रामनाथी, गोवा येथे वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला उत्‍साहपूर्ण वातावरणात प्रारंभ !

डावीकडून डॉ. एस्.आर्. लीला, रणजित सावरकर, सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र आणि सूत्रसंचालन करतांना सौ. क्षिप्रा जुवेकर

डावीकडून सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, दीपप्रज्वलन करतांना अधिवक्‍ता (पू.) हरिशंकर जैन, पूज्‍य संत श्रीराम ज्ञानीदास महात्‍यागी पू. भागिरथी महाराज, भागवताचार्य (अधिवक्‍ता) श्री. राजीवकृष्‍णजी महाराज झा आणि महंत श्री. दीपक गोस्‍वामी

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात एकत्र आलेली शक्‍ती हिंदु राष्‍ट्राच्‍या निर्मितीच्‍या कार्यात कृतीशील होईल ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

रामनाथी (फोंडा) – खालिस्‍तानी आतंकवाद, हिंदूंच्‍या सणांच्‍या दिवशी होणार्‍या दंगली, समलिंगी विवाहाचे समर्थन, ‘लिव्‍ह-इन-रिलेशनशीप’च्‍या व्‍यभिचाराला मान्‍यता, अश्‍लीलतेचे वाढते प्रस्‍थ यांसह अनेक समस्‍या हिंदूंपुढे आहेत. यांवर धर्मनिरपेक्ष राज्‍यव्‍यवस्‍थेत कोणतेही उत्तर नाही. शाश्‍वत हिंदु राष्‍ट्र हेच त्‍यावर उत्तर आहे. ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ म्‍हणजे हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचे लोकमंथन आहे. १० वर्षांपूर्वीच्‍या हिंदु राष्‍ट्राच्‍या विचारांच्‍या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. त्‍याप्रमाणेच पुढील १० वर्षांनंतर वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या बीजातून हिंदु राष्‍ट्र साकारलेले दिसेल. या मंथनात संघटित झालेली हिंदु शक्‍ती हिंदु राष्‍ट्राच्‍या निर्मितीच्‍या कार्यात कृतीशील होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. फोंडा (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्‍थान येथे १६ जून या दिवशी प्रारंभ झालेल्‍या वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या (११ व्‍या अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या) उद़्‍घाटनसत्रात हिंदुत्‍वनिष्‍ठांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. २२ जून पर्यंत चालणार्‍या या महोत्‍सवात राष्‍ट्र आणि धर्म यांविषयीच्‍या विविध विषयांवर मान्‍यवर त्‍यांचे विचार मांडणार आहेत.या वेळी व्‍यासपिठावर बेंगळुरु (कर्नाटक) येथील लेखिका डॉ. एस्. आर्. लीला, स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारकाचे कार्याध्‍यक्ष श्री. रणजित विक्रम सावरकर आणि पटना, बिहार येथील विश्‍व ज्‍योतिष महासंघाचे सभापती आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र हे उपस्‍थित होते.

या वेळी मार्गदर्शन करतांना सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्‍हणाले…

१. सध्‍याच्‍या ध्रुवीकरणाच्‍या काळात हिंदु जागृत होत आहेत; पण ‘भारताला हिंदु राष्‍ट्राकडे घेऊन जायचे असेल, तर धर्माच्‍या पक्षात कार्य केले पाहिजे’, हे सर्वच हिंदु संघटना आणि राजकीय पक्ष यांनी लक्षात घ्‍यायला हवे.

२. पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडियाच्‍या आतंकवाद्याकडे वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्‍लामिक राज्‍य करण्‍याच्‍या योजनेचे पुस्‍तक मिळाले. भारतातील मौलानाही इस्‍लामी राष्‍ट्राचा विचार मांडू लागले आहेत. भारताला इस्‍लामी राष्‍ट्र बनवू पहाणार्‍या या जिहाद्यांचे आव्‍हान भविष्‍यात हिंदु राष्‍ट्रापुढे असणार आहे.

३. सध्‍या देशभर चालू असलेल्‍या हिंदु राष्‍ट्राची जशी चर्चा होत आहे, तसे हिंदु राष्‍ट्राचे विरोधक विविध आक्षेप घेत आहेत. या आक्षेपांचे प्रत्‍युत्तर देण्‍याचे वैचारिक कार्य आपल्‍याला भविष्‍यात करायचे आहे.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ म्‍हणजे काय ?

‘हिंदु राष्‍ट्राची संकल्‍पना ही कोणतीही प्रादेशिक राष्‍ट्रवादाची संकल्‍पना नाही. ते आमच्‍या सनातन धर्मातील वैश्‍विक संस्‍कृती आणि विश्‍वदर्शन यांचे नाव आहे. हिंदू ‘चराचरात ब्रह्म आहे’, असे मानत असल्‍यामुळे त्‍याचा उपभोग घेण्‍याची हिंदूंची संस्‍कृती नाही. त्‍यामुळे भारतात हिंदु राष्‍ट्र स्‍थापन झाले की, त्‍याद्वारे विश्‍वकल्‍याणाचे कार्य होईल, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्‍यामुळे ‘सनातन भारत’ म्‍हणा, ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणा किंवा ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणा, या सर्वांचा अर्थ एकच आहे’, असे या वेळी सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले.

असा झाला उद़्‍घाटन सोहळा !

महोत्‍सवाच्‍या प्रारंभी सनातनचे पुरोहित श्री. अमर जोशी यांनी शंखनाद केला.  त्‍यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिस’चे पू. (अधिवक्‍ता) हरिशंकर जैन, गोंदिया येथील ‘तिरखेडी आश्रमा’चे संस्‍थापक पूज्‍य संत श्रीराम ज्ञानीदास महात्‍यागी, बेलतरोडी (नागपूर) येथील ‘श्री गुरुकृपा सेवा आश्रमा’चे संचालक अध्‍यक्ष पू. भागीरथी महाराजजी, धुळे येथील ‘श्रीरामजानकी सेवा समिती आणि श्‍यामसुंदर गोवर्धन गोशाळे’चे संस्‍थापक अध्‍यक्ष भागवताचार्य (अधिवक्‍ता) श्री राजीवकृष्‍णजी महाराज झा आणि जयपूर (राजस्‍थान) येथील ‘ज्ञानम् फाउंडेशन’चे संस्‍थापक एवं अध्‍यक्ष महंत श्री दीपक गोस्‍वामी यांच्‍या शुभहस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. त्‍यानंतर सनातनचे पुरोहित सर्वश्री अमर जोशी आणि सिद्धेश करंदीकर यांनी वेदमंत्रपठण केले.

श्रृंगेरी येथील दक्षिणाम्‍नाय श्री शारदापिठाचे जगद़्‍गुरु शंकराचार्य यांचे उत्तराधिकारी शिष्‍य जगद़्‍गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज यांच्‍या शुभसंदेशाचे व्‍हिडिओद्वारे प्रसारण करण्‍यात आले. यानंतर सनातनचे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या शुभसंदेशाचे वाचन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्‍याचे समन्‍वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी कर्नाटक येथील पेजावर मठाचे पेजावर श्री विश्‍वप्रसन्‍नतीर्थ स्‍वामीजी यांच्‍या संदेशाचे वाचन केले.

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ग्रंथांचे लोकार्पण !

डावीकडून भागवताचार्य (अधिवक्‍ता) श्री. राजीवकृष्‍णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, पूज्‍य संत श्रीराम ज्ञानीदास महात्‍यागी, अधिवक्‍ता (पू.) हरिशंकर जैन आणि महंत दीपक गोस्‍वामी

या वेळी व्‍यासपिठावरील मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ या सनातनच्‍या ग्रंथमालिकेतील ‘साधना प्रत्‍यक्ष शिकवण्‍याच्‍या पद्धती’ या हिंदी आणि मराठी भाषेतील ग्रंथांचे भागवताचार्य (अधिवक्‍ता) श्री. राजीवकृष्‍णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, पूज्‍य संत श्रीराम ज्ञानीदास महात्‍यागी, अधिवक्‍ता (पू.) हरिशंकर जैन, महंत दीपक गोस्‍वामी यांच्‍या शुभहस्‍ते लोकार्पण करण्‍यात आले.

‘निष्काम कर्मयोगी भीष्म’ या ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. दुर्गेश परुळकर, सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, आचार्य पी. पी. एम. नायर आणि यति मां चेतनानंद सरस्वती

यासह ठाणे येथील ज्‍येष्‍ठ लेखक आणि व्‍याख्‍याते श्री. दुर्गेश परुळकर यांच्‍या ‘महाभारतातील अलौलिक चरित्रे’ या मालिकेतील खंड १ ‘निष्‍काम कर्मयोगी भीष्‍म’ या ग्रंथाचे श्री. दुर्गेश परुळकर, सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, केरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर, प.पू. यती माँ चेतनानंद सरस्‍वती यांच्‍या शुभहस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करायला हवे ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

मुसलमान दिवसातून ५ वेळा नमाजपठण करतात. त्याप्रमाणे हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वेळ द्यावा. वीर सावरकर यांच्या विचारांनी जागरूक होऊन ‘हिंदु राष्ट्रासाठी मी काय करू शकतो’, याचा विचार हिंदूंनी करायला हवा. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी वेळ द्यावा. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करायचे असेल, तर प्रथम आपण हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून घ्यायला हवी. हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असेल, तर आपणाला वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करायला हवे. महंमद बीन कासीम याने भारतावर आक्रमण करतांना हिंदूंमध्ये फूट पाडून दाहिर राजाचा पराभव केला. प्रांत, भाषा, पंथ यांतील भेदामुळे हिंदूंचा पराभव होतो, हा आजवरचा इतिहास आहे. शिखांचे धर्मगुरु गुरुगोविंदसिंह यांनी स्वत:चा पंथ ‘खालसा’ असल्याचे म्हटले; परंतु धर्म ‘हिंदु’ असल्याचे सांगितले. सनातन हिंदु धर्म हाच आपला धर्म आहे. ‘हिंदुत्व हेच आपले राष्ट्रीयत्व आहे’, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आपण समजून घ्यायला हवेत. देशात हिंदू ८० टक्के आहेत; परंतु आपण जातीपातींमध्ये विभागले आहोत. !मुसलमान आपल्यावर अत्याचार करतात’, याचे कारण हिंदू एकत्र नाहीत. हा दोष हिंदूंचा आहे. आताची लढाई तलवारीच्या जोरावर नाही, तर आर्थिक लढाई चालू आहे. ‘हलाल जिहाद’ ही मुसलमानांची आर्थिक लढाई आहे. हिंदुत्व ही केवळ उपासनापद्धत नाही, तर हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हिदु राष्ट्रासाठी ग्रहांची स्थिती अनुकूल ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती (एशिया चॅप्टर), विश्‍व ज्योतिष महासंघ, पाटलीपुत्र, बिहार

आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती (एशिया चॅप्टर), विश्‍व ज्योतिष महासंघ, पाटलीपुत्र, बिहार

हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ हिंदूंसाठीच नाही, तर संपूर्ण अखिल मानवजातीसाठी आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र संपूर्ण मानवजातीला आणि सृष्टीला वाचवू शकते.  ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हिदु राष्ट्रासाठी ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. येणारा काळ आपत्काळ असल्याने आपल्या रक्षणासाठी सर्वांनी साधना वाढवून सतर्कता ठेवणे आवश्यक आहे.

१. भगवान श्रीकृष्णाने त्याच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता. तेव्हा सर्व गोपींनी त्याला त्यांच्या काठ्याही लावल्या होत्या. तेव्हा त्यांना वाटले, ‘श्रीकृष्ण ही सर्व माया रचतो आहे.’ तेव्हा भगवंताने त्याची करंगळी थोडीशी बाजूला केली. तेव्हा पर्वत खाली आला आणि भगवंताने परत करंगळीवर पर्वत उचलला.

२. नंतर गोपींना वाटले, ‘भगवंताने पर्वत उचलला आहे, तर आपण काठ्या कशाला लावायच्या ?’ म्हणून त्यांनी काठ्या काढल्या. तेव्हाही पर्वत खाली आला. त्यावरून आपण कर्तव्य कर्म केले, तरच भगवंताची कृपा रहाणार आहे, हे स्पष्ट होते.

३. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राची स्थापना भगवंत करणारच आहे; पण त्यासाठी आपल्यालाही आपले कर्तव्यही करावे लागणार आहे.

क्षणचित्र :

वर्ष २०१८  मध्ये वाराणसी येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू असतांना हिंदूंच्या बाजूने श्रीरामजन्मभूमीचा निवाडा आला. हा फार चांगला संकेत आहे, असे आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र यांनी आवर्जून सांगितले.

साम्यवादी विचारसरणी राष्ट्रहिताला हानीकारक ! – डॉ. एस्.आर्. लीला, माजी आमदार, तथा लेखक, बेंगळुरू, कर्नाटक

डॉ. एस्.आर्. लीला, माजी आमदार, तथा लेखक, बेंगळुरू, कर्नाटक

साम्यवाद्यांच्या नकारात्मक विचारसरणीच्या प्रभावामुळे देशात हत्याकांडे झाली. कार्ल मार्क्सच्या ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’मधील विचारांना बळी पडलेल्या लोकांनी भारतात साम्यवाद आणला. साम्यवादी विचारसरणी राष्ट्रहिताला हानीकारक आहे. १९८० च्या दशकात बर्‍याच देशांतील साम्यवाद संपुष्टात आला. रशियातील साम्यवादही संपुष्टात आला. चीनने जरी साम्यवादावर आधारित राज्यपद्धत चालू ठेवली असली, तरी त्याने त्याची मूळ संस्कृती जपली आहे. साम्यवादी विचारसरणी ही भारतीय आचार-विचारांच्या विरुद्ध आहे. भारतातील साम्यवादी हे भारतीय संस्कृतीचे वैरी आहेत. साम्यवाद्यांनी मुसलमानांना हाताशी धरून हिंदूंचा नरसंहार घडवून आणला. त्यांनी भारतीय संस्कृतीच नष्ट करण्याचा प्रयत्न केला. डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते की, साम्यवाद हा जंगलातील आगीसारखा आहे. डॉ. आंबेडकर हे खरे राष्ट्रवादी होते. त्यांनी सर्वप्रथम हिंदु राष्ट्राचा विचार मांडला होता.

मुसलमान हे मुळातच खूप आक्रमक आहेत. हिंदु-मुसलमान एकत्र नांदणे अशक्य आहे. ‘भारताची विभागणी करायची असेल, तर १०० टक्के मुसलमानांनी पाकिस्तानमध्ये जावे आणि हिंदुस्थान हिंदूंसाठी राहू दे’, असे मत डॉ. आंबेडकर यांनी मांडले होते. आपल्याशी सद्भावाने वागणार्‍या व्यक्तीशीच आपण सद्भावाने वागले पाहिजे. दुष्टवृत्तीने वागणार्‍यांपासून सज्जनांचे रक्षण केलेच पाहिजे, ही रामायणाची शिकवण आहे.

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​