मेवातमधील (हरियाणा) हिंदूंवर होणारे पाशवी अत्याचार !

‘हरियाणामधील मेवात हे मागासवर्गियांचे कब्रस्तान बनले आहे’, ही टिप्पणी आहे निवृत्त न्यायाधीश पवन कुमार यांची ! पत्रकार स्वाती गोयल शर्मा यांच्याशी चर्चा करतांना ‘मेवातमध्ये हिंदूंवर औरंगजेबाच्या काळात झाले होते, तसे अत्याचार चालू आहेत’, अशी प्रतिक्रिया न्यायाधीश पवन यांनी दिली. मे २०२० मध्ये हरियाणामधील नूह जिल्हा म्हणजेच आधीचे मेवात येथील हिंदु मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. यानंतर समिती स्थापन करण्यात आली असून तिचे प्रमुख न्यायमूर्ती पवन कुमार आहेत. त्यांनी प्रत्यक्ष पहाणी केल्यावर काढलेले हे उद्गार अंगावर शहारा आणणारे आहेत. ‘मेवातमधील मागासवर्गियांची स्थिती पहाता पाकिस्तानातील हिंदूंपेक्षाही त्यांची स्थिती भयावह आहे’, असे मतही त्यांनी मांडले आहे.

पंथविशेषाचे (धर्मांधांचे) प्राबल्य असलेले मेवात कायमच अशा दुष्कृत्यांमुळे चर्चेत राहिले आहे. मेवात जिल्ह्यात एकूण ५०० गावे येतात. यांतील १०४ गावांतून हिंदूंना बाहेर पडावे लागले आहे. ८४ गावांत जेमतेम ४-५ या संख्येने हिंदू रहात आहेत. इथे हिंदूंची तक्रार ऐकण्यास कुणाला वेळ नाही. त्यांच्या तक्रारी नोंदवून घेण्यास पोलीस आणि प्रशासन टाळाटाळ करतात, असेही आरोप आहेत. संयुक्त हिंदू संघर्ष समितीचे अध्यक्ष महावीर भारद्वाज यांनी याविषयी ‘ओपीइंडिया’सारख्या संकेतस्थळाशी बोलतांना दिलेली माहिती जाणून घेतल्यास ‘आपण खरेच पाकिस्तानात रहातो कि काय ?’, असा भास व्हायला लागतो ! त्यांच्या सांगण्यानुसार पंथविशेषाकडून महिला आणि त्यातही बालिकांवर बलात्कार होणे, ही मेवातमध्ये नियमित गोष्ट झाली आहे. त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी, असेही कुणास वाटत नसल्याने धर्मांधांना आयते रानच मिळाले आहे.

१. मेवातमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या घटना

अ. वर्ष २०१७ मध्ये मेवात मॉडेल स्कूलमध्ये हिंदूंना धर्मांतर करण्याची बळजोरी करणे, त्यांना नमाज पढायला लावणे असे धक्कादायक प्रकार समोर आले होते. राष्ट्रीय पातळीवर हा विषय उचलून धरला गेल्याने तेथील एक शिक्षक मोईनुद्दिन आणि वॉर्डन यांना बडतर्फ करण्यात आले.

आ. वर्ष २०१८ मध्ये नूहमधील एका १६ वर्षीय युवतीवर गावातील ८ जणांनी बलात्कार केला आणि तिला रक्तबंबाळ अवस्थेत तिच्या घराबाहेर टाकून दिले. या मुलीने नंतर आत्महत्या केली.

इ. वर्ष २०१८ मध्ये झालेल्या आणखी एका घटनेत नगीना खंड गावातील किशन नामक मागासवर्गीय तरुणावर इस्लाम नामक धर्मांध धर्मांतरित होण्यासाठी दबाव टाकत होता. तसे करण्यास त्याने आणि त्याच्या परिवाराने वारंवार नकार देताच इस्लाम आणि त्याच्या मित्रांनी मिळून या कुटुंबावर आक्रमण केले. या वेळी त्या धर्मांधांनी त्यांना जातीवाचक अपशब्द वापरून अवमानित केले.

ई. वर्ष २०१८ मध्येच मेवातमधील घरगुती कलहामुळे घरातून पळून गेलेल्या एका मागासवर्गीय बालिकेला फरझाना नामक महिलेने पळवून मध्यप्रदेशात नेले. तिथे तिला गोमांस खायला घालून धर्मांतर करण्याची बळजोरी केली. इतकेच नव्हे, तर तिला चक्क ४० सहस्र रुपये मूल्याला विकण्याचा घाट घालण्यात आला.

त्याच वर्षी भंडका नामक गावातील एका मागासवर्गीय बालिकेवर ३ तरुणांनी घरात घुसून ती झोपलेली असतांना बलात्कार केला. या वेळी तिने आरडाओरडा करू नये, यासाठी तिच्या तोंडात कापडाचे बोळे कोंबण्यात आले होते.

उ. वर्ष २०१९ मध्ये मेवातमधील एका मागासवर्गीय तरुणीला दोन तरुणांनी पळवून नेले आणि तिच्यावर काही जादूटोणा वगैरे प्रयोग केले अन् नंतर धर्मांतर करण्यास दबाव टाकला, अशीही घटना समोर आली होती. ही घटना उघडकीला येताच या लव्ह जिहादविरुद्ध आंदोलन म्हणून गुरुग्राम-अलवार राष्ट्रीय महामार्ग ११ घंटे रोखून धरण्यात आला होता.

ऊ. फेब्रुवारी २०२० मध्ये याच मेवातमधील एका विवाहित महिलेने तिच्यावर कित्येक काळ सामूहिक बलात्कार होत असल्याची तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनुसार सामूहिक बलात्कार करणार्‍यांनी या कृत्याचे चित्रीकरण करून कुठेही वाच्यता वा तक्रार केल्यास ते जगजाहीर करण्याची धमकी दिली होती.

ए. मेवात आणि परिसरात बकरीशी संभोग (बलात्कार) करणे, ही अत्यंत सामान्य गोष्ट झाली आहे. असे कित्येक प्रसंग आजवर समोर आले आहेत.

२. हिंदूंवर होणारा अन्याय हृदय हेलावून टाकणारा आणि चीड निर्माण करणारा

वर दिलेली दुष्कृत्यांची सूची ही केवळ समोर आलेल्या घटना आहेत. आजवर आणखी किती अत्याचार या भागातील माता-भगिनींना सहन करावे लागले असतील, याची कल्पनाही करवत नाही. स्वतंत्र भारतात आणि धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचा स्वीकार झाल्यावरही हे विदारक दृश्य नजरेस पडत असल्यास काय म्हणावे ? या सार्‍या अत्याचारांची नीट चौकशी व्हावी; म्हणून ‘हरियाणा श्री वाल्मीकि महासभे’ने चौकशी समितीला निमंत्रण दिले होते. न्यायमूर्ती पवन कुमार यांनी तक्रार ऐकून घेण्यास ४८ पीडितांना बोलावणे धाडले होते. त्यांपैकी केवळ १९ जणच त्यांना भेटायला आले; इतकी दहशत अन्य पीडितांमध्ये होती. हे सारे चित्र हृदय हेलावून टाकणारे आणि चीड निर्माण करणारे आहे.

कुठे अमेरिकेत एक जॉर्ज फ्लॉईड वर्णद्वेषाचा शिकार होताच जगभरात ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ म्हणत निदर्शने चालू होतात, तर कुठे वर्षानुवर्षे मेवातमधील माता-भगिनी हा पाशवी अत्याचार सहन करत असूनही त्याविषयी कुणी बोलण्यास-लिहिण्यास सिद्ध होत नाही.

३. मेवातमधील मागासवर्गीय हिंदू देशोधडीला लागत असल्याचे विदारक चित्र !

कोणे एकेकाळी, कोणे एका सांगोवांगीवर, कोण्या एका ज्ञातीने कसे अत्याचार केले, यावरून कढ काढणारे बोरूबहाद्दर आजच्या काळी, वर्तमानात मागासवर्गियांवर चालू असलेल्या या अन्यायाविषयी अवाक्षरही काढत नाहीत. तसे बोलणे त्यांच्या भूमिकेला तडा देणारे असते का ? कि अत्याचारी कोण आहे ? त्याचा पंथ-जात पाहून मगच भूमिका घेण्याची घृणास्पद मानसिकता आम्ही इतकी अंगी बाणवली आहे की, मेवातमधील अत्याचार आम्हाला दिसेनासे झाले आहेत ? अत्याचारांतही सोयीस्करपणा पहाणारी आणि मग बोलणारी दांभिकता पाहून मन विषण्ण होते. एकेकाळी याच दांभिकतेमुळे काश्मिरी हिंदु पंडितांना स्वतःची घरेदारे सोडून आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगणे नशिबी आले.

आज मेवातमधील मागासवर्गीय हिंदु बांधवही तसेच देशोधडीला लागत असल्याचे विदारक चित्र आहे. अत्याचारी मग तो कोणत्याही पंथ-जातीचा का असेना, गुन्हा सिद्ध होताच अन्य कोणत्याही दबावाला बळी न पडता त्याला शिक्षा दिली, तरच हे चित्र पालटेल आणि मेवातमधील माता-भगिनींना न्याय मिळेल !

– व्याख्याते आणि लेखक वैद्य परीक्षित शेवडे, डोंबिवली

(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, २१.६.२०२०)

हिंदु जनजागृती समितीने मेवातमधील घटनांना वाचा फोडणे !

वर्ष २०१३ मध्ये मेवातमधील या सार्‍या अत्याचारांना हिंदु जनजागृती समितीने वाचा फोडली होती. त्यांच्या निरीक्षणानुसार मेवातमध्ये तबलिगी जमातच्या लोकांचा मोठा दबदबा आहे. हेच लोक येथील जनतेला लव्ह जिहाद, धर्मांतर, जिहाद अशा विविध मार्गाने भडकावत असतात. सामाजिक अशांतता निर्माण होण्याकडे त्यांचे सतत लक्ष असते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​