श्रीज्ञानेश्वरी – अध्याय पहिला

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥

श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ प्रथमो अध्यायः – अध्याय पहिला ।
। अर्जुनविषादयोगः ।


नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥
देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥
स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥
अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।
पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्‍नांचीं ॥ ५ ॥
पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥ ६ ॥
देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ ७ ॥
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।
दिसती उचित पदें माझारीं । रत्‍नें भलीं ॥ ८ ॥
तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥
देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति ।
म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥
तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ ११ ॥
एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥
मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥
तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥
मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं ।
बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥ १६ ॥
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसेपणें एकवटत इभ- । मस्तकावरी ॥ १७ ॥
उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे ।
तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥ १८ ॥
अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥ १९ ॥
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।
तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ २० ॥
आतां अभिनव वाग्विलासिनी । ते चातुर्यार्थकलाकामिनी ।
ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥ २१ ॥
मज हृदयीं सद्‍गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु ।
म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥ २२ ॥
जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥ २३ ॥
कां चिंतामणी जालियां हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं ।
तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥
म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे ।
जैसें मुळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥
कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं ।
ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥ २६ ॥
तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।
जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥ २७ ॥
आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान ।
कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥ २८ ॥
ना तरी सर्व सुखाचि आदि । जे प्रमेयमहानिधि ।
नाना नवरससुधाब्धि । परिपुर्ण हे ॥ २९ ॥
कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।
शास्त्रजाता वसौट । अशेषांचें ॥ ३० ॥
ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचे जिव्हार ।
लावण्यरत्‍नभांडार । शारदेचें ॥ ३१ ॥
नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं ।
आविष्करोनि महामतीं । व्यासाचिये ॥ ३२ ॥
म्हणौनि हा काव्यांरावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥ ३३ ॥
तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ॥ ३४ ॥
एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें ।
आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥ ३५॥
माधुर्यीं मधुरता । श्रुंगारीं सुरेखता ।
रूढपण उचितां । दिसे भलें ॥ ३६ ॥
एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा ।
म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७ ॥
आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥ ३८ ॥
भानुचेनि तेजें धवळलें । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें ।
तैसें व्यासमति कवळिलें । मिरवे विश्व ॥ ३९ । ।
कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥ ४० ॥
ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे ।
तैसें व्यासोक्तितेजें । धवळत सकळ ॥ ४१ ॥
कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥ ४२ ॥
ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे ।
आदिलापासौनि अपाडें । जियापरी ॥ ४३ ॥
नानाघनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण ।
मग अलंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४ ॥
तैसें व्यासोक्ति अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें ।
तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥ ४५ ॥
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं ।
पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥ ४६ ॥
म्हणौनि महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं ।
येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥
ऐसी जगीं सुरस कथा । जें जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८ ॥
जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९ ॥
आतां भारतकमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥ ५० ॥
ना तरी शदब्रह्माब्धि । मथियला व्यासबुद्धि ।
निवडिलें निरवधि । नवनीत हें ॥ ५१ ॥
मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलेंनि विवेकें ।
पद आलें परिपाकें । आमोदासी ॥ ५२ ॥
जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥ ५३ ॥
जें आकर्णिजें भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
तें भीष्मपर्वीं संगती । म्हणितली कथा ॥ ५४ ॥
जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे ।
जें सनकादिकीं सेविजे । आदरेंसीं ॥ ५५ ॥
जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे ।
ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥ ५६ ॥
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।
अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥
हें शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे ।
बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८ ॥
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥ ५९ ॥
कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥
ऐसेनि गंभीरपणें । स्थिरावलोनि अंतःकरणें ।
आथिला तोचि जाणें । मानूं इये ॥ ६१ ॥
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती ।
तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ॥ ६२ ॥
हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें ।
प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणौनियां ॥ ६३ ॥
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा ।
तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥ ६४ ॥
तैसा तुम्हीं मी अंगिकारिला । सज्जनीं आपुला म्हणितला ।
तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥ ६५ ॥
परी अपराधु तो आणिक आहे । जे मी गीतार्थु कवळुं पाहें ।
तें अवधारा विनवूं लाहें । म्हणौनियां ॥ ६६ ॥
हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता ।
येर्‍हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ॥ ६७ ॥
कीं टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरीं ।
मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ॥ ६८ ॥
आइका आकाश गिंवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें ।
म्हणौनि अपाडू हें आघवें । निर्धारितां ॥ ६९ ॥
या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी ।
जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारौनि ॥ ७० ॥
तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें ।
तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ॥ ७१ ॥
हा वेदार्थ सागरु । जया निद्रिताचा घोरु ।
तो स्वयें सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२ ॥
ऐसे जें अगाध । जेथ वेडावती वेद ।
तेथ अल्प मी मतिमंद । काई होये ॥ ७३ ॥
हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें ।
गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं ? ॥ ७४ ॥
परी एथ असे एकु आधारु । तेणेंचि बोले मी सधरु ।
जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५ ॥
येर्‍हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु ।
तर्‍ही संतकृपादीपकु । सोज्वळु असे ॥ ७६ ॥
लोहाचें कनक होये । हें सामर्थ्य परिसींच आहे ।
कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ॥ ७७ ॥
जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकयाहि आथी भारती ।
एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कयी ॥ ७८ ॥
जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे ।
म्हणौनि मी प्रवर्तों लाहें । ग्रंथीं इये ॥ ७९ ॥
तरी न्यून ते पुरतें । अधिक तें सरतें ।
करूनि घेयावें हें तुमतें । विनवितु असे ॥ ८० ॥
आतां देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन ।
जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥ ८१ ॥
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरूपितु ।
ते आपुलियापरी अलंकारितु । भलतयापरी ॥ ८२ ॥
तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हे तुज बोलावें नलगे कांहीं ।
आतां ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगां ॥ ८३ ॥
या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु ।
म्हणे परियसा मना अवकाशु । देऊनियां ॥ ८४ ॥

धृतराष्ट्र उवाच ।
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥ १॥

तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु ।
म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची ॥ ८५ ॥
जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे ।
गेले असती व्याजें । जुंझाचेनि ॥ ८६ ॥
तरी तेचि येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं ।
ते झडकरी कथन करी । मजप्रती ॥ ८७ ॥

संजय उवाच ।
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ २॥

तिये वेळीं तो संजय बोले । म्हणे पांडव सैन्य उचललें ।
जैसें महाप्रळयीं पसरलें । कृतांतमुख ॥ ८८ ॥
तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट ।
जैसें उसळलें काळकूट । धरी कवण ॥ ८९ ॥
नातरी वडवानळु सादुकला । प्रळयवातें पोखला ।
सागरु शोषूनि उधवला । अंबरासी ॥ ९० ॥
तैसें दळ दुर्धर । नानाव्यूहीं परीकर ।
अवगमलें भयासुर । तिये काळीं ॥ ९१ ॥
तें देखोनियां दुर्योधनें । अव्हेरिलें कवणें मानें ।
जैसे न गणिजे पंचाननें । गजघटांतें ॥ ९२ ॥

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ ३॥

मग द्रोणापासीं आला । तयांतें म्हणे हा देखिला ।
कैसा दळभारू उचलला । पांडवांचा ॥ ९३ ॥
गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह सभंवते ।
रचिले आथी बुद्धिमंतें । द्रुपदकुमरें ॥ ९४ ॥
जो हा तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला ।
तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला । देख देख ॥ ९५ ॥

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ ४॥

आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण ।
क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती ॥ ९६ ॥
जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे ।
ते सांगेन कौतुकें । प्रसंगेची ॥ ९७ ॥
एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु ।
महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥ ९८ ॥

धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः ॥ ५॥

युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ ६॥

चेकितान धृष्टकेतु । काशिराज वीर विक्रांतु ।
उत्तमौजा नृपनाथु । शैब्य देख ॥ ९९ ॥
हा कुंतिभोज पाहें । एथ युधामन्यु आला आहे ।
आणि पुरुजितादि राय हे । सकळ देख ॥ १०० ॥
हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवार्जुनु ।
तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखें द्रोणा ॥ १०१ ॥
आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर ।
मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ॥ १०२ ॥

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ ७॥

भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ ८॥

आतां आमुच्या दळीं नायक । जे रूढवीर सैनिक ।
ते प्रसंगें आइक । सांगिजती ॥ १०३ ॥
उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी ।
तुम्ही आदिकरूनी । मुख्य जे जें ॥ १०४ ॥
हा भीष्म गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु ।
रिपुगजपंचाननु । कर्णवीरु ॥ १०५ ॥
या एकेकाचेनी मनोव्यापारें । हें विश्व होय संहरे ।
हा कृपाचार्यु न पुरे । एकलाचि ॥ १०६ ॥
एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें ।
याचा आडदरु सदां वाहे । कृतांतु मनीं ॥ १०७ ॥

अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ ९॥

समितिंजयो सौमदत्ती । ऐसे आणीकही बहुत आहाती ।
जयांचिया बळा मिती । धाताही नेणें ॥ १०८ ॥
जे शास्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त ।
हो कां जें अस्त्रजात । एथूनि रूढ ॥ १०९ ॥
हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगीं ।
परी सर्व प्राणें मजलागीं । आरायिले असती ॥ ११० ॥
पतिव्रतेचें हृदय जैसें । पतिवांचूनि न स्पर्शे ।
मी सर्वस्व या तैसें । सुभटांसी ॥ १११ ॥
आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें ।
ऐसे निरवधि चोखडें । स्वामिभक्त ॥ ११२ ॥
झुंजती कुळकणी जाणती । कळे किर्तीसी जिती ।
हे बहु असो क्षात्रनीति । एथोनियां ॥ ११३ ॥
ऐसे सर्वांपरि पुरते । वीर दळीं आमुते ।
आतं काय गणूं यांतें । अपार हे ॥ ११४ ॥

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १०॥

वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु ।
तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासि पैं ॥ ११५ ॥
आतां याचेनि बळें गवसलें । हे दुग जैसे पन्नासिलें ।
येणें पाडें थेकुलें । लोकत्रय ॥ ११६ ॥
आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं ।
मग वडवानळु तैसे याही । विरजा जैसा ॥ ११७ ॥
ना तरीं प्रळयवन्ही महावातु । या दोघां जैसा सांधातु ।
तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥ ११८ ॥
आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडवसैन्य कीर थोकडें ।
परि वरचिलेनि पाडें । दिसत असे ॥ ११९ ॥
वरी भीमसेनु बेथु । तो जाहला असे सेनानाथु ।
ऐसें बोलोनियां मातु । सांडिली तेणें ॥ १२० ॥

अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ ११॥

मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांतें म्हणितलें ।
आतां दळभार आपुलाले । सरसे करा ॥ १२१ ॥
जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी ।
वरगण कवणकवणी । महारथीया ॥ १२२ ॥
तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे ।
द्रोणातें म्हणे पाहिजे । तुम्ही सकळ ॥ १२३ ॥
हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा ।
येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ॥ १२४ ॥

तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥ १२॥

या राजयाचिया बोला । सेनापति संतोषला ।
मग तेणें केला । सिंहनादु ॥ १२५ ॥
तो गाजत असे अद्‍भुतु । दोन्ही सैन्याआंतु ।
प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥ १२६ ॥
तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें ।
दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ॥ १२७ ॥
ते दोन्ही नाद मीनले । तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहलें ।
जैसें आकाश कां पडिलें । तुटोनिया ॥ १२८ ॥
घडघडीत अंबर । उचंबळत सागर ।
क्षोभलें चराचर । कांपत असे ॥ १२९ ॥
तेणें महाघोषगजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें ।
तव दळामाजीं रणतुरें । आस्फुरिलीं ॥ १३० ॥

ततः शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥ १३॥

उदंड सैंघ वाजतें । भयानखें खाखातें ।
महाप्रळयो जेथें । धाकडांसी ॥ १३१ ॥
भेरी निशाण मांदळ । शंख काहळ भोंगळ ।
आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥ १३२ ॥
आवेशें भुजा त्राहाटिती । विसणेले हांका देती ।
जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥ १३३ ॥
तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु ।
जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥ १३४ ॥
एकां उभयाचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले ।
बिरुदाचे दादुले । हिंवताती ॥ १३५ ॥
ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु ।
देव म्हणती प्रळयकाळु । वोढवला आजी ॥ १३६ ॥

ततः श्वेतैहयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥ १४॥

पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः ॥ १५॥

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १६॥

ऐसी स्वर्गीं मातु । देखोनि तो आकांतु ।
तव पांडवदळाआंतु । वर्तलें कायी ॥ १३७ ॥
हो कां निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचें ।
जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चार्‍ही ॥ १३८ ॥
कीं पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा ।
तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥ १३९ ॥
जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठींचा राणा जाण ।
तया रथाचे गुण । काय वर्णूं ॥ १४० ॥
ध्वजस्तंभावरी वानरु । तो मुर्तिमंत शंकरु ।
सारथी शारङ्गधरु । अर्जुनेसीं ॥ १४१ ॥
देखा नवल तया प्रभूचें । अद्‍भुत प्रेम भक्ताचें ।
जें सारथ्यपण पार्थाचें । करितु असे ॥ १४२ ॥
पाइकु पाठींसी घातला । आपण पुढां राहिला ।
तेणें पाञ्चजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ॥ १४३ ॥
परि तो महाघोषु थोरु । गर्जतु असे गंहिरु ।
जैसा उदेला लोपी दिनकरु । नक्षत्रांतें ॥ १४४ ॥
तैसें तुरबंबाळु भंवते । कौरवदळीं गाजत होते ।
ते हारपोनि नेणों केउते । गेले तेथ ॥ १४५ ॥
तैसाचि देखे येरे । निनादें अति गहिरे ।
देवदत्त धनुर्धरें । आस्फुरिला ॥ १४६ ॥
ते दोन्ही शब्द अचाट । मिनले एकवट ।
तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ॥ १४७ ॥
तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला ।
तेणें पौण्ड्र आस्फुरिला । महाशंखु ॥ १४८ ॥
तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गहिंरु ।
तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥ १४९ ॥
नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु ।
जेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ॥ १५० ॥

काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १७॥

द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शंखान्दध्मुः पृथक् पृथक् ॥ १८॥

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९॥

तेथ भूपति होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक ।
हा काशीपति देख । महाबाहु ॥ १५१ ॥
तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु ।
धृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥ १५२ ॥
विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर ।
तिहीं नानाशंख निरंतर । आस्फुरिले ॥ १५३ ॥
तेणें महाघोषनिर्घातें । शेष कूर्म अवचितें ।
गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती ॥ १५४ ॥
तेथ तीन्ही लोक डळमळित । मेरु मांदार आंदोळित ।
समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥ १५५ ॥
पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे आसुडत ।
तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥ १५६ ॥
सृष्टी गेली रे गेली । देवां मोकळवादी जाहली ।
ऐशी एक टाळी पिटली । सत्यलोकीं ॥ १५७ ॥
दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला ।
तैसा हाहाकारु जाहला । तिन्हीं लोकीं ॥ १५८ ॥
तें देखोनि आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु ।
मग लोपिला अद्‍भुतु । संभ्रमु तो ॥ १५९ ॥
म्हणौनि विश्व सांवरलें । एर्‍हवीं युगांत होतें वोडवलें ।
जैं महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ॥ १६० ॥
तो घोष तरी उपसंहरला । परि पडिसाद होता राहिला ।
तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥ १६१ ॥
जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु ।
तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ॥ १६२ ॥
तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती ।
एकमेकांतें म्हणती । सावध रे सावध ॥ १६३ ॥

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ २०॥

तेथ बळें प्रौढीपुरतें । महारथी वीर होते ।
तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥ १६४ ॥
मग सरिसेपणें उठावले । दुणवटोनि उचलले ।
तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ॥ १६५ ॥
तेथ बाणवरी धर्नुधर । वर्षताती निरंतर ।
जैसे प्रळयांत जलधर । अनिवार कां ॥ १६६ ॥
ते देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मनें ।
मग संभ्रमें दिठी सेने । घालीतसे ॥ १६७ ॥
तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले ।
तंव लीलाधनुष्य उचललें । पंडुकुमरें ॥ १६८ ॥

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।

अर्जुन उवाच ।
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१॥

यावदेतान्निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ॥ २२॥

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥ २३॥

ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा ।
नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां ॥ १६९ ॥
जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक ।
न्याहाळीन अशेख । झुंजते ते ॥ १७० ॥
येथ आले असती आघवें । परी कवणेंसीं म्यां झुंजावें ।
हे रणीं लागे पहावें । म्हणौनियां ॥ १७१ ॥
बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव ।
वांटिवेवीण हांव । बांधिती झुंजीं ॥ १७२ ॥
झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती ।
हें सांगोनि रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥ १७३ ॥

सञ्जय उवाच ।
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ २४॥

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ॥ २५॥

तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥ २६॥

श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान् ॥ २७॥
कृपया परयाऽऽविष्टो विषीदमब्रवीत् ।

आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव श्रीकृष्णें रथु पेलिला ।
दोही सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ॥ ७४॥
जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख ।
पृथिवीपति आणिक । बहुत आहाती ॥ ७५॥
तेथ स्थिर करूनियां रथु । अर्जुन असे पाहातु ।
तो दळभार समस्तु । संभ्रमेंसीं ॥ ७६॥
मग देवा म्हणे देख देख । हे गुरुगोत्र अशेख ।
तंव कृष्णमनीं नावेक । विस्मो जाहला ॥ ७७॥
तो आपणयां आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे ।
हें मनीं धरलें येणें । परि कांहीं आश्चर्य असे ॥ ७८॥
ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणें हृदयस्थु ।
परि उगा असे निवांतु । तिये वेळीं ॥ १७९ ॥
तंव तेथ पार्थु सकळ । पितृ पितामह केवळ ।
गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ॥ १८० ॥
इष्ट मित्र आपुले । कुमरजन देखिले ।
हे सकळ असती आले । तयांमाजी ॥ १८१ ॥
सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे ।
कुमर पौत्र धर्नुर्धरें । देखिले तेथ ॥ १८२ ॥
जयां उपकार होते केले । कीं आपदीं जे रक्षिले ।
हे असो वडील धाकुले । आदिकरूनि ॥ १८३ ॥
ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं ।
हे अर्जुनें तिये वेळीं । अवलोकिलें ॥ १८४ ॥
तेथ मनीं गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली ।
तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ॥ १८५ ॥
जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी ।
तिया आणिकीतें न साहती । सुतेजपणें ॥ १८६ ॥
नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे ।
मग पाडेंवीण अनुसरे । भ्रमला जैसा ॥ १८७ ॥
कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी ।
मग तया विरक्तता सिद्धी । आठवेना ॥ १८८ ॥
तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें ।
जे अंतःकरण दिधलें । कारुण्यासी ॥ १८९ ॥
देखा मंत्रज्ञु बरळु जाय । मग तेथ कां जैसा संचारु होय ।
तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥ १९० ॥
म्हणौनि असतां धीरु गेला । हृदया द्रावो आला ।
जैसा चंद्रकळीं शिवतला । सोमकांतु ॥ १९१ ॥
तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु ।
मग सखेद असे बोलतु । श्रीअच्युतेसीं ॥ १९२ ॥

अर्जुन उवाच ।
दृष्ट्वेमम् स्वजनं कृष्ण युयुत्सुम् समुपस्थितम् ॥ २८॥

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ २९॥

गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ ३०॥

तो म्हणे अवधारी देवा । म्यां पाहिला हा मेळावा ।
तंव गोत्र वर्गु आघवा । देखिला एथ ॥ १९३ ॥
हें संग्रामीं उदित । जहाले असती कीर समस्त ।
पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥ १९४ ॥
येणें नांवेचि नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं ।
मन बुद्धि ठायीं । स्थिर नोहे ॥ १९५ ॥
देखे देह कांपत । तोंड असे कोरडें होत ।
विकळता उपजत । गात्रांसीही ॥ १९६ ॥
सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला ।
तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ॥ १९७ ॥
तें न धरतचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिलें ।
ऐसें हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ॥ १९८ ॥
जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण ।
तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ॥ १९९ ॥
जेणें संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।
तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजीं ॥ २०० ॥
जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें ।
परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥ २०१ ॥
तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परि तें कमळदळ चिरूं नेणें ।
तैसें कठिण कोवळेपणें । स्नेह देखा ॥ २०२ ॥
हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाही नयेचि आया ।
म्हणौनि भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥ २०३ ॥
अवधारी मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु ।
विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥ २०४ ॥
कैसी नेणों सदयता । उपनली तेथें चित्ता ।
मग म्हणे कृष्णा आतां । नसिजे एथ ॥ २०५ ॥
माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ ।
जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥ २०६ ॥

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ ३१॥

या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठीरादिकां कां न वधावें ।
हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ॥ २०७ ॥
म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज ।
एणें काय काज । महापापें ॥ २०८ ॥
देवा बहुतापरी पाहतां । एथ वोखटे होईल झुंजतां ।
वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ॥ २०९ ॥

न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ ३२॥

येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ ३३॥

आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ ३४॥

तया विजयवृत्ती कांहीं । मज सर्वथा काज नाहीं ।
एथ राज्य तरी कायी । हे पाहुनियां ॥ २१० ॥
या सकळांतें वधावें । मग हे भोग भोगावे ।
ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥ २११ ॥
तेणें सुखेंविण होईल । तें भलतैसें साहिजेल ।
वरी जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥ २१२ ॥
परी यांसी घातु कीजे । मग आपण राज्यसुख भोगिजे ।
हें स्वप्नींही मन माझें । करूं न शके ॥ २१३ ॥
तरी आम्हीं कां जन्मावें । कवणलागीं जियावें ।
जरी वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥ २१४ ॥
पुत्रातें इच्छी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ ।
जे निर्दळिजे केवळ । गोत्र आपुलें ॥ २१५ ॥
हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेया होईजे ।
वरी घडे तरी कीजे । भलें इयां ॥ २१६ ॥
आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें ।
हें जीवितही उपकारावें । काजीं यांच्या ॥ २१७ ॥
आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ ।
मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥ २१८ ॥
तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत ।
जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥ २१९ ॥
अंतौरिया कुमरें । सांडोनियां भांडारें ।
शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी ॥ २२० ॥
ऐसियांतें कैसेनि मारूं ? । कवणावरी शस्त्र धरूं ? ।
निजहृदया करूं । घातु केवीं ? ॥ २२१ ॥
हें नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण ।
जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ॥ २२२ ॥
एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ ।
पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥ २२३ ॥
अवधारी अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे ।
म्हणौनि दोष आथी वाचे । बोलितांचि ॥ २२४ ॥

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ ३५॥

हे वरी भलतें करितु । आतांचि येथें मारितु ।
परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥ २२५ ॥
त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त ।
तरी हें अनुचित । नाचरें मी ॥ २२६ ॥
जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाच्या मनीं उरिजे ? ।
सांगे मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा ? ॥ २२७ ॥

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाऽऽश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥ ३६॥

जरी वधु करोनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा ।
मज जोडिलासि तुं हातींचा । दूरी होसी ॥ २२८ ॥
कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें ।
तये वेळीं तुं कवणें कें । देखावासी ? ॥ २२९ ॥
जैसा उद्यानामाजीं अनळु । संचारला देखोनि प्रबळु ।
मग क्षणभरी कोकिळु । स्थिरु नोहे ॥ २३० ॥
का सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु ।
न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ॥ २३१ ॥
तयापरी तुं देवा । मज झकवूं न येसीं मावा ।
जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल ॥ २३२ ॥

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ ३७॥

म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं ।
हें किडाळ बहुतीं परी । दिसतसे ॥ २३३ ॥
तुजसीं अंतराय होईल । मग सांगे आमुचें काय उरेल ? ।
तेणें दुःखें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥ २३४ ॥
म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्ही भोग भोगिजती ।
हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥ २३५ ॥

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३८॥

कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ ३९॥

हे अभिमानमदें भुललें । जरी पां संग्रामा आले ।
तर्‍ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे ॥ २३६ ॥
हें ऐसें कैसें करावें ? । जे आपुले आपण मारावे ? ।
जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट ? ॥ २३७ ॥
हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंहु जाहला आवचिता ।
तो तंव चुकवितां । लाभु आथी ॥ २३८ ॥
असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा ।
तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे ? ॥ २३९ ॥
कां समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी ।
तरी क्षणा एका कवळूनी । जाळूं सके ॥ २४० ॥
तैसे दोष हे मूर्त । अंगी वाजों असती पहात ।
हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें ? ॥ २४१ ॥
ऐसें पार्थु तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं ।
या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥ २४२ ॥

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ ४०॥

जैसें कष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे ।
तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥ २४३ ॥
तैसा गोत्रींचीं परस्परें । जरी वधु घडे मत्सरें ।
तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥ २४४ ॥
म्हणौनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे ।
मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं ॥ २४५ ॥

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥ ४१॥

एथ सारासार विचारावें । कवणें काय आचारावें ।
आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥ २४६ ॥
असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे ।
तरी उजूचि कां अडळिजे । जयापरी ॥ २४७ ॥
तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्यधर्मु जाय ।
मग आन कांहीं आहे । पापावांचुनी ? ॥ २४८ ॥
जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती ।
म्हणौनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥
उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती ।
तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥ २५० ॥
जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं ।
तैसीं महापापें कुळीं । संचरती ॥ २५१ ॥

सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ ४२॥

मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां ।
येरयेरां नरका । जाणें आथी ॥ २५२ ॥
देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित ।
मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥ २५३ ॥
जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक क्रिया पारुखे ।
तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ? ॥ २५४ ॥
तरी पितर काय करिती ? । कैसेनि स्वर्गीं वसती ? ।
म्हणौनि तेही येती । कुळापासीं ॥ २५५ ॥
जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें ।
तेवीं आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ॥ २५६ ॥

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ ४३॥

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ ४४॥

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ ४५॥

देवा अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक ।
जे संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥ २५७ ॥
जैसा घरीं आपुला । वानिवसें अग्नि लागला ।
तो आणिकांहीं प्रज्वळिला । जाळूनि घाली ॥ २५८ ॥
तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती ।
तेही बाधा पावती । निमित्तें येणें ॥ २५९ ॥
तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ ।
मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥ २६० ॥
पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उकलु नाहीं ।
येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥
देवा हें विविध कानीं ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे ।
हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारीं पां ॥ २६२ ॥
अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक ।
ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ? ॥ २६३ ॥
जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले ।
सांग पां काय थेंकुलें । घडलें आम्हां ? ॥ २६४ ॥

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥ ४६॥

आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें ।
जे शस्त्र सांडुनि साहावे । बाण यांचे ॥ २६५ ॥
तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें ।
परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥ २६६ ॥
ऐसें देखून सकळ । अर्जुनें आपुलें कुळ ।
मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ॥ २६७ ॥

सञ्जय उवाच ।
एवमुक्त्वाऽर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ ४७॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‍भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगोनाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥

ऐसे तिये अवसरी । अर्जुन बोलिला समरीं ।
संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥ २६८ ॥
मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहींवरु आला ।
तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥ २६९ ॥
जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु ।
कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥ २७० ॥
नातरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतिला तापसु भ्रमें ।
मग आकळूनि कामें । दीनु कीजे ॥ २७१ ॥
तैसा तो धर्नुधरु । अत्यंत दुःखें जर्जरु ।
दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥ २७२ ॥
मग धनुष्य बाण सांडिले । न धरत अश्रुपात आले ।
ऐसें ऐक राया वर्तलें । संजयो म्हणे ॥ २७३ ॥
आतां यापरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु ।
कवणेपरी परमार्थु । निरूपील ॥ २७४ ॥
ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां ।
ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥ २७५ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः ॥

Leave a Comment