ठिकठिकाणी निवेदने सादर
बत्तीसशिराळा (जिल्ह सांगली)

नाशिक, तुळजापूरसह राज्यातील सर्वच सरकारीकरण झालेल्या मंदिरांमधील ‘सशुल्क दर्शनसेवा’(पेड दर्शन) सुविधा बंद करावी, या मागणीचे निवेदन मंदिर महासंघाच्या वतीने बत्तीस शिराळा येथे तहसीलदार शैलजा खोत यांना देण्यात आले. या वेळी कोल्हापूर जिल्हा मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी, धर्मप्रेमी श्री. अशोक मस्कर, सर्वश्री प्रवीण पाटील, शरद नायकवडी, बजरंग कुंभार, अजित कुंभार, जितेंद्र पंडित, प्रवीण पाटील, धोंडिराम मुळीक, संतोष बांदिवडेकर आदी उपस्थित होते.
या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या..
१. कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला.
२. बहुराष्ट्रीय आस्थापनातील ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धार्मिक सक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करा.
२ मे २०२६

त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील ज्योतिर्लिंग मंदिर संस्थानमध्ये भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांसह गोटीराम मनाजी पेहरे अन् अभिषेक कडलग यांना पोलिसांनी अटक केली आहे. येथे २०० रुपयाचा अधिकृत पास असतांना १० मिनिटांत दर्शनाचे आमीष दाखवून भाविकांकडून ३ ते १२ हजार रुपये मागितले जातात, असा प्रकार समोर आला आहे. हाच प्रकार तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात होत असून तेथे २०० रुपये ‘पास’ देऊन विशेष दर्शन दिले जाते. हाच ‘पास’ नवरात्र काळात ३०० रु, ५०० रुपये आणि १ हजार रुपये करण्यात येतो. येथेही अनेक वेळा अतिरिक्त शुल्क घेऊन दर्शनासाठी सोडल्याच्या भक्तांच्या तक्रारी आल्या आहेत. खरेतर ‘सशुल्क दर्शनसेवा’ हा प्रकारच चुकीचा असून यामुळे भाविकांमध्ये भेदभावाची भावना निर्माण होते. दूरवरून येणार्या ज्या भक्तांकडे पैसे नाहीत त्यांनी काय करायचे? पैशांअभावी दर्शन नाकारले जाणे हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान आहे आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत घटनात्मक धार्मिक अधिकारावर आणलेली गदा आहे. देवाच्या दृष्टीने गरीब-श्रीमंत सर्व समान असल्याने प्रत्येकासाठी दर्शनाची पद्धत सारखीच असणे अपेक्षित आहे. केवळ उत्पन्न वाढीचा विचार करण्यासाठी मंदिर हे एखादे व्यावसायिक आस्थापन वा दुकान आहे का? त्याचसमवेत अशा पासचा काळाबाजार करण्याची वृत्ती सर्वत्र फोफावत आहे. त्यामुळे नाशिक, तुळजापूरसह राज्यातील सर्वच सरकारीकरण झालेल्या मंदिरांमधील ‘सशुल्क दर्शनसेवा’(पेड दर्शन) सुविधा बंद करावी, अशी मागणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.
देवस्थानांमधील राजकीय नियुक्त्या बंद करा !
जेव्हा मंदिरे सरकार किंवा राजकीय नियुक्त्या असलेल्या समित्यांच्या कह्यात जातात, तेव्हा तिथे भक्तीऐवजी व्यापारी वृत्तीचा शिरकाव होतो. त्र्यंबकेश्वरमधील ही घटना म्हणजे मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणामच होय. ‘अतिथी देवो भव ।’ मानणार्या भूमीत भाविकांना लुबाडण्यासाठी विश्वस्तांनीच यंत्रणा चालवावी, यासारखे दुसरे दुर्दैव नाही ! त्र्यंबकेश्वर देवस्थानातील विश्वस्त नियुक्तीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केला आहे. त्यामुळे या ‘पेड’ दर्शनाची सखोल चौकशी करून यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचेही अन्वेषण व्हावे, अशी मागणी मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. यापुढील काळात असे प्रकार टाळण्यासाठी देवस्थानांमध्ये विश्वस्त म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी यांची नियुक्ती करण्याऐवजी तिथे देवाचा भक्त-भाविक म्हणून नेमणूक होणे आवश्यक आहे आणि यापुढे तसा बदल देवस्थानच्या घटनेत करावा, अशी मागणी मंदिर महासंघाच्या वतीने करत आहोत.







