सर्वस्वाचा त्याग संतच करू शकणे

एकदा संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीस वैराग्यपर उपदेश पुष्कळ केला आणि ‘विषय कसे वाईट आहेत’, हे पटवून दिले अन् विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितले. उपदेश ऐकून तिच्या मनात विरक्तता आली. दुसर्‍या दिवशी तिने स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांस बोलवून सर्व घर लुटवले. घरात काहीएक ठेवले नाही. नंतर दुपारच्या वेळी ‘घरात अन्न नाही’, असे पाहून मात्र ती विचारत पडली. आदल्या दिवशी एकादशीचा उपवास असल्यामुळे ती आणि मुले भुकेने अगदी व्याकूळ झाली. त्या संकटात जगज्जननीने एका महार जातीच्या स्त्रीचे रूप घेतले आणि संत तुकाराम महाराजांचे सत्त्व पहाण्यास आली. ती म्हणाली, ‘‘मी तुमच्या गावची महारीण आहे. तुम्ही ब्राह्मणांकरवी घर लुटवल्याचे ऐकले. काही उरले असेल, तर मला द्यावे.’’ ते ऐकून घरात जे एक लुगडे वाळत घातले होते, तेही संत तुकाराम महाराजांनी महारणीला देऊन टाकले.

ही गोष्ट बायकोला समजली. त्या वेळी तिला अतिशय राग आला. संतापाच्या भरात ज्या विठ्ठलाच्या चरणांच्या चिंतनाने इतका अनर्थ झाला, ते चरण फोडून टाकण्याकरता दगड घेऊन ती देवळाकडे निघाली. संत तुकाराम महाराजही तिच्या पाठोपाठ धावले; परंतु ती दगड घेऊन देवळात येताच रुक्मिणीने दार बंद केले. इकडे संत तुकाराम महाराजांच्या मनात नाना तर्‍हेचे तर्क येऊ लागले. ती विठ्ठलाच्या पायावर दगड मारणार इतक्यात रुक्मिणीने तिला अडवले आणि सांगितले, ‘‘तुला संसारात जे जे उणे पडेल, ते ते मी पुरवत जाईन.’’ मग रुक्मिणीने तिला लुगडे, चोळी देऊन परतवले. ती आनंदाने घरी परतली.

इकडे संत तुकाराम महाराज मनात म्हणाले, ‘आपण एवढा बोध करूनसुद्धा आपली बायको उतावीळ होऊन रुक्मिणीकडून साडी, चोळी घेऊन आली.’ ते बायकोला म्हणाले, ‘‘तू परमार्थ दवडलास. दुधावरची साय खाल्ली, तर लोणी येणार कोठून ? ऋद्धी-सिद्धी, संपत्ती यांचा मनापासून त्याग केल्यानेच भगवद्प्राप्ती होते.’’ एवढे सांगून त्यांनी तिला पुन्हा गोरगरिबांना सर्व वाटून टाकण्यास सांगितले.’

– डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९०)

Leave a Comment