माघ पौर्णिमा, श्री म्हाळसादेवीची कथा

माघ पौर्णिमा आदिशक्तीच्या एका अवतार कार्याचे स्मरण करून देते. हे स्मरण भक्तांना दिलासा देणारे आहे.

समुद्र मंथनातून अमृताचा कलश बाहेर पडताच अमरत्व प्राप्त होण्यासाठी तो घेण्यास देव आणि दानव यांच्या झटापट चालू होणे : देव आणि दैत्य यांनी सागराचे मंथन चालू केले. या मंथनातून एक एक दिव्य अशा वस्तू बाहेर पडू लागल्या. यातून उच्चैश्रवा घोडा, हालाहल विष, अप्सरा आणि अमृताचा सुंदर कलश आला. हा कलश पहाताच देव आणि दैत्य झटापटी करू लागले. कारण अमृत पिण्यामुळे अमरत्व मिळणार होते.

या संकटातून पार होण्यासाठी विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करताच तिच्याकडे पहाताच दैत्यांचे भान हरपून जाणेे आणि मोहिनीने देवांना अमृत पाजणे, दैत्य तसेच रहाणे : भगवान विष्णूंनी युक्ती काढली. त्यांनी एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले. तिचे नाव मोहिनी. मोहिनीने आपल्या हाती कलश धरला. दैत्य तिच्याकडे पहाता पहाताच भान हरपून गेले. मोहिनीने देवांना अमृत पाजले. दैत्य तसेच राहिले. मोहिनीने आपली माया टाकून हे संकट दूर केले. मोहिनी अंतर्धान पावली.

काही काळ गेला. भगवान शिवांना ते मोहिनी रूप पहाण्याची इच्छा झाली. ते विष्णूंकडे आले आणि म्हणाले, ‘भगवान, आपले ते अलौकिक असे मोहिनी रूप दाखवा.’ भगवान विष्णूंनी मान्यता दिली.

शंकर आणि पार्वती तेथे असतांनाच विष्णूंनी पुन्हा मोहिनी रूप धारण केले आणि ते त्यांच्यासमवेत आले. शंकर ते रूप पाहून थक्कच झाले, त्याचे भान जणू हरपले. विष्णूंनी ते मोहिनीरूप पार्वतीमध्ये अंतर्भूत केले आणि ते अंतर्धान पावले.

शंकरांनी पार्वतीकडे पाहीले. ती मोहिनीरूपात दिसू लागली. शंकरांना फार आनंद झाला आणि ते तिला म्हणाले, ‘तुझे नाव महालया शक्ती असे राहील.’

हीच महालयाशक्ती देवी म्हणजे म्हाळसादेवी होय. हिचा हा अवतार माघ पौर्णिमेला झाला.

त्याची आणखी एक कथा अशी की, पृथ्वीवर मणी आणि मल्ल या नावाचे दोन राक्षस ऋषीमुनींना आणि देवांना त्रास देऊ लागले. आश्रम उजाड पडले. अध्ययन संपले. सर्वत्र आत्याचाराचे थैमान चालू होते.

या अत्याचाराला आवर कोण घालणार ? सर्व देव आणि ऋषीमुनी शिवलोकात गेले. तेथे भगवान शंकर पार्वतीसह आसनावर बसले होते. भगवान शंकरांची ज्ञानसाधना चालली होती. पार्वती ज्ञानरूपा होऊन शंकरांशी तन्मय झाली होती. तिचे तेज अलौकिकरित्या वाढले होते. तिचे डोळे चंद्रबिंबाप्रमाणे चमकत होते. अधून मधून ती जगाकडे नेत्रकटाक्ष टाकी. यावेळी विश्‍वातील सर्व घडामोडीची जाणीव त्या कटाक्षात भरून येत आहे. विश्‍वाच्या या माऊलीला जणू सर्व ज्ञान होत होते.

या दिव्य रूपासमोर सर्व देव, ऋषीमुनी आले. त्यांनी भीषण अत्याचारांच्या सर्व कथा त्यांना ऐकवल्या. शंकर पार्वती हे ऐकून अत्यंत संतप्त झाले. भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे भव्य रूप घेतले. पार्वतीने म्हाळसा देवीचे रूप घेतले. दोघांनी राक्षसावर हल्ला केला आणि त्यांचा नाश केला.

म्हाळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे. म्हाळसा मधील ‘म’ म्हणजे ममत्व आणि माया. ‘ह’ म्हणजे हर्ष किंवा आनंद. लसत्व म्हणजे तेज. म्हाळसादेवी ही श्रद्धाळू भक्तावर ममता करणारी आई आहे. ती आनंददायिनी आहे. प्रसन्नता देणारी आहे. ती अलौकिक अशा तेजाने युक्त आहे. माघ पौर्णिमा या तेजस्वी देवतेची अवतार कथा सांगते.

– साप्ताहिक जय हनुमान (२०.२.२०१६)

Leave a Comment