भगवे ध्वज हटवण्यासाठी दबाव आणणार्‍या कुर्ला पोलिसांकडून मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाईस टाळाटाळ !

हिंदूंना कायद्याचा बडगा दाखवणारे आणि धर्मांधांपुढे नांगी टाकणारे पोलीस कायदा अन् सुव्यवस्था काय राखणार ?

मुंबई : कुर्ला येथील छत्रपती शिवराय जन्मोत्सव सोहळा समितीने शिवजयंतीच्या मिरवणुकीत लावलेले भगवे ध्वज काढण्यासाठी आचारसंहितेचे कारण पुढे करून स्थानिक शिवप्रेमी मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणणारे कुर्ला पोलीस ठाण्यातील पोलीस मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. शिवजयंतीच्या दुसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रे असलेले बॅनर काढणारे मुंबई महानगरपालिका प्रशासन मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्यास सिद्ध नाहीत. २४ मार्च या दिवशी कुर्ला पोलीस ठाण्यात मिर्झावाडीतील मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात स्थानिकांनी १ नव्हे तब्बल ९ तक्रारी केल्या आहेत. शिवप्रेमींना पोलीस ठाण्यात बोलावून दबावतंत्राचा वापर करणारे कुर्ला पोलीस ठाण्यातील पोलीस भोंग्यांच्या विरोधातील तक्रारींवर कारवाई करण्यास मात्र टाळाटाळ करत असल्याचे पहायला मिळत आहे. भोंग्यांवर कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे नसून हे पालिकेच्या कक्षेत येत असल्याचे सांगत स्वत:चे दायित्व झटकण्याचा प्रकार कुर्ला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी करत आहेत.

कुर्ला परिसरातील मिर्झावाडीतील न्यू मिल मार्गावरील मशिदीवरील अनधिकृत भोंग्याची तक्रार २४ मार्च या दिवशी कुर्ला पोलीस ठाण्यात केली आहे. जय अंबिका सेवा मंडळाचे श्री. मनीष नांदला, शूर संभाजी क्रीडामंडळ (कुर्ला ५)चे श्री. उमेश मोरे, संत रोहिदास चर्मकार विकास सेवा संस्था (कुर्ला)चे श्री. संतोष देवरे, अष्टविनायक मित्रमंडळाचे श्री. रवींद्र बनसोडे, स्वामिल गिरणी कामगार वसाहत, कुर्ला (प.)चे श्री. संतोष नाईक, नैनसी चाळ गणेश सेवा मंडळाचे श्री. मधुकर बहिरट आदींसह ९ जणांनी स्वतंत्रपणे या मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे; मात्र कुर्ला पोलिसांनी या तक्रारींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. (सहिष्णु हिंदूंना कायद्याचा बडगा दाखवून घाबरवायचे आणि धर्मांधांपुढे नांगी टाकायची, हीच पोलीस अन् प्रशासन यांची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची व्याख्या आहे का ? मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याविषयी न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही त्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य ना पोलीस दाखवतात ना प्रशासन ! हिंदूंना दुजाभाव देणारी अशी लोकशाही काय कामाची ? यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

(म्हणे) ‘मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई केल्यास कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होईल !’ – कुर्ला पोलिसांचे न्यायालयाला लेखी उत्तर

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्याचे धाडस नसणारे पोलीस हवेच कशाला ? सरकार अशा पोलिसांवर आणि अनधिकृत भोंग्यांवर काय कारवाई करणार आहे, हे त्याने स्पष्ट केले पाहिजे !

मुंबई : येथील उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण करणार्‍या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देऊनही मुंबईतील पोलीस यंत्रणेने एकाही मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केलेली नाही. याविषयीची कुर्ला पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी २८ जानेवारी २०१७ या दिवशी न्यायालयाला लेखी सादर केलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे, ‘कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकत असल्याने (अनधिकृत भोंग्यांवर) कारवाई केलेली नाही.’

याविषयी बजरंग दलाचे श्री. सागर देवरे यांनीही कुर्ला येथील अनधिकृत भोंग्यांचा त्रास होत असल्याविषयी १८ ऑक्टोबर २०१४ या दिवशी पोलिसांकडे तक्रार केली होती; मात्र तक्रार करून अडीच वर्षे झाली, तरी पोलिसांनी सकृतदर्शनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे श्री. देवरे यांनी माहिती अधिकाराखाली साहाय्यक माहिती अधिकारी आणि साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे विचारणा केली असता पोलिसांनी ‘कायदा आणि सुव्यवस्था यांमुळे भोंग्यांवर कारवाई करू शकत नाही’, असे उत्तर दिले. (मंदिरांना अनधिकृत ठरवून पाडणे, भगवे ध्वज काढणे, गणेशोत्सव-नवरात्रोत्सव कालावधीत ध्वनीमर्यादा ओलांडल्याच्या नावाखाली मंडळांवर कारवाई करणे, यांमुळे कधी कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होत नाही; मात्र मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करायची झाल्यास तो निर्माण होतो. यावरून देशात असहिष्णु कोण आहेत, हे पुरो(अधो)गामी, तथाकथित विचारवंत, लेखक, साहित्यिक आदी मंडळी लक्षात घेतील तो सुदिन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

शिवजयंतीच्या दिवशी हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर भगवा ध्वज फडकवण्यास पुरातत्व विभागाची मनाई !

  • पुरातत्व विभागाची मोगलाई !
  • हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर भगवा ध्वज फडकवायचा नाही, तर पाकिस्तानचा ध्वज फडकवायचा का ?
  • प्रथम अफझलखानवधाचा फलक लावण्यास आणि आता भगवा ध्वज फडकवण्यास विरोध करणारे सरकार अन् त्यांचे प्रशासन उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यावरही बंदी घालण्यास मागे-पुढे पहाणार नाही, हे लक्षात घ्या ! असे होऊ न देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या महाराष्ट्रात भगवा ध्वज फडकवण्यास पुरातत्व विभागाने मनाई करणे लज्जास्पद ! छत्रपती शिवाजी महाराज यांना असे स्वराज्य अपेक्षित होते का ?, याचा हिंदूंनी गांभीर्याने विचार करावा आणि वेळीच हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सिद्ध व्हावे अन्यथा पुढे भगवा ध्वज फडकवणे, हीसुद्धा धर्मांधता ठरेल !

मुंबई : रायगडाला स्वराज्याची राजधानी करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यावर भगवा ध्वज डौलात फडकवला. त्याच रायगडावर भगवा ध्वज फडकवायला स्वराज्यातील पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी विरोध केला. २३ मार्च या दिवशी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असतांना रायगडावरील नगारखान्यापुढे असणार्‍या ध्वजस्तंभावर ‘कोकण कला मित्रमंडळा’च्या वतीने भगवा ध्वज फडकवण्यात येत होता; मात्र पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांच्या सूचनेवरून तेथील सुरक्षारक्षकांनी या ठिकाणी भगवा ध्वज फडकवण्याला अनुमती नाकारली.

या वेळी सहस्रावधी शिवप्रेमींनी ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’, या घोषणा देऊन संताप व्यक्त केला. त्यानंतर पुरातत्व विभागाचे अधिकारी जंगले यांनी थोड्या कालावधीसाठी भगवा ध्वज फडकवण्याची अनुमती दिली.

येथील ध्वजस्तंभावर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी, असे २ दिवस स्थानिक तहसीलदारांच्या उपस्थितीत तिरंगा फडकवला जातो. पुरातत्व विभागाचे रायगड किल्ला निरीक्षक अशोक जंगले याविषयी म्हणाले, ‘‘सध्या ‘रायगड किल्ला संवर्धन योजने’च्या अंतर्गत विकासकामे चालू आहेत. विविध संघटना आणि संस्था यांच्याकडून रायगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात; मात्र याकरता पुरातत्व विभागाकडून पूर्वअनुमती घ्यावी लागते. शासनाच्या निर्देशानुसारच आम्ही आदेशाचे पालन करत आहोत.’’

हिंदवी स्वराज्याच्या राजधानीवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी अनुमती घ्यावी लागणे, ही शोकांतिका ! – सुरेश पवार, अध्यक्ष, कोकण कडा मित्रमंडळ

निदान शिवजयंती, शिवराज्याभिषेक अशा सोहळ्यांच्या प्रसंगी तरी ध्वजस्तंभावर भगवा ध्वज फडकवण्यात यावा. हिंदवी स्वराज्याच्या राजधानीवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी अनुमती घ्यावी लागते, ही मोठी शोकांतिका आहे. जर कोणी आमचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आंदोलन करू.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​