हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची महत्त्वाकांक्षा : उद्धव ठाकरे

मुंबई : सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची आणि हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात आतंकवादी ठरवून खतम करण्याची (संपवण्याची) महत्त्वाकांक्षा आहे. शिकागोतील ‘हिंदु काँग्रेस’मध्ये भागवत यांनी या विषयावर भाष्य केले असते, तर बरे झाले असते. भाजपची काँग्रेस झाली आहे. काँग्रेसने मुसलमानांचे तरी लांगूलचालन केले. विद्यमान ‘हिंदुत्ववादी’ राजवटीत हिंदूंचे लांगूलचालन सोडा, त्यांना ‘सेक्युलर’ बनवले जात आहे. काँग्रेसकडून काँग्रेसकडे असा देशाचा प्रवास चालू झालाय, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे.

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,

१. सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदु धर्मावर अमेरिकेत जाऊन प्रवचन दिले आहे. त्यांचे हे प्रवचन शिकागो येथे झाले. स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील ऐतिहासिक भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘जागतिक हिंदु काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले. इकडे हिंदुस्थानात पंतप्रधान मोदी हे ‘काँग्रेसमुक्त भारत’ निर्माण करत आहेत. ‘काँग्रेेस ही जणू शिवीच आहे’, असा विचार रुजवला जात आहे; पण शेवटी हिंदूंचे जे जागतिक संमेलन पार पडले, त्यास ‘हिंदु काँग्रेस’ असेच संबोधण्यात आले.

२. हिंदूंमध्ये वर्चस्व गाजवण्याची कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही, आक्रमकता नाही. एक समाज म्हणून हिंदूंनी एकत्र यायला हवे आणि मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मोहन भागवतांनी हिंदु काँग्रेसमध्ये सांगितले. हा हिंदूंवर केलेला आरोप आहे. हिंदूंनी आक्रमक व्हायचे म्हणजे काय करायचे ? आणि आक्रमक झालेल्या हिंदूंना त्यांच्याच राज्यात कायद्याच्या रणगाड्याखाली चिरडले जाणार असेल, तर त्यावर संघाच्या पोतडीत कोणते चूर्ण आहे ? हिंदूंमध्ये वर्चस्व गाजवण्याची महत्त्वाकांक्षा होती, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि बाजीराव पेशव्यांनी हिंदुत्वाचा जरीपटका अफगाणिस्तानच्या, पाकिस्तानच्या अटकेपार फडकवला. तात्या टोपे, मंगल पांडेपासून वीर सावरकरांपर्यंत अनेकांनी हिंदु वर्चस्वासाठीच ब्रिटिशांना झुंजवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाचाच पुरस्कार केला आणि ‘सावरकरांप्रमाणे हिंदूंनी शस्त्रसज्ज व्हावे’, हा संदेश त्यांनी दिला.

३. हिंदू आक्रमक नसता, तर अयोध्येतील बाबरीचा कलंक पुसला गेला नसता आणि हे सर्व घडवण्यामागे शिवसेनेचेच आक्रमक हिंदुत्व होते. वर्ष १९९२-९३ च्या मुंबईतील दंगलीत शिवसेनेचे आक्रमक हिंदुत्व नसते, तर येथील समस्त हिंदूंची काय भयंकर स्थिती झाली असती ? त्या वेळी हे सर्व जागतिक हिंदु काँग्रेसवाले कुठे लपले होते ? शिवसेनाप्रमुखांनी मुंबईत ‘दम’ भरताच वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडत गेल्या आणि अतिरेक्यांच्या हिरव्या लुंग्या पिवळ्या पडल्या; पण जे हिंदू म्हणून सत्तेवर आले त्यांनी काय केले ? हिंदु आक्रमक आणि एकजूट होते म्हणूनच मोदी हे पंतप्रधान झाले. त्या एकजुटीला आणि आक्रमकतेला काय फळ मिळाले ? शिवसेनेशी युती तोडून हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला, हे  हिंदूंनी पाहिले आणि जे जे आक्रमक हिंदुत्वाचा, राष्ट्रहिताचा पुरस्कार करू लागले, ते ते भाजपचे शत्रू ठरू लागले.

४. हिंदुत्वाची शिडी करून सत्तेवर यायचे आणि काम होताच शिडी फेकायची, हे असले हिंदुत्व सध्या चालू आहे. शिकागोत हिंदूंची जी काही जागतिक काँग्रेस भरली ते नेमके कोण होते ? त्या काँग्रेसला जे दोन-चार सहस्र प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांचा आगापिछा काय ? शिवसेनेसारखे पक्ष हे लपूनछपून नाही, तर उघडपणे हिंदुत्वाचा आक्रमक पुरस्कार करतात. हिंदुत्व हाच आमचा पंचप्राण आहे. तुमच्या जागतिक हिंदु काँग्रेसमध्ये शिवसेनेला स्थान का नाही ?

५. शिवसेनेसारख्या इतरही लहानमोठ्या संघटना असू शकतात आणि आपापल्या मगदुरानुसार ते लोक हिंदुत्वाचे काम करत असतात. त्यांच्याही प्रतिनिधींना तुमच्या जागतिक हिंदु काँग्रेसमध्ये स्थान द्यायला हरकत नव्हती. तुम्हाला हिंदू एकवटायचा आहे ना, मग ही अस्पृश्यता कशासाठी ? हिंदु समाज आज निराश झाला आहे. काँग्रेसने मुसलमानांना वापरले, तसे भाजप हिंदूंना वापरत असल्याची भावना बळावत आहे.

६. नेपाळमधील हिंदुत्व संपवले गेले आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी त्यावर गप्प बसले आहेत. नेपाळ हा चीन आणि पाकिस्तान यांचा अड्डा बनला आहे. काश्मिरात हिंदु म्हणून आक्रमक होण्याचे बाजूला राहिले, उलट हिंदूंविरोधी आणि पाकप्रेमी मेहबुबाच्या प्रेमात हिंदु राष्ट्रवाले पडले अन् काश्मिरी हिंदूंना दगा दिला. हे सर्व घडत असतांना सरसंघचालकांकडून आक्रमक प्रतिक्रियेची अपेक्षा होती. हिंदूंना दिलेले एकही वचन भाजप सरकार पूर्ण करू शकलेले नाही. मग ते राममंदिराचे असेल, नाही तर समान नागरी कायद्याचे. हा सर्व आक्रमक हिंदुत्वाचाच अजेंडा होता; पण सत्तेवर येण्याआधीचे आक्रमक हिंदुत्व नंतर आळूच्या फतफत्यासारखे का झाले ? यावर ‘जागतिक हिंदु काँग्रेस’मध्ये साधकबाधक चर्चा घडायला हरकत नव्हती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​