‘भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित करा’ – आमदार टी. राजा सिंह यांचे प्रतिपादन

अकोला (महाराष्ट्र) – तेलंगणाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी अकोल्याच्या ऐतिहासिक भूमीत हिंदुत्वाचा नवा मंत्र फुंकला असून भारताला आता अधिकृतपणे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची वेळ आली आहे, असा संकल्प त्यांनी येथे व्यक्त केला. अकोल्यातील श्री एकवीरा मैदानावर आयोजित भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेत उसळलेला १६ हजारांहून अधिक हिंदूंचा जनसागर पाहून, अकोल्यातील हिंदूंच्या जागृत स्थितीचे त्यांनी भरभरून कौतुक केले.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित या सभेला प्रामुख्याने पू. श्री ईश्वरदास महाराज, पू. बालकदास महाराज आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. संतांच्या आशीर्वादाने आणि वेदमंत्रांच्या जयघोषात सभेची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचीही ओजस्वी भाषणे झाली.
कल महाराष्ट्र के अकोला में हिन्दू जनजागृति समिति के तत्वावधान में आयोजित हिन्दू राष्ट्र जागृति सभा को सफल बनाने हेतु पधारे सभी हिन्दू भाइयों-बहनों का हृदय से धन्यवाद।
आप सभी के उत्साह, समर्थन और सहभागिता ने धर्म, संस्कृति और राष्ट्र जागरण के इस संकल्प को और अधिक मजबूत किया।
जय… pic.twitter.com/lM6fK929du
— Raja Singh (@TigerRajaSingh) May 4, 2026
अतिक्रमणे आणि लव्ह जिहादविरोधात एल्गार

आमदार टी. राजा सिंह यांनी आपल्या शैलीत राज्यातील ज्वलंत मुद्द्यांना हात घातला. औरंगजेबाच्या कबरीसाठी खर्च होणारा सरकारी निधी थांबवण्याची मागणी करत त्यांनी विदर्भातील नरनाळा आणि नरसिंहगड किल्ल्यांवरील ‘हिरव्या अतिक्रमणा’चा मुद्दा उचलून धरला. “पुरातत्व विभागाने या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली नाही, तर शिवरायांच्या मावळ्यांना स्वतःचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला. अकोला महानगरपालिकेतील स्थायी समिती सभागृहाचे ‘टिपू सुलतान’ हे नाव बदलून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ असे नामकरण करण्यासाठी त्यांनी ७ मे पर्यंतची मुदत प्रशासनाला दिली आहे.
सत्याचा विजय आणि संघटित होण्याची हाक

सभेला संबोधित करताना सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘हिंदु दहशतवाद’ या शब्दाचा वापर करून हिंदुत्वनिष्ठांना बदनाम करण्याच्या जुन्या षडयंत्रावर टीका केली. अनेक प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांची न्यायालयाने केलेली निर्दोष मुक्तता हा सत्याचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले. समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीनुसार ‘धटासी आणावा धट’ या न्यायाने जात-पात विसरून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
’बिंदी घर’ आणि ‘ग्राम सुरक्षा दल’

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “छत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदूंच्या सभांना विरोध होणे दुर्दैवी आहे,” असे सांगतानाच त्यांनी अकोल्यातील ‘बिंदी घर’ प्रकरणाचा संदर्भ देत हिंदूंना सतर्क राहण्यास सांगितले. प्रत्येक गावात ‘ग्राम सुरक्षा दला’ची स्थापना करून धर्मावरील आघात रोखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मान्यवरांची मांदियाळी
या ऐतिहासिक सभेत अकोल्याचे खासदार श्री. अनुप संजय धोत्रे, आमदार श्री. रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर, उपमहापौर श्री. अमोल गोगे, माजी महापौर सुमन गावंडे, महापालिका सभागृह नेते पवन महल्ले, शिवसेना (शिंदे सेना) शहर प्रमुख राजेश मिश्रा आणि उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या वतीने वकिलांच्या पथकाने आमदार राजा सिंह यांना कायदेशीर सहकार्याचे आश्वासन पत्र दिले. सभेच्या शेवटी बालसाधकांनी साकारलेली ऐतिहासिक महापुरुषांची रूपे आणि ‘वन्दे मातरम्’च्या गायनाने संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून गेले होते.









