९. श्रीक्षेत्र पारगाव

मनपाडळे या तीर्थक्षेत्रापासून सुमारे ५ कि. मी. अंतरावर पारगाव हे गाव आहे. या गावात समर्थांनी शके १५७४ मध्ये मारुतीची स्थापना केली. अकरा मारुतींपैकी हा ‘पारगावचा’ मारुती म्हणून ओळखला जातो. मूर्ती सपाट दगडावर कोरलेली आहे. मूर्ती डावीकडे तोंड करून धावत चालली असून, मारुतीने केसाची शेंडी बांधलेली आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी ही मूर्ती सर्वात लहान असून फक्त दीड फूट उंचीची आहे.

या मंदिराचा मूळ घुमट हा ८ फूट लांबीरुंदीचा आहे. मंदिराला नव्यानेच सभामंडप बांधण्यात आला आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा शेवटचा मारुती असे समजले जाते.

पन्हाळ्यापासून काही अंतरावरच पारगाव हे ठिकाण आहे. या ठिकाणाबद्दल असे म्हटले जाते की, छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी हे स्वराज्याविषयी चर्चेसाठी या गावी येत असत. पन्हाळा व ज्योतिबा ही ठिकाणे या गावापासून अगदी जवळच आहेत.