विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे

एकदा सर्व संतमंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईने गोरा कुंभारांना सांगितले की, ‘सर्व संतांची परीक्षा घ्या’. त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक-एक थापटी मारली. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत; पण रागाने त्यांचे तोंड फुगले. त्यांनी अहंकाराने विचार केला, ‘मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का ?’ नंतर गोरा कुंभारांनी सांगितले, ‘‘नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. हे ऐकून नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. देवाने सांगितले, ‘मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की, तुझे डोके कच्चे आहे, तर तू खरोखरीच कच्चा आहेस; कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस. माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे. त्याच्याकडे तू जा. तो तुला ज्ञान देईल’.

संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या पिंडिकेवर पाय ठेवून झोपले होते. हे पाहिल्यावर नामदेवांनी विसोबांना सांगितले, ‘‘शिवलिंगावरून आपले पाय बाजूला काढून ठेवा”. त्या वेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी शिवाचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव”. नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे, तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असे. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. त्या वेळी विसोबा खेचरांनी सांगितले, ‘‘भगवंत सर्वत्र आहे; पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही”. नामदेवांच्या ठिकाणी भक्ती होती. गुरुकृपेमुळेच ‘सर्वत्र ब्रह्म आहे’, याचे त्यांना ज्ञान झाले.

संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण रूपाशी एकरूप होता आले.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)