चहाचे गंभीर दुष्परिणाम !

१५ डिसेंबर अर्थात ‘जागतिक चहा दिन’ आहे. त्या निमित्ताने…

१. अ. ‘कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे ‘अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट’ नामक पदार्थ केवळ कोर्‍या चहात आहे. दूधसाखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य (भूक अल्प होणे) घडवणारा असतो.

१. आ. दिवसाला ७ ते ३० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.

२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, तहान, पक्षाघातासारखे वातविकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणे, असे विकार बळावतात.

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा आणि उष्णगुणाचा आहे.

५. टपरीवर चहा अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, तसेच एप्रिल, मे आणि ऑक्टोबर या मासात सर्वांनी चहा जपून अल्प प्रमाणात प्यायला हवा.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’

८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही. हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे, हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

१०. चहा समवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला मारक बनतो.

– वैद्य महेश ठाकूर, कार्यवाह, आयुर्वेद विद्यापीठ (ठाणे जिल्हा)
संदर्भ : दैनिक लोकसत्ता, ऑक्टोबर २०००