स्वतःमधील चुका शोधण्यासाठी हे करा !

मुलांनो, आपल्याकडून दिवसभरात घडलेल्या चुका स्वभावदोष-निर्मूलन सारणीत वेळोवेळी लिहायच्या असतात. प्रथम चुका म्हणजे काय, ते समजून घेऊया. काही वेळाआपल्याकडून एखाद्याचा अपमान होईल, अशासारखे चुकीचे बोलले जाते किंवा निरर्थक हट्टकरण्यासारखी एखादी अयोग्य कृती होते. या जशा चुका आहेत, तसेच मनात अयोग्य विचार, प्रतिक्रियाकिंवा भावना निर्माण होणे, यासुद्धा चुका आहेत, उदा. दुसर्‍याविषयी मनात द्वेषाची भावना निर्माण होणेइत्यादी. या सर्व चुका कशा शोधायच्या, हे आता पाहूया.

१. स्वतःच्या चुका शोधायची स्वतःला सवय लावून घ्या

आपण दैनंदिन व्यवहार करतांना ‘मला माझ्या चुका शोधायच्याच आहेत’, असा दृढ निश्चय करून सतर्कता बाळगली, तर स्वतःच्यापुष्कळ चुका स्वतःच्या लक्षात येतात.

२. ‘चुकीमध्ये स्वतःचा किती सहभाग होता’, असा संकुचित विचार करू नका

कधी कधीचूक स्वीकारली जाते; परंतु ती स्वीकारतांना ‘चुकीमध्ये माझा अत्यल्प सहभाग होता’, असा विचार काही मुलांकडून केला जातो. मुलांनो, असा विचार करणेही आपल्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीने हानीकारक ठरते. झालेल्या चुकीमध्ये स्वतःचा थोडासा जरी सहभाग असला, तरी त्याचे पूर्ण दायित्व (जबाबदारी)घेऊन चूक स्वीकारावी.

३. स्वतःच्या चुका कळण्यासाठी दुसर्‍यांचे साहाय्य घ्या

मुलांनो, कधी कधी काही चुका स्वतःच्या लक्षात येत नाहीत. अशा चुका लक्षात आणून देण्यास आई-वडील, भाऊ-बहीण, मित्रपरिवार इत्यादींना सांगून ठेवावे.

अ. इतरांनी लक्षात आणून दिलेली चूक प्रथम मान्य करावी

कधी कधी आई-बाबांनी किंवा दुसर्‍या कोणी एखादी चूक सांगितल्यावर काही मुले चूक मान्य करत नाहीत. तसेच ‘ही चूक मी केलीनाही, तर ताईने (किंवा दादाने) केली’, असे सांगून स्वतःची चूक दुसर्‍यावर ढकलतात. यामुळे बहिर्मुखता(दुसर्‍यांमध्ये किंवा परिस्थितीत दोष बघण्याची वृत्ती) निर्माण होऊन त्यांचीच हानी होते. चूक मान्य न केल्याने ती ज्या दोषामुळे झालेली असते, तो दोष घालवण्यासाठी काहीच प्रयत्न होत नाहीत. याउलट इतरांनी सांगितलेली चूक अंतर्मुख होऊन (स्वतः कुठे न्यून पडलो, याकडे लक्ष देण्याची वृत्ती) मान्य करणार्‍या मुलांकडून ‘ती चूक का आणि कशी झाली’, याचा अभ्यास होतो. त्यामुळे त्यांच्याकडून सुधारण्यासाठी चांगले प्रयत्न होऊन त्यांचे स्वभावदोषही लवकर दूर होतात. यासाठी मुलांनो, कोणीही सांगितलेल्या चुकीवर समर्थन न करता ती चूक स्वीकारावी.

आ. दुसर्‍याच्या चूक सांगण्याच्या पद्धतीकडे लक्ष न देता चूक स्वीकारावी

मुलांनो, काहीवेळा ताई (किंवा दादा) तुमची चूक सांगते; पण तिचा स्वर चढलेला (रागाचा) असतो. खरेतर तुमच्याकडून चूक झाली आहे, हे तुम्हाला मनातल्या मनात मान्य असते; परंतु ताईची सांगण्याची पद्धत नआवडल्याने तुम्ही तिने सांगितलेली चूक स्वीकारत नाही; मात्र असे करणे योग्य नाही. ताईच्या (किंवा दादाच्या) बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष न देता तिने सांगितलेली चूक स्वीकारावी.

बालमित्रांनो, अंतर्मुख होऊन, तसेच इतरांचे साहाय्य घेऊन स्वतःच्या चुका शोधूया आणि देवाची कृपासंपादन करूया !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दोष घालवा आणि गुण जोपासा !

Leave a Comment