
जळगाव : भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार टी. राजासिंह यांच्यावर ९ एप्रिल या मध्यरात्री बीड येथे प्राणघातक आक्रमण झाले. ते बीड येथील हिंदु धर्मजागृती सभा आटोपून भाग्यनगर येथे जात असतांना त्यांच्या गाडीवर लक्ष ठेवण्यात आले. ट्रकद्वारे आक्रमण करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घ्यावी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या नावे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १७ एप्रिल या दिवशी निवेदन देण्यात आले.
आतापर्यंत केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि बंगाल येथे हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. आता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातही त्या घडू लागल्या आहेत. राजसिंह यांनी मालेगाव आणि बीड येथील सभांना जाऊ नये, म्हणून प्रतिदिन देश-विदेशांतून शेकडो वेळा भ्रमणध्वनीद्वारे धमकवण्यात आले. हे आजही चालू आहे. तरीही धर्मांधांच्या या धमक्यांना न जुमानता राजासिंह यांनी ७ एप्रिलला मालेगावच्या आणि ८ एप्रिलला बीडच्या सभेला संबोधित केले. रात्री बीड येथील सभा आटोपून भाग्यनगरकडे निघाले असता नियोजनपूर्वक त्यांच्या गाडीवर आक्रमण करण्यात आले. याकडे केवळ अपघात म्हणून न पहाता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि धर्मांधांचे षड्यंत्र उघड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
या वेळी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे निवेदन जिल्हाधिकार्यांच्या अनुपस्थितीत अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी स्वीकारले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात







