अमेरिकेतील मानवाधिकार परिषद
४ लाख हिंदूंना विस्थापित करणार्या जिहादी आतंकवाद्यांचा प्रतिशोध गेल्या ७२ वर्षांत शासकीय यंत्रणांकडून घेतला जायला हवा होता. सरकारने आतातरी त्यासाठी कठोरात कठोर पावले उचलावीत आणि काश्मीरमधून जिहादी आतंकवाद नष्ट करावा, ही अपेक्षा !
वॉशिंग्टन : काश्मीरमध्ये ३० वर्षांपूर्वीच हिंदूंनी इस्लामिक स्टेटप्रमाणे (आयएस्प्रमाणे) आतंकवाद आणि क्रूरता पाहिली आहे. तेव्हा अशी क्रूरता पाश्चात्य देशांना ठाऊकही नव्हती, असे प्रतिपादन काश्मिरी हिंदू असलेल्या स्तंभलेखिका सुनंदा वशिष्ठ यांनी केले. येथे टॉम लँटोस मानवाधिकार आयोगाकडून आयोजित करण्यात आलेल्या मानवाधिकार परिषदेत त्या जम्मू-काश्मीरमधील मानवाधिकाराच्या स्थितीविषयी झालेल्या सुनावणीत भारताची बाजू मांडतांना बोलत होत्या.
वशिष्ठ म्हणाल्या की,
१. माझ्या कुटुंबाने आणि माझ्यासारख्या अनेक हिंदूंनी जिहादी आतंकवादाची झळ सोसली आहे. जेव्हा काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांविषयी जग मौन बाळगून होते, तेव्हा मानवाधिकाराचे ठेकेदार कुठे होते ?
२. १९ जानेवारी १९९० च्या रात्री ते कुठे होते, जेव्हा जिहादी आतंकवाद्यांकडून ‘काश्मीरमध्ये हिंदु महिला हव्यात; पण हिंदु पुरुष नकोत’, अशा शब्दांत धमक्या दिल्या जात होत्या ? मानवतेचे गुणगान करणारे तेव्हा कुठे होते, जेव्हा मला आणि माझ्या आईला वाचवण्यासाठी माझे आजोबा स्वयंपाक घरातील चाकू आणि गंजलेली कुर्हाड घेऊन आमच्या समवेत उभे होते ?
३. मला काश्मीर खोर्यात माझ्या धर्माचे (हिंदु धर्माचे) पालन करण्याची अनुमती नाही. काश्मीरमधील माझ्या घरावर कोणीतरी अवैधरित्या ताबा घेतला. असाच प्रकार अन्य काश्मिरी हिंदूंच्या संदर्भातही झाला. जे काश्मीरमध्येच राहिले, ते मारले गेले किंवा त्यांना लुटण्यात आले.
४. हिंदूंची सहस्रो मंदिरे आणि घरे पाडण्यात अन् जाळण्यात आली. हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. आमचे जीवन कट्टरतावादी इस्लामी आतंकवाद्यांनी नष्ट केले.
५. भारताने कधीच काश्मीर कह्यात घेतले नाही. काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे आणि असेल. काश्मीरविना भारत नाही आणि भारताविना काश्मीर नाही.
‘काश्मीर सोडून जा, धर्मांतर करा किंवा मरा !’ – आतंकवाद्यांकडून काश्मिरी हिंदूंसमोरील पर्याय
१९ जानेवारी १९९० च्या रात्री आतंकवाद्यांनी आम्हा हिंदूंना ‘काश्मीर सोडून जा, धर्मांतर करा किंवा मरा’, असे ३ पर्याय दिले होते. १९ जानेवारीच्या रात्री ४ लाख काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोर्यातून पलायन करण्यास भाग पाडण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात