि न्यायालयाचा निर्णय, पोलिसी बळाचा वापर यांद्वारे विरोधकांना दडपण्यात आले.

महिला पुजार्‍यांसाठी मागणी

देवीच्या मंदिरांमध्ये महिला पुजारी असणे आवश्यक आहे, कारण तेथे महिलांना पूजा करण्याची संधी न मिळणे, हा देवीचा अपमान आहे. ही मागणी पुरो(अधो)गामी महिलांनी कडून राज्यभरातून केली जाईल असे वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले.

भारतीय स्त्रीचा विचार केल्यास ती सुशिक्षित असण्यासमवेत, सुसंस्कृत, गृहकृत्यदक्ष, मुलांवर संस्कार करणार्‍या स्त्रीचे चित्र डोळ्यांसमोर उभे रहाते. त्यामुळे घरात अशा स्त्रीला लक्ष्मी म्हणून पाहिले जाते. विवाहित स्त्री दोन कुटुंबांना दिशा देते, घडवते अशी भारतीय स्त्रीची ओळख असतांना धर्मपरंपरा मोडणार्‍या या महिला कोणता आदर्श ठेवत आहेत ? कोणते संस्कार भावी पिढीवर करत आहेत ? या पुरो(अधो)गामी महिलांना स्त्री शक्ती म्हणून पहाणे नुसते चुकीचेच ठरणार नाही, तर पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.

स्त्रीवादी साहित्याचा फोलपणा !

पुरोगाम्यांकडून या प्रकारे स्त्रीवादी साहित्याची निर्मिती केली जाते. त्यामुळे सामान्य महिलांची, विद्यार्थ्यांची, तसेच युवक-युवतींची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होतेे. या कवितेतून स्त्रीला इतरांच्या सांगण्याप्रमाणे वागावे लागत असल्याने तिच्यावर अन्याय होत आहे, अशा आशयाचे चित्र वर्णन केले आहे. गोमंतक या दैनिकात प्रसिद्ध झालेली उदय नाईक या तरुणाची ही एक प्रातिनिधिक कविता आहे. समाजात वेगाने फोफावत असलेल्या अशा पोकळ स्त्रीवादी विचारांचे खंडण करणे आवश्यक आहे; कारण हे विचार म्हणजेच योग्य असे वैचारिक क्षमता नसलेल्या समाजाला, नवीन पिढीला, तसेच विद्यार्थ्यांना वाटत रहाते. महाविद्यालयातूनही अशा प्रकारचे साहित्य असलेला अभ्यासक्रम शिकवला जातो. ही एक स्त्रीवादी कविता.

म्हणे तिची जागा तिला ठरवू द्या !
कुणी म्हणाले इथे उभी रहा ।
कुणी म्हणाले तिथे उभी रहा ॥
ती अशी अस्थिर राहिली ।
सात फेरे करतांना भटजी म्हणाला,
नवर्‍याच्या पावलावर पाऊल ठेवीत जा ।
ती बिचारी पावलावर पावलं ।
जुळवण्याची शर्थ करू लागली ।
फोटोग्राफर फोटो काढतांना म्हणाला,
तू जागा चुकलीस ।
नवर्‍याच्या डाव्या बाजूला उभी रहा ॥
कुणी असे कुणी तसं ।
तिची जागा ठरवू लागले ॥
ठरवून दिलेल्या जागेत ।
स्वतःला कोंबून बसवतांना ।
तिची तडफड कुणालाच दिसली नाही ॥
शतकामागून शतकं संपतच आहेत ।
पुरुषार्थाची शेखी मिरवणार्‍यांनो, आता तरी जागे होऊन
तिची जागा तिला ठरवू द्या ॥

प्रत्यक्षात हिंदूंच्या जीवनपद्धतीचा उद्देश आणि धर्माने दिलेले स्त्रियांचे स्थान हे विश्‍वात सर्वोत्तम आहे, हे समजून घेतले पाहिजे. आज पाश्‍चात्त्यांच्या अनिर्बंध जीवनाचा परिपोष झाल्यामुळे पुरोगामी आणि स्त्रीवादी हिंदु धर्मातील पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीवर बंधने लादून अन्याय केला असे समजतात. प्रत्यक्षात धर्मातील बंधने ही स्त्री आणि पुरुष दोघांनाही एक समृद्ध जीवन देतात, हे साधना आणि धर्माचरण केल्यावरच लक्षात येते. देव, धर्म, अध्यात्म आणि साधना यावर विश्‍वास असणार्‍यांचा अशा साहित्यामुळे बुद्धीभेद होऊ नये, यासाठी वरील कवितेचे खंडण करणारी कविता पुढे देत आहोत.

तिची जागा मानाचीच आहे !
कुणी म्हणाले इथे उभी रहा ।
कुणी म्हणाले तिथे उभी रहा ॥
स्थिर मनाने केले तिने आज्ञापालन ।
सात फेरे घालतांना गुरुजी म्हणाले,
नवर्‍याच्या पावलावर पाऊल ठेवीत जा ॥
विवाहाचा अर्थ समजून घेऊन तिने केले धर्मशास्त्राचे तंतोतंत पालन ।
फोटोग्राफर फोटो काढतांना म्हणाला, तू जागा चुकलीस ।
तेव्हा सर्वांच्या आनंदात आनंदी होऊन
जिथे जिथे सांगितले तिथे ती उभी राहिली ॥
कुणी असे कुणी तसे ज्यांनी जे सांगितले ।
त्यांचा मान राखून त्यांचे मन जिंकले ॥
त्यामध्ये तिला काहीच नव्हती अडचण ।
त्यामुळे सर्वांवर झाली प्रीतीची पाखरण ॥
यामुळे तिला झाला अनन्य लाभ ।
वागणे तिचे परेच्छेने आणि झाले मनोलयाने ॥
शतकानुशतके तिने अशीच केली प्रगती ।
त्यातून तिला मिळाली खरी देहमुक्ती ॥
स्त्रीवादाची शेखी मिरवणार्‍यांनो,
धर्माची महती जाणून घ्या ।
धर्मबंधने पाळून स्त्रियांनो आणि
पुरुषांनो, तुमचीही दुःखे करा ॥

– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.