तणावमुक्त जीवनासाठी विद्यार्थ्यांनी योग्य दिनचर्या आणि साधना यांचा अवलंब करावा – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे,राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

पलवल (हरियाणा) – सध्या वाढती स्पर्धा, परीक्षेचा ताण, भ्रमणभाषसंच आणि सामाजिक माध्यमे यांचा अतीवापर, भविष्याची चिंता, तसेच कौटुंबिक अन् सामाजिक अपेक्षा ही सध्याच्या मुलांमधील तणावाची प्रमुख कारणे आहेत. तणावाचे वेळीच व्यवस्थापन केले नाही, तर त्याचा विद्यार्थ्यांचा अभ्यास, आरोग्य, वर्तन आणि आत्मविश्वास यांच्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थितीत घाबरून जाण्याऐवजी त्यांनी सकारात्मक मानसिकता बाळगावी, तसेच नियमित दिनचर्या, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि वेळेचे व्यवस्थापन यांकडे लक्ष द्यावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ‘सीए नीरज मित्तल क्लासेस’ येथे ‘तणाव नियंत्रण आणि व्यवस्थापन’ या विषयावर विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाविषयी सनदी लेखापाल नीरज मित्तल यांनी समाधान व्यक्त केले.

सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘प्रतिदिन काही वेळ योग, प्राणायाम, श्वासोच्छ्वासाविषयीचे व्यायाम आणि ध्यान साधना केल्यास मन शांत होते, तसेच एकाग्रता अन् आत्मविश्वास वाढण्यास साहाय्य होते.’’ या वेळी ‘सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त होते’, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.
वैशिष्ट्यपूर्ण
‘सीए नीरज मित्तल क्लासेस’च्या वर्गांचा प्रारंभ आणि शेवट प्रभु श्रीरामाच्या नामजपाने होतो, तसेच वर्गातील सर्व विद्यार्थी एकमेकांना भेटल्यावर ‘जय श्रीराम’चा जयघोष करतात.


