श्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले ?

गोरक्षनाथांना स्वतःच्या सिद्धी-सामर्थ्याचा गर्व होता. त्या गर्वाचे परिहरण करण्यासाठीच ही दत्तभगवानांची योजना असावी की, जेणेकरून त्यांची भेट व्हावी अन् त्यातून त्यांचे प्रबोधन करून त्यांना अहंकारविरहित सिद्ध बनवावे. गोरक्षनाथांच्याही मनात दत्तापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, त्यांची भेट घेऊन स्वबळ प्रदर्शन करून त्यांच्यावर विजय मिळवावा, ही अहंकारी लालसा घर करून होती आणि ती परमावधूत दत्तात्रेयांनी जाणली असावी; म्हणूनच हा प्रसंग घडविला असावा.

गोरक्षनाथ दत्तात्रेयांच्या शोधार्थ एका गुहेत शिरले. तेथे त्यांना जटाधारी उन्मत्त पिशाचवत व्यक्ती बसलेली दिसली. गोरक्षनाथ पण तेथेच एका शिळेवर बसले. मध्यान्ह समय – भिक्षेची वेळ झालेली म्हणून त्यांनी खांद्यावरून झोळी उतरवली, तोच ती उडून अदृश्य झाली आणि स्वादिष्ट भिक्षान्नाने भरून परत आली. शिष्टाचार म्हणून गोरक्षनाथांनी त्या व्यक्तीस विचारले, आपण काही घेणार का ? तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मी केवळ गोदुग्धच घेतो. तेव्हा येथे आपणास कोण गोदुग्ध देते, असे गोरक्षनाथांनी विचारताच या कमंडलूतूनच दूध मिळते. कोणी ना कोणी आणून देते किंवा कमंडलूच दूध आणण्यास जातो. गोरक्षनाथांनी त्या सिद्धाची गंमत करावी; म्हणून विचारले, बघू तुमच्या कमंडलूत किती दूध आहे ? कमंडलू उचलून पाहिले, तर आत ताजे दूध भरलेले होते. तेव्हा त्या सिद्धाच्या सिद्धीसामर्थ्यांची मर्यादा, ताकद, सीमा किती आहे, ते परीक्षावे म्हणून त्यांनी आपण मला माझे पात्र भरून गोदूध भिक्षा देणार का ?, असे विचारताच ती सिद्ध व्यक्ती म्हणाली, का नाही ? येथील सर्व आपलेच आहे, असे प्रेमपूर्वक म्हणाली आणि गोरक्षनाथांना हेच हवे होते. ते तो कमंडलू उचलून आपल्या कटोर्‍यात त्यातील दूध ओतू लगले; पण कटोरा दुधाने भरत नव्हता अन् कमंडलूतून दूधधार चालू होती. गोरक्षनाथ समजून चुकले की, कमंडलू अक्षयपात्र आहे आणि त्या सिद्धाची सिद्धी प्रभावशाली आहे. त्यांनी तो तसाच ठेवला. त्या सिद्धाचा चेहरा निर्विकार होता.

गोरक्षनाथांनी विचार केला की, हे खरे दत्त भगवान आहेत का, याची शहानिशा करण्यासाठी त्यांची परीक्षा घेऊ. ते म्हणाले, आपण लपंडाव खेळूया, बघू कोण हरते, कोण जिंकते ते. वारंवार गोरक्षनाथांनी आग्रह धरल्याने त्या सिद्धाने मैदानात उतरण्याचा निश्‍चय केला. आता प्रथम कोणी लपायचे ? यावर असे ठरले की, गोरक्षनाथांनीच प्रथम लपावे अन् हेच गोरक्षनाथांना हवे होते. त्यांना मनोमन खात्री होती की, आता सिद्ध हरणारच. त्यांनी तीन टाळ्या वाजवल्याबरोबर ते अदृश्य झाले. त्या सिद्धाने प्रचंड हास्यध्वनी केला. त्याचे प्रतिध्वनी चारी दिशांनी उमटले. थोडा वेळ मौन धरून त्यांनी तो कमंडलू उचलला आणि त्या खालील थोडी माती काढून त्यातून एक लहानसा बेडूक काढला आणि त्याला आपल्या तळहातावर ठेवून ते हसू लागले. गोरक्षनाथ लाजले, त्यांनी बेडकाचे रूप टाकून मूळ रूप धारण करून पराभव स्वीकारला.

आता त्या सिद्धाची पाळी होती. तोही तीन टाळ्यांच्या आवाजाबरोबर आकाशात उड्डाण करून दिसेनासा झाला. गोरक्षनाथांनी राजहंसाचे रूप घेऊन त्याचा पाठलाग केला; पण सगळे आकाश पालथे घालूनही सिद्ध गवसला नाही. श्‍वासाद्वारे सर्व हवा गाळून सोडली, तरी पत्ता लागेना. शेवटी थकून-भागून ते परत भूमीवर आले आणि पराभव मान्य केला. पाहिले तर तो सिद्ध समोरच उभा होता; पण गोरक्षनाथांना वाटले की, परत एक संधी मिळावी; म्हणून त्यांनी परत सिद्धास फार आग्रह केला आणि त्या आग्रहाचा मान राखण्यासाठी तो परत अदृश्य झाला. गोरक्षनाथांनी योगसिद्धीने हे जाणले की, तो कमंडलूत लपला आहे. त्यांनी माशाचे रूप घेऊन कमंडलुतील सर्व पाणी गाळून काढले; पण शून्य ! मोठ्या निराशेने, दुःखाने ते बाहेर येऊन मूळ रूप घेऊन बसले. त्यांनी पराभव मान्य केला आणि पहातात तो काय, तो सिद्ध त्याच्या आसनावर शांत मुद्रेने, पूर्वीसारखाच धीरगंभीर, जणू काही झालेच नाही, असा बसलेला आहे. गोरक्षनाथांनी त्यांना विचारले, आपण कोणत्या सिद्धबळावर कोठे लपला होता ? सिद्धाने शांतपणे उत्तर दिले, ज्ञानामृतं समरसं गगनीपमोऽहम । म्हणजे मी आकाशात आकाश आणि पाण्यात पाणी झालो होतो. गोरक्षनाथांनी जाणले की, ही समरस सिद्धी आहे आणि त्यांनी त्यांना श्रद्धापूर्वक प्रणाम केला.

तात्पर्य : वृथा अहंकार का बाळगू नये.

– आचार्य वसंत गोडबोले (मासिक धनुर्धारी, मार्च २०१०)

Leave a Comment