Menu Close

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे आयोजित ‘विराट हिंदु संमेलनात’ हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

सनातन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथे ‘सनातन संस्कार सेवा संघा’च्या वतीने आयोजित ‘विराट हिंदु संमेलना’मध्ये धर्मप्रेमी नागरिकांनी सनातन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्धार केला. मागील वर्षी देहलीत सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यातून प्रेरणा घेऊन ‘सनातन संस्कार सेवा संघा’ने येथील शारदानगर परिसरातील ‘बजाज इंटरनॅशनल स्कूल’मध्ये या संमेलनाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. संजय सैनी यांनी भूषवले. या संमेलनाला पू. स्वामी राघवेंद्र आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

‘सनातन संस्कार सेवा संघा’चे अध्यक्ष श्री. मुकेश तलवार, सरचिटणीस श्री. सनोज रोहिला आणि सर्व कार्यकारी सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रीय सहभाग घेतला. सर्वश्री रवींद्रनाथ शर्मा, शरद माहेश्वरी आणि सरदार सत्यपाल यांनी कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिले.

क्षणचित्रे

१. या कार्यक्रमाला सहारनपूरचे आमदार राजीव गुंबर आणि प्रसिद्ध समाजसेविका सुषमा बजाज यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

२. या संमेलनामुळे समाजाला धर्म, संस्कृती अन् राष्ट्रीय चेतना यांच्या पुनर्जागरणाचा शक्तीशाली संदेश दिला.

धर्म आणि संस्कृती यांचे पालन केल्याविना सामाजिक पालट अशक्य! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माचे स्वरूप केवळ त्यात जन्म घेतला म्हणून स्पष्ट होत नाही, तर तो आचार, विचार आणि मूल्ये यांनी विकसित होतो. धर्माने पारंपरिक तिथी, विधी आणि भारतीय संस्कृती यांनुसार जीवनशैली स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. धर्म, ४ पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष), ४ आश्रम, १६ संस्कार आणि कर्मफल सिद्धांत यांसारख्या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आज समाजात स्वबोध, धर्मबोध आणि सांस्कृतिक जागरूकता महत्त्वाची आहे. भारतीय नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चालू होते, ते स्वीकारून आज स्वतःचे कुळ, परंपरा, गोत्र आणि सांस्कृतिक ओळख समजून घेऊन साधना करणे आवश्यक आहे. जोपर्यंत व्यक्ती त्यांच्या मुळांशी जोडून आणि धर्म अन् संस्कृती यांचे पालन करणार नाही, तोपर्यंत व्यापक स्वरूपात सामाजिक पालट शक्य नाही.

Latest News