(म्हणे) ‘पोलिसांचे अन्वेषण चुकीचे : हिंदू अधिवेशनात प.पू. साध्वी सरस्वती यांच्या वक्तव्यामुळे क्रॉस तोडफोडीच्या घटना !

  • चर्च संस्थेने नेमलेल्या (अ)सत्यशोधन समितीच्या पूर्वग्रहदूषित अहवालात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर दोषारोप !

  • गोव्यातील ‘क्रॉस’चे तोडफोड झाल्याचे प्रकरण !

पणजी : चर्च संस्थेने राज्यातील ‘क्रॉस’च्या तोडफोडीच्या प्रकरणांना अनुसरून नेमलेल्या एका (अ)सत्यशोधन समितीने या प्रकरणी त्यांचा अहवाल २१ ऑगस्ट या दिवशी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सार्वजनिक केला आहे. या अहवालात पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करून पकडलेल्या संशयित फ्रान्सिस परेरा याला ‘क्लीन चीट’ देतांना पोलिसांचे अन्वेषण चुकीचे असल्याचा दावा केला आहे. राज्यातील ‘क्रॉस’ची तोडफोड ही जून मासात झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात प.पू. साध्वी सरस्वती यांनी गोमांस भक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे झाल्याचा धडधडीत खोटा आरोप करण्यात आला आहे. (फ्रान्सिस परेरा याच्या अटकेने चर्चचे हिंदुत्वनिष्ठांना गुन्हेगार ठरवण्याचे कारस्थान कोलमडले. त्यामुळे परेरा यांच्या विरोधात सक्षम पुरावे मिळूनही चर्च संस्था अहंकारापोटी सत्य मान्य करायला सिद्ध नाही. त्यासाठी ती असत्याचा आधार घ्यायलाही सिद्ध झाली. प.पू. साध्वींच्या गोमांस भक्षणाच्या वक्तव्यावरून ख्रिस्त्यांच्या भावना दुखावल्या असत्या, तर ते भडकले असते आणि त्यांनी चिडून हिंदूंच्या श्रद्धास्थानांची तोडफोड केली असती. प.पू. साध्वींच्या गोमांस भक्षणाच्या सूत्रावरून हिंदू कशाला क्रॉसची तोडफोड करतील ? अशा अहवालावर कोण विश्‍वास ठेवणार ? चर्च संस्थेने मात्र त्यांची धर्मांधता दाखवून दिली आहे, हे हिंदूंनी जाणावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. या अहवालात हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. चर्च संस्थेच्या सदस्यांनी पणजी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हा अहवाल प्रसिद्ध केला. विशेष म्हणजे पणजी मतदारसंघाच्या २३ ऑगस्ट या दिवशी होणार्‍या पोटनिवडणुकीच्या दोन दिवस आधी चर्च संस्थेच्या भूमिकेचा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी हा अहवाल एक पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध केला आहे.

२. या अहवालात मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात वक्तव्य करणार्‍या प.पू. साध्वी सरस्वती यांच्यावर कोणतीच कारवाई न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

३. चर्च संस्थेने नेमलेल्या सत्यशोधन समितीमध्ये चर्च संस्थेशी निगडित ‘समाज आणि निधर्मीवाद (सेकुलरीझम्) अभ्यास केंद्र’ आणि ‘सामाजिक न्याय आणि शांती मंडळ’ या दोन्ही संघटनांचे पाच सदस्य नेमण्यात आले होते.

४. या समितीने केलेल्या सर्वेक्षणात दक्षिण गोव्यात गेल्या १५ वर्षांत झालेल्या ख्रिस्त्यांच्या क्रॉसच्या तोडफोडीच्या १५० घटना आणि ४० दफनभूमीतील क्रॉसच्या तोडफोडीची नोंद घेण्यात आली आहे; मात्र या काळात झालेल्या हिंदूंच्या धार्मिक स्थळांचा साधा उल्लेखही या समितीच्या अहवालात करण्यात आलेला नाही.

५. हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर खोटे आरोप

या अहवालात पहिल्याच दोन परिषच्छेदांमध्ये ‘हिंदु धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असलेली सनातन संस्था समाजात धार्मिक तणाव निर्माण करत आहे’, असा खोटा आरोप करण्यात आला आहे. (सनातन संस्था आणि सनातन प्रभात या खोट्या आरोपांच्या अनुषंगाने ‘समाज आणि निधर्मीवाद (सेकुलरीझम्) अभ्यास केंद्र’ आणि ‘सामाजिक न्याय आणि शांती मंडळ’ या दोन्ही संघटनांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी अधिवक्त्यांचे समुदेशन घेत आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यात म्हटले आहे की, सनातन संस्थेच्या मते ‘दुर्जनांचा नाश’ म्हणजे देशातील अल्पसंख्यांकांचा नाश करणे. सनातन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या साहित्यामध्ये हिंसेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. सनातन संस्था ‘सनातन प्रभात’ या नावाने एक दैनिक प्रकाशित करतेे. या दैनिकाच्या एका अंकात बायबल हे अनैतिकता शिकवत असल्याचे म्हटले आहे. तसेच दैनिकात ख्रिस्ती धर्मगुरु (ब्रदर) ननवर (सिस्टरवर) बलात्कार करत असल्याच्या सूत्रांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.

(दैनिक सनातन प्रभात हे एकमेव दैनिक ख्रिस्ती धर्मगुरूंच्या अनैतिकतेविषयीच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वस्तूनिष्ठ बातम्या निर्भिडपणे छापते. वस्तूनिष्ठ बातम्या छापल्यावरूनही आक्षेप घेणे, हा चर्चप्रणित सत्यशोधन समितीचे दबावतंत्र आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या दैनिकात ‘फादर’ हे इतर धर्मियांचे धर्मांतर करणारे असे दर्शवण्यात येते आणि त्यांच्या डोक्यावर शिंगे लावलेली दाखवण्यात येतात. (या गोष्टी प्रतिकात्मक असतात, हेही चर्च संस्थेला समजत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

६. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात प.पू. साध्वी सरस्वती यांनी गोमांस भक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे तोडफोडीच्या घटना घडल्याचा खोटा आरोप

‘गोमांस’ खाणार्‍या अल्पसंख्यांकांना ‘विपरीत परिणाम होईल’, अशी धमकी दिली जात आहे. जून २०१७ मध्ये क्रॉसच्या तोडफोडीचे मोठे सत्र चालू होण्यापूर्वी हिंदु जनजागृती समितीने एक मोठे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन भरवले होते. या अधिवेशनात विद्वेष पसरवणारी भाषणे झाली. (असे सत्यशोधन समिती कोणत्या आधारावर म्हणत आहे ? त्यांनी किती भाषणे ऐकली आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘गोमांस खाणार्‍यांना मारा’, असे भाषण साध्वी सरस्वती यांनी केले. ‘हिंदूंनी शस्त्र बाळगावे’, असे आवाहनही साध्वी सरस्वती यांनी केले; मात्र तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली कारवाई करणे शक्य असूनही कारवाई करण्यात आली नाही. (पोलीस आणि शासन यांच्यापेक्षा समितीला अधिक कळते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

सनातन संस्था ही अल्पसंख्यांकविरोधी संस्था आहे. (असे कोणत्या आधारावर समिती म्हणत आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) राज्यातील क्रॉसची तोडफोड ही जून २०१७ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील प.पू. साध्वी सरस्वती यांच्या गोमांस भक्षकांच्या विरोधी द्वेषमूलक वक्तव्यामुळे झालेली आहे. या द्वेषमुलक भाषणानंतर क्रॉसची तोडफोड होणे हा योगयोग होऊ शकत नाही. (प.पू. साध्वी सरस्वती यांचे गोमांसविषयक मत आणि क्रॉसची तोडफोड यांचा काय संबंध ? वर्ष २००४ पासून वर्ष २०१० पर्यंत धार्मिक श्रद्धास्थानांची तोडफोड होत होती. त्या वेळी प.पू. साध्वी बोलल्या होत्या का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

७. संशयित फ्रान्सिस परेरा याला ‘क्लीन चीट’

अहवालात धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या प्रकरणांना अनुसरून पकडलेल्या संशयित फ्रान्सिस परेरा याला ‘क्लीन चीट’ देण्यात आली आहे. पद्धतशीरपणे केवळ क्रॉसचीच तोडफोड करण्यात आली आहे. (समितीला याच कालावधीत नंदी आणि तुळस यांची तोडफोड झाल्याचे वृत्त ठाऊक नाही कि जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी पोलीस अन्वेषण सुस्तपणे करण्यात आले आणि हे अन्वेषण राजकीय प्रभावाखाली झाले. नागरिक आणि ‘सिव्हील सोसायटी’ यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी ‘बळीचा बकरा’ म्हणून फ्रान्सिस परेरा याला कह्यात घेतले. पोलिसांच्या मते संशयित परेरा याची मानसिक स्थिती योग्य नव्हती; म्हणून त्याने तोडफोड केली; मात्र संशयित फ्रान्सिस याला कह्यात घेऊनही तोडफोडीच्या घटना चालूच राहिल्या. मडकई येथे क्रॉसची तोडफोड करण्यात आली. मडकई येथील तोडफोड प्रकरणी झारखंड येथील एका वेड्या मनुष्याला पुन्हा ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आले. दोन वेड्या व्यक्ती गोव्यातील क्रॉसची तोडफोड करू शकतात, हे पटण्यासारखे नाही. चिंबल येथे झालेल्या क्रॉसच्या तोडफोडीला अनुसरून पोलिसांनी न पटणारी गोष्ट सांगितली. एका गुराने हा क्रॉस टाकल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे गोळा करण्याऐवजी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. (पोलिसांपेक्षा समितीला अधिक कळते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हे प्रस्ताव आहेत कि चौकशी पथकावरील दबाव ?

८. (अ)सत्यशोधन समितीने मांडलेले प्रस्ताव

अ. तोडफोडीच्या प्रकारांच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांच्या निरीक्षणाखाली विशेष चौकशी पथक नेमावे. या चौकशी समितीने राजकीय आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या दृष्टीकोनांतूनही चौकशी करावी.

आ. धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे करणार्‍यांवर भारतीय दंड संहिता कलम १५३ अ आणि २९५ अ खाली कारवाई करावी.

इ. सुबुद्ध समाजाने धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या शक्तींच्या विरोधात चळवळ राबवावी आणि असे कृत्य करणार्‍यांवर कारवाई करण्यास सरकारला बाध्य करावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​