-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे हिंदु राष्ट्रासाठी बलीदान देण्याचा संकल्प करा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
-
नरवीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर शिवा काशीद यांच्या वंशजांची उपस्थिती

पावनखिंड (जिल्हा कोल्हापूर) – छत्रपती शिवाजी महाराज नेहमी युद्धसज्ज होते, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात पूर्णत: स्वत:चे तंत्र विकसित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे ‘अटक ते जिंजी’ असे १ सहस्र ५०० किलोमीटर पसरले होते. शिवछत्रपतींचे कार्य इतके महान आहे की, त्यांना ‘चक्रवर्ती सम्राट’ ही पदवी शोभून दिसेल. नरवीर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू यांच्यासह शिवछत्रपतींच्या अनेक मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी प्राणत्याग केला. तोच आदर्श समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे हिंदु राष्ट्रासाठी बलीदान करण्याचा संकल्प करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.


हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तिथीप्रमाणे, म्हणजे ३० जुलै या दिवशी पावनखिंड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. भर पावसात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांमध्ये नवचेतना जागृत झाली, इतिहासाचे स्मरण झाले आणि देण्यात आलेल्या घोषणांमुळे सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वंदनीय उपस्थितीसह बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज श्री. नीलेश देशपांडे आणि श्री. संदेश देशपांडे, तसेच सरदार कमळोजी साळुंखे यांचे वंशज श्री. सुहासदादा साळुंखे, वीर शिवाजी काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांची विशेष उपस्थित होती. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नाटोली-सागाव (बत्तीसशिराळा) येथील धारकरी श्री. संजय पाटील यांनी म्हटलेल्या ध्येयमंत्राने आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

या प्रसंगी श्री. आनंदराव काशीद म्हणाले, ‘‘या खिंडीमध्ये असंख्य मावळ्यांचे बलीदान झाले आहे. आपण मावळ्यांकडून प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे इतिहास जगून दाखवला पाहिजे.’’
उपस्थित मान्यवर – मलकापूरच्या नगराध्यक्ष सौ. रश्मी कोठावळे, नगरसेवक श्री. महेश कोठावळे, गजापूर (पांढरेपाणी) येथील सरपंच श्री. चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभुते, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, महिला आघाडीच्या शिलाताई माने, ‘आरोग्य भारती’च्या वैद्या अश्विनी माळकर, हिंदुत्वनिष्ठ रमेश पडवळ आणि श्री. चारुदत्त पोतदार, उद्योजिका सौ. मनीषा वाडीकर, मलकापूर येथील पुरोहित श्री. सुहास जोशी, ‘मराठा तितुका मेळवावा’चे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. महेंद्र अहिरे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांच्यासह अनेक मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ, आजूबाजूच्या गावांतून आलेले अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
संघर्षाविना हिंदु राष्ट्र मिळणे अशक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी ज्याप्रमाणे लढून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्याप्रमाणे आजही आपल्याला हिंदु राष्ट्र संघर्षाविना मिळणे अशक्य आहे. मावळे ज्याप्रमाणे लढतांना नेहमी ‘हर हर महादेव’चा घोष करत, त्याचप्रमाणे आपणही रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिदिन ‘श्रीराम जय राम जय जय राम’चा जप केला पाहिजे.
क्षणचित्रे
१. समारोपप्रसंगी सर्वांनी ‘हिंदु राष्ट्र’स्थापनेची शपथ घेतली. या वेळी ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’सह अन्य घोषणा देण्यात आल्या.
२. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभाग असलेले कमळोजी साळुंखे यांनी वापरलेली तलवार, तसेच शिवकालीन पट्टा उपस्थितांना दाखवण्यात आला. हा ऐतिहासिक ठेवा या मोहिमेसाठी आणण्यात आला होता.
३. ‘मराठा तितुका मेळावावा’चे श्री. अनिश पोतदार यांनी १०७ वेळा रक्तदान केल्याविषयी श्री. रमेश शिंदे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यता आला.
अशी झाली मोहीम !
१. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नरवीरांची माहिती देणार्या फलकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
२. पावनखिंड येथे असलेल्या ध्वजाला वंदन केले.
३. बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीला वंदन करून पुष्पहार अर्पण केला.
४. उपस्थित मान्यवरांनी इतिहासाचे स्मरण करत बलीदानाचे महत्त्व आणि आताच्या काळानुसार करावयाच्या कृती याविषयी मार्गदर्शन केले.
५. कार्यक्रमस्थळी क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.







