
कोलकाता : देशाच्या काही भागांमध्ये हिंदू मुक्तपणे वावरु शकत नाहीत. हिंदू एकत्र नसल्यामुळे त्यांच्या अधिकारावर गदा येते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी व्यक्त केले. आम्ही संघटना उभारली ती कोणाला विरोध करण्यासाठी नाही तर स्वत:ला सक्षम करण्यासाठी.
या देशात हिंदू समाजाचा गौरवशाली इतिहास आहे. पण गौरवशाली इतिहास असूनही हिंदू समाजाची स्थिती जशी असायला हवी तशी आहे का ? देशामध्ये सर्वत्र हिंदूंना त्यांचे सर्व धार्मिक विधी मुक्तपणे करता येतात का ? हिंदूच्या मानवी हक्कांचे संरक्षण होते का ? असे सवाल मोहन भागवत यांनी विचारले. ते कोलकात्यामध्ये स्वयंसेवकांच्या मेळाव्यात बोलत होते.
हिंदूच त्यांच्या स्थितीला स्वत: जबाबदार आहेत. हिंदू एकत्र आणि मजबूत नसल्यामुळे त्यांना या परिस्थितीमधून जावे लागत आहे. आपल्याला अन्य कोणालाही विरोध न करता हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी काम करायचे आहे असे मार्गदर्शन त्यांनी स्वयंसेवकांना केले.
संदर्भ : लोकमत


