स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी घडलेला असाच एक प्रसंग येथे देत आहे. स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी ‘सर्व धर्म परिषदे’च्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो (अमेरिका) येथे गेले होते. तेव्हा त्यांनी ती धर्मपरिषद श्रोत्यांची मने जिंकून तेथे ‘न भूतो न भविष्यति !’ असा विलक्षण प्रभाव निर्माण केला. त्यामुळे सनातन हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व पाश्चात्त्यांसमोर प्रभावीपणे आणि समर्थपणे ठसले. त्या वेळी स्वामी विवेकानंदांना तेथील अनेक संस्थांतर्फे व्याख्यानांसाठी निमंत्रणे मिळू लागली. त्यात त्यांनी ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, राजयोग हे विषय प्रभावीपणे मांडले. सर्व श्रोतृवृंद अगदी मंत्रमुग्ध होऊन आणि देहभान हरपून त्यांच्या निरूपणाचा आस्वाद घेत असायचा. या प्रासादिक निरूपणाच्या वलयातून श्रोते जेव्हा भानावर यायचे, तेव्हा त्यांच्या मध्ये पुढील विषय ऐकून घेण्यासंबंधी तीव्र उत्कंठा जागृत होत असे.

एकदा अशाच एका कार्यक्रमाच्या समारोपानंतर उत्कंठित झालेल्या श्रोत्यांनी स्वामी विवेकानंद यांना घेराव घातला आणि तीव्र जिज्ञासेपोटी ते त्यांना प्रश्न विचारू लागले, ‘‘हे महन् तपस्वी, स्वामी ! आपण हे अलौकिक ज्ञान कुठल्या शाळेत अथवा महाविद्यालयात संपादन केले ? कृपा करून आम्हाला यासंबंधी विस्ताराने सांगाल का ?’’ त्यावर स्वामी विवेकानंद उत्तरले, ‘‘अवश्य. हे अमूल्य असे ज्ञान मला केवळ माझ्या गुरुदेवांकडूनच प्राप्त झाले आहे.’’ तेव्हा श्रोतृवृंदांनी अधीरतेने प्रश्न विचारला, ‘‘आपले गुरु कोण आहेत ?’’ स्वामी विवेकानंदांनी सांगितले, ‘‘तुमची जर या संबंधी ऐकण्याची तीव्र जिज्ञासा असेल, तर आम्ही अवश्य सांगू.’’

त्याच दिवशी स्वामी विवेकानंदांच्या विशेष प्रवचनाचे आयोजन केले गेले. प्रवचनाच्या विषयाचे नाव होते, ‘माझे गुरुदेव’ त्या संबंधी वर्तमानपत्रातून पुष्कळ प्रसिद्धी केली गेली. त्यामुळे कुतुहलापोटी हे व्याख्यान ऐकण्यासाठी अफाट असा जनसागररूपी श्रोतृसमुदाय उपस्थित होता. व्याख्यानाच्या नियोजित वेळी स्वामी विवेकानंद संबोधन करायला जेव्हा व्यासपिठावरील आसंदीवरून उठून उभे राहिले, तेव्हा एकदम नीरव शांतता निर्माण झाली. ते सद्गुरूंसंबंधी बोलण्यासाठी उभे राहिल्यावर उपस्थित असलेल्या अफाट जनसागररूपी श्रोतृवृंदांकडे पाहून त्यांच्या मनात सद्गुरूंविषयी कृतज्ञतेचा भाव दाटून आला. जेव्हा त्यांनी बोलण्यास प्रारंभ केला, तेव्हा त्यांच्या मुखातून पहिले वाक्य बाहेर पडले, ते म्हणजे ‘माझे गुरुदेव !’ हे वाक्य अतिशय सद्गदित अशा अंतःकरणाने म्हणजे भावाने ओतप्रोत असलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्याकडून उच्चारले गेले होते.

त्यांनी भावपूर्ण उच्चारलेल्या वाक्यामुळे त्यांच्या डोळ्यांसमोर साक्षात गुरूंचे रूप उभे राहिले. सद्गुरूंचे रूप साक्षात डोळ्यांसमोर उभे राहिल्याचे त्यांनी अनुभवल्यामुळे त्यांचा कंठ दाटून आला. डोळ्यांतून घळाघळा अश्रूधारा वाहू लागल्या आणि अंग रोमांचित होऊन थरथर कापू लागले. त्यामुळे त्यांना १० मिनिटे काही बोलवतच नव्हते. त्यांची ही अवस्था पाहून श्रोते अगदी आश्चर्यचकित झाले. श्रोत्यांच्या आश्चर्यचकित होण्यामागील कार्यकारणभाव अगदी सोपा होता. शरिराला मार लागणे, फार दुखापत होणे किंवा आई-वडील, जवळचे नातेवाईक यांचा मृत्यू यांविना त्यांनी डोळ्यांमधून अश्रूप्रवाह वाहिल्याचे यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे ते सर्व जण अगदी वेड्यासारखे स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहू लागले.

‘गुरोर्मौनं तु व्याख्यानं शिष्यस्तु छिन्नसंशयः ।’

अर्थ : गुरूंनी शिष्याला केवळ मौनात शिकविले आणि शिष्याने ते केवळ मौनातच ग्रहण केले.

या प्रसंगावरून स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये त्यांचे सद्गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याविषयी किती अपार भावशक्ती जागृत होती, हे लक्षात येते.

– श्री. राजहंस,पनवेल.