रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंची अज्ञात गुणवैशिष्ट्ये !

राणी लक्ष्मीबार्इ

राणी लक्ष्मीबार्इ

राणी लक्ष्मीबाईचे नाव घेतले गेले की, सर्वांनाच ‘इंग्रजांशी निर्भयपणे झुंज देणारी’, अशी तिची प्रतिमा दिसू लागते. रणरागिणी लक्ष्मीबाईमध्ये हा क्षात्रभाव तिच्या जीवनात तिने नियमितपणे काही गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले होते; म्हणूनच निर्माण झाला होता. या जोडीला ती खंबीर शासकही होती. राणी लक्ष्मीबाईची काही गुणवैशिष्ट्ये आज कित्येकांना ठाऊकही नाहीत.

कोकणातील वरसई (तालुका पेण, जिल्हा रायगड) या गावातील ब्राह्मण कुटुंबातील कै. विष्णुपंत गोडसे यांनी १८५७ ला उत्तर भारतात केलेल्या प्रवासाचे वर्णन लिहून ठेवल्याने आणि त्यांची अन् राणी लक्ष्मीबाई यांची भेट झाली असल्याने हे सर्व आपल्याला समजू शकत आहे. त्यांनी पुढील पिढ्यांवर केलेले हे उपकारच आहेत. ब्राह्मणद्वेषापोटी समाजातील एक वर्ग इतिहासच मोडीत काढण्यास कार्यरत झाला आहे. इतिहासातून ब्राह्मणांच्या कर्तृत्वाचे अवमूल्यन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडणे किती आवश्यक आहे आणि ब्राह्मणांचे या समाजावर किती उपकार आहेत, हे या लेखात गोडसे गुरुजींनी राणीविषयी लिहून ठेवलेल्या विवरणावरून (माहिती) लक्षात येईल.

१. बालपण

श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्याकडे चाकरी करणार्‍या श्री. मोरोपंत तांबे यांची लक्ष्मीबाई तथा छबेली ही एकुलती एक कन्या होती. ती लहान असतांनाच तिची आई वारली. त्यामुळे मोरोपंतानी तिला सर्व प्रकारचे शिक्षण दिले. नंतर तिचा विवाह झाशी संस्थानचे राजे गंगाधरबाबा यांच्याशी झाला. लग्नानंतर तिचे नाव ‘लक्ष्मीबाई’ असे ठेवले गेले.

२. कुलाचाराचे पालन करणारे धार्मिक सासर

श्री महालक्ष्मी हे झाशीच्या संस्थानिकांचे कुलदैवत. झाशी शहराच्या दक्षिण दरवाज्यासमोर असलेल्या मोठ्या तलावात श्री महालक्ष्मीचे देवालय आहे. तिच्या पूजेची आणि नियमित नंदादीप अन् चौघडा यांची उत्तम व्यवस्था राजाने ठेवली होती. शहरात बरीच देवळेे आहेत. तेथील सर्व देवांच्या पूजा, नैवेद्य आणि नंदादीप यासाठी संस्थानाकडून व्यय केला जाई. राजे गंगाधरबाबांच्या मृत्यूनंतर राणी लक्ष्मीबाईने ही सर्व व्यवस्था चोख ठेवली.

३. धर्माचरण करणारी राणी

झाशी संस्थानचे राजे गंगाधरबाबा यांचे निधन झाल्यावर संस्थानचा कारभार इंग्रजांनी स्वतःकडे घेतला. पती निधनानंतर राणीला केशवपन करण्याकरता श्री क्षेत्र प्रयाग येथे जायचे होते; पण त्यासाठी इंग्रज शासनाची अनुमती मिळणे आवश्यक होते आणि त्यास विलंब होत होता. लक्ष्मीबाईने त्यासाठी नियम ठेवला. तो म्हणजे केशवपन होईपर्यंत स्नानानंतर भस्मधारण करून, आचमन करून तीन कृच्छ्रांचा (प्रायश्चित्त) संकल्प करून तीन ब्राह्मणांस तीन रुपये प्रतिदिन देणे. राणी स्वतः प्रातःकाली स्नान उरकून श्वेत साडी परीधान करून तुळशी पूजनानंतर श्री पार्थिव लिंगाची नियमित पूजा करीत असे.

४. नियमित शारीरिक व्यायाम

लक्ष्मीबाईला लहानपणापासून व्यायाम करणे, नियमित घोड्यावरून रपेट करणे यांची आवड होती. झाशीची राणी झाल्यानंतरही ती पहाटे लवकर ऊठून मल्लखांबाची कवायत करत असे. नंतर घोड्यावर बसून रफेट करणे आणि लागलीच हत्तीवर बसून फेरफटका मारून येणे, हा तिचा दिनक्रम होता.

५. उत्तम अश्वपरीक्षक

राणी लक्ष्मीबाई एक उत्तम अश्वपरिक्षक होती. त्यासाठी तिचा त्या काळी नावलौकीक होता. एकदा एक घोडे विकणारा व्यापारी त्याच्याकडील दोन उमदे घोडे घेऊन श्री उज्जैन क्षेत्री राजे बाबासाहेब आपटे यांच्याकडे गेला; परंतु त्यांना परीक्षा करता आली नाही. त्यानंतर तो व्यापारी ग्वाल्हेरला श्रीमंत जयाजीराजे शिंदे यांच्याकडे गेला. त्यांनाही त्या घोड्यांची परीक्षा करता आली नाही.

शेवटी तो झाशी येथे आला. तेव्हा राणी लक्ष्मीबाईने आधी एका घोड्यावर रपेट मारली आणि तो घोडा उत्तम आहे असे सांगूून त्यास बाराशे रुपये देऊ केले. नंतर दुसर्‍या घोड्याची रपेट मारून आल्यावर त्याची किंमत राणीने केवळ ५० रुपये सांगितली आणि ‘तो घोडा छातीत दुखावला आहे’, हे कारण सांगितले. तेव्हा त्या व्यापार्‍याने ते मान्य केले. त्याआधी जेवढ्यांनी त्याची परीक्षा केली होती, तेवढ्यांनी दोन्ही घोडे समान शक्तीचेे आहेत, असेच सांगितले होते.

६. प्रजाहितदक्ष

एकदा झाशीमध्ये कडाक्याची थंडी चालू झाली. तेव्हा शहरातील १०००-१२०० भिकारी दक्षिण दरवाज्याजवळ जमा झाले. राणीची महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याची ती वेळ होती. तिने जमलेल्या लोकांविषयी दिवाणजींकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी ‘हे गरीब लोक थंडीपासून बचाव होण्यासाठी पांघरूण मिळावे, याची विनंती करत आहेत’, असे राणीस सांगितले. तिने आदेश दिला की, आजपासून चौथ्या दिवशी शहरातील सर्व गरीब लोकांना प्रत्येकी एक कान टोपी, अंगात घालायला एक बंडी आणि एक घोंगडी देण्यात यावी. त्याप्रमाणे साहित्याचे वाटप केले गेले.

६ अ. गुन्हेगारांना त्वरित शासन

झाशीच्या राज्यात बलवसागर म्हणून लहानसे शहर होते. तिथे जनतेला चोरांचा अतिशय उपद्रव होऊ लागला. तेव्हा स्वतः राणीने १५ दिवस त्या ठिकाणी तळ ठोकून चोरांचा बदोबस्त केला. कित्येक गुन्हेगारांना फाशी दिली आणि काहींना कैदेत ठेवले

७. रणरागिणी लक्ष्मीबाई

इंग्रजांनी साठ सहस्र फौजेनीशी झाशी शहराला वेढा दिला. ‘इंग्रजांशी निर्धाराने लढायचेच’, हे राणीने ठरवले होते. लढाईच्या पूर्वसिद्धतेकडे तिने स्वतः लक्ष दिले. इंग्रज सैन्यावर प्रथम तोफगोळा डागला गेला. त्या तोफेस राणीने स्वतः बत्ती दिली. अकरा दिवस तिने इंग्रजांना चांगलेच जेरीस आणले; पण फितुरीमुळे इंग्रजांना शहरात प्रवेश करणे सोपे झाले. स्वतः राणी तीन सहस्र फौज घेऊन इंग्रजांवर चाल करून गेली. निकराची लढाई झाली.

काल्पीकडे प्रयाण

काही सरदारांनी राणीस थोडे सैनिक सोबत घेऊन माघारी किल्ल्यात जाण्यास सांगितले. इंग्रजांची संख्या जास्त असल्याने निभाव लागणार नाही, हे राणीने ओळखले. निवडक १५०० सैन्य घेऊन राणी मध्यरात्री किल्ला सोडून काल्पीकडे जाण्यास निघाली आणि इंग्रज सैन्याचा वेढा भेदून राणीने काल्पीकडे प्रयाण केले. पाठीवर दत्तक पुत्राला बांधून, घोड्यावर स्वार होऊन, हातात बंदूक आणि कमरेला तलवार घेऊन ती लढतलढत वेढा भेदून बाहेर पडली. मात्र तिच्यासोबतचे बहुतेक सैन्य मारले गेले. एका दासीसोबत राणी काल्पीकडे वेगाने निघून गेली.

८. इंग्रजांसमवेत चे युद्ध हे धर्मयुद्ध !

काल्पीला राणीची भेट श्रीमंत नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्याशी झाली. पुढे ती त्यांच्या सोबत राहूनच इंग्रजांशी लढली. एके ठिकाणी इंग्रजांशी लढण्याकरीता राणी लक्ष्मीबाई मुख्य सरदारांसह स्वतः गेली. मोठी लढाई झाली; पण पराजय पत्करावा लागला. परत माघारी येतांना काल्पीजवळ एके ठिकाणी पूर्वी तिच्याकडे झाशी येथे चाकरीस असणार्‍यागोडसे भटजी यांची भेट झाली. त्या भेटीत राणीने त्यांना तिच्या १८५७ च्या उठावातील सहभागाविषयीची भूमिका सांगितली. राणी गोडसे भटजींना म्हणाली, “मी अदशेर आट्याची धनीण आहे. (झाशी कह्यात देऊन इंग्रजांनी दिलेल्या वेतनावर ती निवांत जगू शकली असती.) मजला रांडभुुंंडेस (विधवेस) काही एक जरुरी नव्हती; परंतु सर्व हिंदूंविषयी धर्मसंबंधांचा अभिमान धरून कर्मास प्रवृत्त जाहाले.”

९. लढता लढता मृत्यूस सामोरी जाणारी ‘मर्दानी’ झांसीवाली राणी !

श्रीमंत नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेर सर केले; परंतु पळून गेलेल्या जयाजीराजे शिंदे यांनी इंग्रजाच्या साहाय्याने पुन्हा आक्रमण केले. ग्वाल्हेर शहरात हातघाईची मोठी लढाई झाली. त्यात राणीस बंदुकीची गोळी लागली; परंतु त्याही अवस्थेत ती लढत होती. अखेरीस तलवारीचा घाव बसल्यामुळे ती गतप्राण होऊन घोड्यावरून खाली कोसळली.

तात्या टोपे यांनी त्वरित राणीचे कलेवर डोक्यावर घेतले आणि ते वेेढ्याबाहेर पडले. त्यांनीच राणीवर अंत्यसंस्कार केले. अशाप्रकारे धर्मासाठी बलिदान देणार्‍याराणी लक्ष्मीबाईस आजही ‘खूब लडी मर्दानी, वो तो झांसीवाली रानी थी ।’ असे जे गौरवतात, ते उगाच नव्हे !’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात