राजस्थान उच्च न्यायालयाने दैनिकाच्या वृत्ताची नोंद घेत स्वतः जनहित याचिका प्रविष्ट करून केली सुनावणी

जोधपूर (राजस्थान) – जोधपूरमधील न्यायाधिशांची सरकारी निवासस्थाने, शाळा, महाविद्यालये, मंदिरे आणि इतर अनेक सार्वजनिक अन् खासगी मालमत्ता सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून नोंदवण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्तावर राजस्थान उच्च न्यायालयाने स्वतः नोंद घेऊन यावर जनहित याचिका नोंदवली आहे. एका दैनिकाच्या वृत्तात आरोप करण्यात आला होता की, महसूल नोंदींमध्ये वेगळी माहिती असतांनाही अनेक मोठ्या मालमत्ता वक्फ पत्रामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आणि ‘उम्मीद पोर्टल’ या संकेतस्थळावर ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून नोंदवण्यात आल्या.
१. न्यायालयाने यावर म्हटले की, महसूल नोंदींमधील परिस्थिती पूर्णपणे वेगळी असतांनाही वक्फ नोंदींमध्ये शैक्षणिक संस्था, प्रार्थनास्थळे, न्यायाधिशांचे निवासस्थान आणि अनेक निवासी अन् व्यावसायिक मालमत्ता यांचा समावेश करणे, ही गोष्ट प्रथमदर्शनी चिंता निर्माण करणारी आहे. ही चिंता मालकी हक्क किंवा नियंत्रण यांच्याशी संबंधित वैयक्तिक वादांच्या पलीकडची आहे.
२. न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करत खसरा क्रमांक ४८२, ४८५ आणि ४९० यांमध्ये येणार्या मालमत्ता आणि बातम्यांमध्ये सांगितलेल्या मालमत्ता यांचे मालकी हक्क अन् कायदेशीर स्थिती यांविषयी आहे तशी परिस्थिती कायम ठेवली जावी, असा निर्देश दिला. तसेच न्यायालयाने वादग्रस्त नोंदींच्या आधारे कोणत्याही प्रकारचे फेरफार, हस्तांतरण, भाडेतत्त्वावर देणे, परवाना, बांधकाम, पाडकाम किंवा अशी कोणतीही कारवाई करण्यावर बंदी घातली, ज्यामुळे त्यांच्या भौतिक किंवा कायदेशीर स्थितीत पालट होईल.
वक्फ मालमत्ता दाखवलेल्या वास्तू
सोहनलाल मनिहार शाळा, शाह गोवर्धनलाल काबरा कॉलेज, काबरा मातृश्री कला मंदिर, अग्रवाल बगीचा, अग्रवाल महावीर मंदिर, सतगुरु कबीर आश्रम, गौरीश्वर महादेव मंदिर, मारू लोहार सिकलीगर मंदिर, जुनागड ज्ञाती बगीचा, दोन ज्ञाती भवन, गीता भवन, राजस्थान उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश न्यायमूर्ती विनीत कुमार माथुर आणि झारखंडचे माजी मुख्य न्यायाधीश प्रकाश तातिया यांचे सरकारी निवासस्थान.
वक्फ बोर्डाकडून अशा प्रकारची लुबाडणूक नवीन नाही. यापूर्वीही अशा घटना समोर आलेल्या आहेत. न्यायालयांनी या संदर्भात देशव्यापी आदेश देऊन अशा सर्व वास्तू वक्फ मालमत्तेतून मुक्त करण्याचा आदेश द्यावा, असेच जनतेला वाटते ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती







