वयम् पंचाधिकम् शतम्

कौरवांनी पांडवांना द्युतात हरवून बारा वर्षे वनवास व एक वर्षे अज्ञातवासात पाठवले होते. पांडव वनवासात असताना त्यांच्या दारिद्रय़ाला हिणवावे आणि स्वत:च्या श्रीमंतीचे प्रदर्शन करावे म्हणून कौरव आपल्या कुटुंबकबिल्यासह पांडव राहत असलेल्या द्वैतवनात जात असत.

एकदा दुर्योधन आपल्या परिवारासह द्वैत वनातील सरोवराकडे जाण्यास निघाला, त्याच वेळी चित्रसेन गंधर्व आपल्या अप्सरांसह त्याच सरोवरात जलक्रीडा करत होता. सरोवराकडे येणार्‍या दुर्योधनाला पाहून गंधर्वाने त्याला तेथे येण्यास अटकाव केला. या अडवणुकीचा दु:शासनाला प्रचंड राग आला. क्रोधमग्नतेतूनच त्याने गंधर्वाना युद्धाचेआव्हान दिले. दोन्ही पक्षांत तुंबळ युद्ध सुरू झालेआणि त्यात गंधर्वाची सरशी झाली. गंधर्वांनी कौरववीरांचा पराभव केला. त्यांच्यापुढे कौरवांची दयनीय अवस्था झाली. यातून आपण वाचणे कठीण आहे, हे लक्षात आल्यावर चार-सहा कौरव सैनिक जीव मुठीत धरून कसेबसे पळ काढीत वनवासात असलेल्या युधिष्ठिरा समोर पोहोचले आणि अक्षरश: त्याच्या हातापाया पडत कुरुकुलाची अब्रू वाचविण्याची विनंती करू लागले. यावर भीम म्हणाला, ”आपण आता काहीही करायचे नाही. सगळ्या कौरवांचा यक्षाच्या हातून नाश होऊ दे. आपोआपच कौरवांचा काटा काढला जाईल. सुंठीवाचून खोकला जाईल.” पण भीमाचेहे म्हणणे युधिष्ठिराला अजिबात रुचले नाही. तो म्हणाला, ”आपापसात भांडताना आपण पाच विरुद्ध ते शंभर कौरव हे ठीक आहे, पण जेव्हा परकीयांशी मुकाबला करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आम्ही एकशे पाच मिळून शत्रूशी मुकाबला करू. शत्रूला चारीमुंडय़ा चीत करू.”

अशा प्रकारे हर त-हेने समजूत घालून युधिष्ठिराने भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या सर्वांना कौरवांच्या मदतीसाठी तयार केले. पांडव गंधर्वांविरुद्ध लढण्यासाठी कौरवांना जाऊन मिळाले आणि कौरवांसह पांडवांनी लढून गंधर्वांना धूळ चारली व शत्रूशी लढताना ‘वयम् पंचाधिकम् शतम् !’ हे दाखवून दिले.

अशा प्रकारे आपापसांत कितीही वैर असले तरी परकीयांशी लढताना एकजुटीने लढा देण्याच्या वृत्तीला ‘वयम् पंचाधिकम् शतम्’ म्हटले जाते.

Leave a Comment