श्रीज्ञानेश्वरी – अध्याय पाचवा

॥ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥

श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
॥ अथ पञ्चमोऽध्यायः – अध्याय पाचवा ॥
। संन्यासयोगः ।

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १॥

मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचें बोलणें ।
एक होय तरी अंतःकरणें । विचारूं ये ॥ १ ॥
मागां सकळ कर्मांचा सन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु ।
तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ? ॥ २ ॥
ऐसें द्व्यर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांच्या चित्ता ।
आपुलिये चाडें श्रीअनंता । उमजु नोहे ॥ ३ ॥
ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे ।
हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥ ४ ॥
तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें ।
जें हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥ ५ ॥
परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा ।
सांगैं दोहींमाजि बरवा । मार्गु कवणु ॥ ६ ॥
जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा ।
आणि अनुष्ठितां प्रांजळा । सावियाचि ॥ ७ ॥
जैसें निद्रेचें सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे ।
तैसें सोहोकासन सांगडें । सोहपें होय ॥ ८ ॥
येणें अर्जुनाचेनि बोलें । देवो मनीं रिझले ।
मग होईल ऐकें म्हणितलें । संतोषोनियां ॥ ९ ॥
देखा कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये ।
तो चंद्रुही परी लाहे । खेळावया ॥ १० ॥
पाहे पां श्रीशंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता ।
काय क्षीराब्धि दूधभाता । देइजेचिना ? ॥ ११ ॥
तैसा औदार्याचा कुरुठा । श्रीकृष्णु आपु जाहलिया सुभटा ।
कां सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा ? ॥ १२ ॥
एथ चमत्कारु कायसा । गोसावी श्रीलक्ष्मीकांता{ऐ}सा ।
आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं ॥ १३ ॥
म्हणौनि अर्जुनें म्हणितलें । तें हांसोनि येरें दिधलें ।
तेंचि सांगेन बोलिलें । काय कृष्णें ॥ १४ ॥

श्रीभगवानुवाच ।
संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ २॥

तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां ।
मोक्षकरु तत्त्वता । दोनीही होती ॥ १५ ॥
तरी जाणां नेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा ।
जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणी ॥ १६ ॥
तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे ।
येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥ १७ ॥
आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचें चिन्ह ।
मग सहजें हें अभिन्न । जाणसी तूं ॥ १८ ॥

ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ३॥

तरी गेलियाची से न करी । न पवतां चाड न धरी ।
जो सुनिश्चळु अंतरीं । मेरु जैसा ॥ १९ ॥
आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।
पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥ २० ॥
जो मनें ऐसा जाहला । संगीं तोचि सांडिला ।
म्हणौनि सुखें सुख पावला । अखंडित ॥ २१ ॥
आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें ।
जें घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हणौनि ॥ २२ ॥
देखैं अग्नि विझोनि जाये । मग जे राखोंडी केवळु होये ।
तैं ते कापुसें गिंवसूं ये । जियापरी ॥ २३ ॥
तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं ।
जयाचिये बुद्धी । संकल्पु नाहीं ॥ २४ ॥
म्हणौनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे ।
इयें कारणें दोनी सांगडे । संन्यासयोगु ॥ २५ ॥

सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ ४॥

एर्‍हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा ।
ते सांख्ययोगुसंस्था । जाणती केवीं ? ॥ २६ ॥
सहजें ते अज्ञान । म्हणौनि म्हणती ते भिन्न ।
एर्‍हवीं दीपाप्रति काई आनान । प्रकाशु आहाती ? ॥ २७ ॥
पैं सम्यक् येणें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें ।
तें दोहींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥ २८ ॥

यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं साख्यं च योगं च यः पश्यति स पश्चति ॥ ५॥

आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे ।
म्हणौनि ऐक्य दोहींतें सहजें । इयापरी ॥ २९ ॥
देखैं आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा ।
तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥ ३० ॥
तयासीचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें ।
जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥ ३१ ॥

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्बह्म न चिरेणाधिगच्छति ॥ ६॥

जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता ।
तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥ ३२ ॥
येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे ।
परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥ ३३ ॥

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ७॥

जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें ।
मग आत्मस्वरूपीं घातलें । हारौनियां ॥ ३४ ॥
जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें अल्प आवडे ।
मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥ ३५ ॥
तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें ।
तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकत्रय ॥ ३६ ॥
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।
आणि करी जर्‍ही आघवें । तर्‍ही अकर्ता तो ॥ ३७ ॥

नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यञ्श्रृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपन्श्वसन् ॥ ८॥

प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ९॥

जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं ।
तरी कर्तृत्व कैचैं काई । उरे सांगैं ? ॥ ३८ ॥
ऐसें तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण ।
दिसती संपूर्ण । योगयुक्तां ॥ ३९ ॥
एर्‍हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी ।
अशेषाही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥ ४० ॥
तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे ।
परि तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें ॥ ४१ ॥
स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें ।
अवसरोचित बोलणें । तयाहि आथी ॥ ४२ ॥
आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरी ।
निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ॥ ४३ ॥
आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे ।
पैं सकळ कर्म ऐसें । रहाटे कीर ॥ ४४ ॥
हें सांगों काई एकैक । देखें श्वासोच्छ्वासादिक ।
आणि निमिषोन्निमिष । आदिकरूनि ॥ ४५ ॥
पार्था तयाचे ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं ।
परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ॥ ४६ ॥
जैं भ्रांति सेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।
मग तो ज्ञानोदयीं चेइला । म्हणौनियां ॥ ४७ ॥

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥ १०॥

आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती ।
आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥ ४८ ॥
दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे ।
देहीं कर्मजात तैसे । योगयुक्ता ॥ ४९ ॥
तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।
जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥ ५० ॥

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ११॥

देखैं बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे ।
ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥ ५१ ॥
हेंच मराठे परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी ।
योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनु ॥ ५२ ॥
मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें ।
तेथ मनचि रहाटें एकलें । स्वप्नीं जेवीं ॥ ५३ ॥
नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा ।
देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥ ५४ ॥
इंद्रियांच्या गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे ।
तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ॥ ५५ ॥
योगिये तोही करिती । परी कर्में तें न बंधिजती ।
जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ॥ ५६ ॥
आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त ।
मग इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे ॥ ५७ ॥
स्वरूप तरी देखे । आळविलें आइके ।
शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ॥ ५८ ॥
हें असो काजेंविण । जें जें कांहीं करण ।
तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥ ५९ ॥
मग सर्वत्र जें जाणतें । ते बुद्धीचें कर्म निरुतें ।
ओळख अर्जुनातें । म्हणे हरी ॥ ६० ॥
ते बुद्धी धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी ।
परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥ ६१ ॥
जें बुद्धीचिये ठावूनि देही । तयां अहंकाराची सेचि नाहीं ।
म्हणौनि कर्म करितां पाहीं । चोखाळले ॥ ६२ ॥
अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें नैष्कर्म्य ।
हें जाणती सुवर्म । गुरुगम्य जें ॥ ६३ ॥
आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें ।
जें बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥ ६४ ॥
एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु ।
तयासीचि आथि लागु । परिसावया ॥ ६५ ॥
हा असो अतिप्रसंगु । न संडी पां कथालागु ।
होईल श्लोकसंगति भंगु । म्हणौनियां ॥ ६६ ॥
जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे ।
तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥ ६७ ॥
जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे ।
तरी आणिकें काय करावें । कथा सांगैं ॥ ६८ ॥
हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृत्तीचा ।
म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥ ६९ ॥
मग श्रीकृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें ।
सांगेन तुज निरुतें । चित्त देईं ॥ ७० ॥

युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्‍नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ १२॥

तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।
तो घर रिघोनि वरिला । शांति जगीं ॥ ७१ ॥
येरु कर्मबंधें किरीटी । अभिलाषाचिया गांठीं ।
कळासला खुंटी । फळभोगाच्या ॥ ७२ ॥

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ॥ १३॥

जैसा फळाचिये हांवें । तैसें कर्म करी आघवें ।
मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥ ७३ ॥
तो जयाकडे वासु पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।
तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥ ७४ ॥
नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं ।
करितुचि न करी कांहीं । फलत्यागी ॥ ७५ ॥

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ १४॥

जैसा कां सर्वेश्वरू । पाहिजे तंव निर्व्यापारु ।
परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥ ७६ ॥
आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कर्मीं न शिंपें ।
जे हातुपावो न लिंपे । उदासवृत्तीचा ॥ ७७ ॥
योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे ।
परी महाभूतांचें दळवाडें । उभारी भले ॥ ७८ ॥
जगाच्या जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे ।
जगचि हें होय जाये । तो शुद्धीहि नेणे ॥ ७९ ॥

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ १५॥

पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखें ।
आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ? ॥ ८० ॥
पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे ।
परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥ ८१ ॥
तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जे चराचरीं ।
तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥ ८२ ॥

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥ १६॥

तें अज्ञान जैं समूळ तुटे । तै भ्रांतीचें मसैरें फिटे ।
मग अकर्तृत्व प्रगटे । मज ईश्वराचें ॥ ८३ ॥
एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता ।
तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ॥ ८४ ॥
ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं ।
देखें आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त ॥ ८५ ॥
जैशी पूर्वदिशेच्या राउळीं । उदया येतांचि सूर्य दिवाळी ।
कीं येरीही दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ॥ ८६ ॥

तद्‍बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठातत्परायणः ।
गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ १७॥

बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरूप भावी आपणा आपण ।
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ॥ ८७ ॥
ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदया गिंवसित आलें ।
तयांची समता दृष्टि बोलें । विशेषूं काई ॥ ८८ ॥
एक आपणपांचि जैसें । ते देखतीं विश्व तैसें ।
हें बोलणें कायसें । नवलु एथ ॥ ८९ ॥
परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखे ।
कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ॥ ९० ॥
नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं ।
अमृत नायके कानीं । मृत्युकथा ॥ ९१ ॥
हें असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा ।
भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥ ९२ ॥

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ १८॥

मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विजु ।
पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ? ॥ ९३ ॥
ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन ।
हें असो कैचें स्वप्न । जागतया ॥ ९४ ॥
एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा ।
तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषमु काई ॥ ९५ ॥

इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्‍ब्रह्मणि ते स्थिताः ॥ १९॥

म्हणौनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म ।
हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ॥ ९६ ॥
जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां ।
परी भोगिली निसंगता । कामनेविण ॥ ९७ ॥
जिहीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें ।
परि सांडिलें निदसुरें । लौकिकु हें ॥ ९८ ॥
जैसा जनामाजि खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु ।
तैसा शरीरीं परी संसारु । नोळखे तयांतें ॥ ९९ ॥
हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे ।
तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हे ॥ १०० ॥
तैसें नाम रूप तयाचें । एर्‍हवीं ब्रह्मचि तो साचें ।
मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥ १०१ ॥
ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे ।
अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ॥ १०२ ॥

न प्रहृष्योत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ २०॥

तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें ।
तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलिया जो ॥ १०३ ॥
तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वतां ।
हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥ १०४ ॥

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ २१॥

जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं ।
तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥ १०५ ॥
सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडलेनि अंतरें ।
रचिला म्हणौनि बाहिरें । पाउल न घाली ॥ १०६ ॥
सांगैं कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें ।
तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु असे ? ॥ १०७ ॥
तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपेंचि फावलें ।
तया विषयो सहजें सांडवले । म्हणो काई ? ॥ १०८ ॥
एर्‍हवीं तरी कौतुकें । विचारूनि पाहें पां निकें ।
या विषयांचेनि सुखें । झकविती कवण ॥ १०९ ॥

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ २२॥

जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले ।
जैसें रंकु कां आळुकैलें । तुषांतें सेवी ॥ ११० ॥
नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें ।
मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥ १११ ॥
तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे ।
तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥ ११२ ॥
एर्‍हवीं विषयीं सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे ।
तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥ ११३ ॥
सांगैं वात वर्ष आतपु धरे । ऐसे अभ्रच्छायाचि जरी सरे ।
तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥ ११४ ॥
म्हणौनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे ।
जैसें महूर कां म्हणिजे । विषकंदातें ॥ ११५ ॥
नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।
तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥ ११६ ॥
हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीचा साउली ।
ते शीतल होईल केतुली । मूषकासी ? ॥ ११७ ॥
जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा ।
तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ॥ ११८ ॥
हे विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी ।
तैं पांडुरोगाचिये पुष्टी- । सारिखें दिसे ॥ ११९ ॥
म्हणौनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख ।
परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ १२० ॥
तें अंतर नेणती बापुडे । म्हणौनि अगत्य सेवणें घडे ।
सांगैं पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥ १२१ ॥
तयां दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर ।
ते भोगजळींचे जळचर । सांडिती केवीं ॥ १२२ ॥
आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती ।
जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव ॥ १२३ ॥
नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट ।
हे विसांवेवीण वाट । वाहावी कवणें ॥ १२४ ॥
जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कें वसिजेल ।
आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ? ॥ १२५ ॥
म्हणौनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें ।
जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥ १२६ ॥
या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा ।
तूं झणें कहीं या वाटा । विसरोनि जाशी ॥ १२७ ॥
पैं यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विष ।
निराशा तयां दुःख । दाविलें नावडे ॥ १२८ ॥

शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्षरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्‍भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ २३॥

ज्ञानियांच्या हन ठायीं । याची मातुही कीर नाहीं ।
देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ॥ १२९ ॥
जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष ।
अंतरीं सुख । एक आथि ॥ १३० ॥
परि तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंबिजे ।
तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥ १३१ ॥
भोगीं अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अंचळु लोटी ।
मग सुखेंसि घे आंटी । गाढेपणें ॥ १३२ ॥
तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी ।
तेथ जळ जैसें जळीं । वेगळें न दिसे ॥ १३३ ॥
कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे ।
तैसे सुखचि उरे स्वरूपें । सुरतीं तिये ॥ १३४ ॥
ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एक होय ।
तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणते जें ॥ १३५ ॥

योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ २४॥

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ २५॥

म्हणौनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें ।
ते खुणाचि पावले स्वभावें । आत्माराम ॥ १३६ ॥
जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले ।
ते मी जाणें निखिळ वोतले । सामरस्याचे ॥ १३७ ॥
ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर ।
कीं महाबोधें विहार । केले जैसे ॥ १३८ ॥
ते विवेकाचें गांव । कीं परब्रम्हींचे स्वभाव ।
नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥ १३९ ॥
ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक ।
हें बहु असो एकैक । वानिसी काई ॥ १४० ॥
तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी ।
कीं निराळीं बोल देखसी । सनागर ॥ १४१ ॥
परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं ।
करी साधुहृदयराउळीं । मंगळौखा ॥ १४२ ॥
ऐसा श्रीगुरूचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला ।
मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥ १४३ ॥
अर्जुना अनंत सुखाच्या डोहीं । एकसरा तळुचि घेतला जिहीं ।
मग स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ॥ १४४ ॥
अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे ।
तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥ १४५ ॥
जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम ।
जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥ १४६ ॥
जे महर्षीं वाढले । विरक्तां भागा फिटलें ।
जे निःसंशया पिकलें । निरंतर ॥ १४७ ॥

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ २६॥

जिहीं विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिलें ।
ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥ १४८ ॥
तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण ।
तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥ १४९ ॥
ते ऐसे कैसेंनि जहाले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले ।
हें पुससी तरी भलें । संक्शेपें सांगों ॥ १५० ॥

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ २७॥

यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ २८॥

तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें ।
शरीरीं एकंदरें । केलें मन ॥ १५१ ॥
सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी ।
तेथ पाठिमोरी दिठी । पारखोनियां॥ १५२ ॥
सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम ।
चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती॥ १५३ ॥
तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्रीं मिळे ।
मग एकेकु वेगळें । निवडूं नये॥ १५४ ॥
तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना ।
जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥ १५५ ॥
जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूपु पटु फाटे ।
जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं॥ १५६ ॥
तैसें मन एथ मुद्दल जाय । मग अहंभावादिक कें आहे ।
म्हणौनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥ १५७ ॥

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ २९॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‍भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंज्ञासयोगोनाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥

आम्हीं मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले ।
ते येणें मार्गें आले । म्हणौनियां ॥ १५८ ॥
आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर ।
क्रमोनि हे पार । पातले ते॥ १५९ ॥
तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतलें माप ।
मग साचाचेंचि रूप । होऊनि ठेले॥ १६० ॥
ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु ।
तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणौनि चमत्कारला॥ १६१ ॥
तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें ।
काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें ? ॥ १६२ ॥
तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो ।
भला जाणितला जी भावो । मानसु माझा॥ १६३ ॥
म्यां जें कांहीं विवरोनि पुसावें । तें आधींचि जाणितलें देवें ।
तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करूनि॥ १६४ ॥
एर्‍हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा ।
तो पव्हण्याहूनि पायौतारा । सोहपा जैसा॥ १६५ ॥
तैसा सांख्याहूनि प्रांजळा । परी आम्हांसारिखियां अभोळां ।
एथ आहाति परि कांहीं काळा । तो साहों ये वर ॥ १६६ ॥
म्हणौनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा ।
विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि॥ १६७ ॥
तंव श्रीकृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्गु गमला निका ।
तरी काय जाहलें आईकीजो कां । सुखें बोलों॥ १६८ ॥
अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी ।
तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची ? ॥ १६९ ॥
आधींचि चित्त मायेचें । वरी मिष जाहले पढियंतयाचें ।
आतां तें अद्‍भुतपण स्नेहाचें । कवण जाणे॥ १७० ॥
तें म्हणो कारुण्यरसाची वृष्टि । कीं नवया स्नेहाची सृष्टि ।
हें असो नेणिजे दृष्टी । हरीची वानूं ॥ १७१ ॥
जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊनि मातली ।
म्हणौनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणें ॥ १७२ ॥
हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल ।
परि तें स्नेहरूपा न येल । बोलवरी॥ १७३ ॥
म्हणौनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु कवळावा कवणें ।
जो आपुलें मान नेणें । आपणचि॥ १७४ ॥
तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु ।
जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा॥ १७५ ॥
अर्जुना जेणें जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे।
तैसें तैसें विनोदें । निरूपिजेल ॥ १७६ ॥
तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु ।
अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥ १७७ ॥
ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठाईं ।
तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां॥ १७८ ॥
तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणौनि श्रीहरी ।
बोलिजेल ते पुढारी । कथा आहे॥ १७९ ॥
श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु ।
तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु॥ १८० ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां पंचमोऽध्यायः ॥

Leave a Comment