जातीयवाद पसरवणार्‍या समाजकंटकांवर शासनाने कारवाई न केल्यास आंदोलन करू !

श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीची चेतावणी

शासनाने स्वतःहून समाजकंटकांवर कारवाई करणे अपेक्षित असतांना हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी करावी लागणे, हे शासनाला लज्जास्पद आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पत्रकार परिषदेत डावीकडून सर्वश्री सुनील पाटील, महेश उरसाल, संभाजी साळुंखे, सुनील घनवट, प्रमोद सावंत आणि शरद माळी

कोल्हापूर : येथे गेल्या काही दिवसांपासून ‘श्री महालक्ष्मी’ कि ‘श्री अंबाबाई’ असा वाद निर्माण केला जात आहे. त्यासाठी दोन्ही विचारप्रवाहांकडून विविध शिलालेख आणि ऐतिहासिक कागदपत्रे यांचा आधार दिला जात आहे. शासनाने या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्व शिलालेख आणि ऐतिहासिक कागदपत्रे यांचा अभ्यास करण्यासाठी निःपक्षपाती विचारांच्या इतिहास संशोधकांची एक समिती नियुक्त करावी अन् या वादावर कायमचा पडदा टाकावा. श्री महालक्ष्मी मंदिरातील घटनेच्या निमित्ताने जातीयवाद पसरवणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करा अन्यथा जनआंदोलन करू, अशी चेतावणी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचे प्रवक्ता श्री. सुनील घनवट यांनी २९ जूनला पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला श्री. घनवट यांच्यासह बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, शिवसेनेचे कागल शहर प्रमुख श्री. किरण कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे सदस्य श्री. सुधाकर सुतार, श्री. प्रमोद सावंत, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, हिंदुत्वनिष्ठ श्री. राजू पाटील  तसेच हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की,

१. गेल्या ३ आठवड्यांपासून श्री महालक्ष्मी मंदिरातील वादाचा आधार घेऊन जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रीपूजकांनी श्री महालक्ष्मी देवीला ‘घागरा-चोळी’ नेसवली, याचा आम्ही निषेध करतो. या गंभीर चुकीविषयी दोषी श्रीपूजकांवर कारवाई झालीच पाहिजे, ही हिंदुत्वनिष्ठ संघटनांची भूमिका आहे.

२. श्री महालक्ष्मीचे मंदिर हे राजकीय अन् जातीयवादी लोकांचा आखाडा बनू नये. मंदिरात झालेल्या घटनेचा वापर करून काही देव-धर्म न मानणारी पुरोगामी, नास्तिकतावादी मंडळी मंदिरातील परंपरा मोडण्याचे षड्यंत्र करत आहेत, याला आमचा तीव्र विरोध आहे. मंदिराच्या संदर्भातील झालेल्या बैठकांमध्ये मुसलमान  आणि देव-धर्म न मानणार्‍या नास्तिक नेत्यांचा सहभाग होता, हे आक्षेपार्ह आहे. मंदिरात सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या तात्पुरत्या सल्लागार समितीमध्येही काही नास्तिकतावादी आणि पुरोगामी मंडळी यांना समाविष्ट करण्यात आले आहे. ही मंडळी याचा दुरुपयोग करून जातीयवादी विचार समाजावर थोपवत आहेत. त्यामुळे त्यांचा हा हस्तक्षेप त्वरित रोखावा आणि त्यांना सल्लागार समितीतून वगळून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, देवीवर श्रद्धा असणारे विचारवंत, अभ्यासक आणि भक्त यांची नियुक्ती करावी, अशी आमची मागणी आहे.

श्री. महेश उरसाल म्हणाले, ‘‘घागरा-चोळी’ नेसवणे अयोग्य आहे; मात्र हे घडल्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने लगेच आक्षेप घेऊन देवीची दुसरी पूजा का बांधली नाही ? देवस्थान समितीला नोटीस पाठवण्याचा अधिकार आहे, तर सचिवांना देवीची दुसरी पूजा बांधून यावर तोडगा काढण्याचे का सुचले नाही ? श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर सोयीनुसार वज्रलेप का केला जातो ? शासनानेच श्रीपूजकांच्या वर्तवणुकीविषयी धर्मशास्त्रीय आचारसंहिता बनवावी.’’

श्री. संभाजी साळुंखे म्हणाले, ‘‘काही दिवसांपासून ‘अंबाबाई मंदिरातून ब्राह्मण पुजारी त्वरित न हटवल्यास कोल्हापुरात वर्ष १९४८ ची पुनरावृत्ती होईल !’ अशा प्रकारचे जातीय तेढ निर्माण करणारे संदेश ‘व्हॉटस् अ‍ॅप’वरून पसरवले जात आहेत. या वादाचा आधार घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे कारस्थान समाजकंटकांनी रचल्याची शंका येते. त्यामुळे असे समाजद्रोही संदेश पाठवणारे समाजकंटक कोणत्याही जातीचे असले, तरी त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. सायबर सेलद्वारे विकृत संदेश पाठवणार्‍यांचा त्वरित शोध घ्यावा.’’

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर श्री. सुनील घनवट यांनी दिलेली उत्तरे

१. ‘श्री अंबाबाई मंदिर श्रीपूजक हटाव संघर्ष समिती’चे कार्यकर्ते दिलीप पाटील यांना धमकी आल्याविषयी तुम्हाला काय वाटते ?

श्री. घनवट : श्री. दिलीप पाटील यांना धमकी देणे अयोग्य आहे. ही धमकी कोणी दिली, त्याचा पोलिसांनी मुळाशी जाऊन शोध घ्यावा. कोणीही अशी धमकी दिली की, त्याचे खापर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर फोडले जाते, हे चुकीचे आहे. अशी धमकी देऊन मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होत आहे.

२. देवस्थान समितीच्या सीआयडी चौकशीचे काय झाले ? दोषींना अजून शिक्षा झालेली नाही ?

श्री. घनवट : तुळजापूर येथील श्री भवानी मंदिर आणि कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर यांचे व्यवस्थापन पहाणार्‍या देवस्थान समित्यांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडीच्या) संथगतीने न करता ती जलदगतीने करून दोषींवर कारवाई करावी, अशीच आमची मागणी आहे. शासनाने या प्रकरणातील गुन्हेगारांना झुकते माप देऊ नये.

३. मंदिरे सरकारच्या कह्यात नको, तर कोणाच्या कह्यात द्यायला हवी, असे तुम्हाला वाटते ?

श्री. घनवट : हिंदु जनजागृती समितीने मंदिरे सरकारच्या कह्यात नको, तर ती भक्तांच्या कह्यात देण्याची मागणी पहिल्यापासून केली आहे; कारण शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर, तसेच सिद्धीविनायक मंदिर यांचे सरकारीकरण झाल्यावर तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. पंढरपूरचे देवस्थान सरकारच्या कह्यात असल्यामुळे तेथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. देवस्थानाकडून गायींची योग्य पद्धतीने देखभाल न केल्याने ८ गायींचा मृत्यू झाला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​