
अजमेर (राजस्थान) – हिंदूंना बर्याच काळापासून खोट्या कथानकामध्ये अडकवण्यात आले आहे. ‘घर का भेदी लंका ढहाए (घरभेदी लंका नष्ट करतो)’, यांसारख्या म्हणीला विश्वासघाताच्या स्वरूपात सादर करण्यात आले. वास्तविक लंकादहन हे घराचे नाही, तर अधर्माचे दहन होते. प्रभु श्रीरामाच्या आदर्शांनुसार विभीषणाने धर्माच्या बाजूने उभे राहून सत्याचा मार्ग अनुसरला, जो सनातन धर्माच्या मूळ भावनेचे प्रतिबिंबित करणारा आहे. आता ‘जो जिता वही सिकंदर’ (जो जिंकला तो सिकंदर) यांसारख्या विचारसरणीच्या बाहेर पडून ‘जो जीता वही चंद्रगुप्त मौर्य’ (जो जिंकला तो चंद्रगुप्त मौर्य) यांच्यासारखा राष्ट्रनायक आदर्श म्हणून स्वीकारण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. अजमेरमधील ‘आदेश सेवा समिती’ने गुलाब बाडी येथील शाळीग्राम मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश समन्वयक श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते. याप्रसंगी आदेश सेवा समितीचे सदस्य आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘पालकांनी संस्कारांचा प्रारंभ त्यांच्या घरातील मुलांपासून करावा. मुलांना नियमितपणे संस्कारवर्गाशी जोडावे. त्यामुळे त्यांचे चारित्र्य घडण्यास साहाय्य होईल. सनातन धर्माची प्रत्येक परंपरा शास्त्र आणि विज्ञान यांवर आधारित आहे. ते समजून घेऊन अंगीकारले, तर शरीर, मन अन् जीवन यांच्याशी संबंधित अनेक समस्या सोडवणे शक्य आहे.’’


