ओडिशा राज्यातील हिंदु संस्कृतीचा अद्भुत वारसा : श्री बिमलेश्वराचे झुकणारे मंदिर !

श्री बिमलेश्वर मंदिर

ओडिशा राज्यातील ऐतिहासिक संबलपूर शहर हे हिराकूड धरण आणि संबलपुरी साड्या यांंसाठी जगप्रसिद्ध आहे. या शहरापासून २३ कि.मी. अंतरावरील श्री बिमलेश्वराचे मंदिर हे ‘झुकणारे मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. इटली देशातील पिसा येथील झुलता मनोरा पहाण्यासाठी अनेक भारतीय लाखो रुपये खर्च करून तेथे जातात; मात्र आपल्याच देशातील हे आश्चर्य प्रसिद्धीपासून अत्यंत दूर आहे.

श्री बिमलेश्वराचे झुकणारे मंदिर

बाहेरून नेहमीच्या मंदिर प्रांगणाप्रमाणे दिसणा-र्यावास्तूत आम्ही प्रवेश केला अन् काय आश्चर्य त्या प्रांगणातील श्री बिमलेश्वराच्या मुख्य मंदिरासह अन्य सर्व लहान मंदिरे, दीपमाळ, मंदिराची संरक्षक भिंत सर्वकाही विशिष्ट कोनात झुकल्याचे दिसले ! त्यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले की, हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी असूनही ते आपोआप झुकत आहे.

‘महानदी’तील दैवी मासे

महानदीतील दैवी मासेमहानदीतील दैवी मासे

त्यांना मंदिराचा इतिहास विचारला असता, त्यांनी सांगितले की, अगोदर मंदिराच्या मागील बाजूस जाऊन आणखी एक आश्चर्य पाहू, मग इतिहास सांगतो. त्यानुसार मंदिराच्या मागील बाजूस गेलो असता ३०० मीटर अंतरावर एक मोठा घाट आणि नावाप्रमाणेच महानदी असणार्या नदीचा प्रवाह दृष्टीस पडला. घाटावरून उतरून नदीच्या पात्राजवळ गेल्यावर तांबूस-तपकिरी रंगाचे, वेगळ्याच प्रकारचे दैवी वाटणारे मासे मोठ्या संख्येने तेथे दिसले. त्यांनी सांगितले की, ‘या माशांना देवाचे मासे म्हणून ओळखले जाते आणि कोणीही त्यांना पकडण्याचा, मारण्याचा प्रयत्न करत नाही’. पावसाळ्यात जेव्हा नदीचा प्रवाह मोठा होतो, तेव्हा हे मासे प्रवाहासह न जाता, पाण्याखालून मंदिरापर्यंत एक गुहा आहे, तिच्यात जाऊन रहातात आणि कार्तिक महिन्यानंतर ते पुन्हा दिसू लागतात. त्या माशांना प्रसाद म्हणून लाडू खाऊ घातले जातात. तुम्ही पाण्यात हात घालून लाडू धरल्यास मासे येऊन तुमच्या हातातून लाडू घेऊन जातात !

मंदिराचा प्राचीन इतिहास

आम्ही घाटावरून पुन्हा मंदिराकडे जाऊ लागलो. तेथे मंदिराचा इतिहास प्रसिद्ध करणारे एक शिक्षक श्री. क्षीरूद्र प्रधान मंदिराचा इतिहास सांगू लागले. श्री बिमलेश्वराचे सध्याचे मंदिर संबलपूर येथील चौहान वंशातील ५ वे राजे बलियारसिंग देव यांनी ख्रिस्ताब्द १६७० मध्ये बांधले. एक गोमाता कळपातून बाहेर पडून महानदीचे पात्र पोहत पार करून एका विशिष्ट ठिकाणी दुधाने अभिषेक करत असे. त्या ठिकाणी गुराख्याने शोध घेऊन खोदले असता श्री बिमलेश्वराचे दर्शन झाले. तो तेथे नित्यनेमाने पूजाअर्चा करू लागला. त्याला एके रात्री तेथील राजा बलराम देव हा दर्शनासाठी आल्याचा दृष्टान्त झाला. त्यानंतर ही वार्ता तेथील राजा बलराम देव याच्या कानावर पडली, त्याने संपूर्ण राजघराण्यासह तेथे येऊन दर्शन घेऊन पूजा केली. राजाला नदीकाठचा तो निसर्ग-परिसर खूपच आवडल्याने त्याने तेथे एक लहानसे मंदिर बांधले. पुढे त्याच वंशातल्या बलियारसिंग देव या राजाने सध्याचे मंदिर बांधले. काही इतिहासकारांच्या मतानुसार राजा अनंगभीम देव याने मुख्य दगडी मंदिराचे बांधकाम केले. मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात असतांनाच अचानक मंदिर वायव्य दिशेने झुकले. सर्व जणांना याचे खूप आश्चार्य वाटले. बांधकाम पुन्हा करण्याचा विचार चालू असतांनाच राजाला श्री बिमलेश्वाराने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले, मला या झुकलेल्या मंदिरातच वास्तव्य करण्यास आवडेल. त्यामुळे ते मंदिर तशाच झुकलेल्या स्थितीत आजही उभे आहे.

श्री बिमलेश्वराचे पाताळलिंग

पातळलिंगपातळलिंग

श्री बिमलेश्वराचे शिवलिंग हे पाताळलिंग म्हणून ओळखले जाते. या शिवलिंगाला वरच्या बाजूस पिंड नाही, तर मध्यभागी मोठी पोकळी आहे. त्या पोकळीत ५ फुटावर पाणी असून ते वर्षभर त्याच स्थितीत असते. नदीचे पात्र पिंडीपासून किमान २०-२५ फूट खाली आहे; मात्र त्या पाण्याच्या स्तराचा येथे काहीही परिणाम होत नाही. मंदिरातील पुजारी शिवलिंगाच्या पोकळीतील पाणी काढून प्रसाद म्हणून प्राशन करण्यास देतो.

इतिहास

या मंदिराच्या संदर्भात एक इतिहासकार स्व. शिवप्रसाद दास यांनी मत मांडले की, महानदीच्या प्रचंड प्रवाहाच्या परिणामामुळे हे मंदिर झुकले आहे. काही कालावधीनंतर त्यांनी सांगितले की, तेथील माती सदोष असल्याने मंदिर झुकले आहे; मात्र या संदर्भात थोडासा विचार केला, तरी या दाव्यांतील पुढील फोलपणा लक्षात येईल.

१. सदोष मातीमुळे जर मंदिराचे बांधकाम झुकले असेल, तर मंदिराच्या जवळची अन्य बांधकामे आणि घरेही झुकलेलीच असायला हवी होती.

२. महानदीच्या प्रवाहामुळे जर हे काठावरील मंदिर झुकले असेल, तर नदीच्या काठावरील अन्य मंदिरेही झुकलेली असायला हवी होती.

याविषयी प्रा. पंडा यांचे म्हणणे आहे की, मंदिराच्या शिल्पकारांनी गुरुत्वाकर्षणाचा भार हलका करून मंदिराचे वजन अल्प करण्यासाठी अशी रचना केली असावी किंवा काही सदोष पद्धतीच्या बांधकामामुळेही मंदिर झुकले असावे; मात्र हे सांगतांनाच ते मान्य करतात की, ओडिशातील शिल्पकलेचा हा अद्भुत नमुना आजच्या आधुनिक विज्ञानातील तत्रज्ञांना एक आव्हानच आहे.

खरे तर बुद्धीने वा तर्काने हे समजून घेणे कठीण आहे. त्यासाठी श्री बिमलेश्वरावर श्रद्धाच असली, तर त्याच्याकडून शिकायला मिळेल. हे ईश्वराने दिलेल्या या संधीतून शिकायला मिळाले.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदू जनजागृती समिती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात