श्रीज्ञानेश्वरी – अध्याय दुसरा

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥

श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ द्वितीयोऽध्यायः – अध्याय दुसरा ।
। साङ्ख्ययोगः ।

संजय उवाच ।
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥

मग संजयो म्हणे रायातें । आईके तो पार्थु तेथें ।
शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥
तें कुळ देखोनि समस्त । स्‍नेह उपनलें अद्‍भुत ।
तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥
जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।
तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३ ॥
म्हणौनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।
जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु ।
देखोनि श्रीशारङ्गधरु । काय बोले ॥ ५ ॥

श्रीभगवानुवाच ।
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २॥

म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं ।
तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥
तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें ।
करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कहीं न संडिसी ।
तुझेनि नामें अपयशी । दिशा लंघिजे ॥ ८ ॥
तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥
तुवां संग्रामीं हरु जिंकिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।
पवाडा तुवां केला । गंधर्वांसीं ॥ १० ॥
पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ।
ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें ॥ ११ ॥
तो तूं कीं आजि एथें । सांडूनियां वीरवृत्तीतें ।
अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥
विचारी तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजसी दीनु ।
सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ? ॥ १३ ॥
ना तरी पवनु मेघासी बिहे ? । कीं अमृतासी मरण आहे ? ।
पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ? ॥ १४ ॥
कीं लवणेंचि जळ विरे ? । संसर्गें काळकूट मरे ? ।
सांग पां महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ? ॥ १५ ॥
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि कें जाहला ? ।
परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥
म्हणौनि अझुनी अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।
वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई ॥ १७ ॥
सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ १८ ॥
हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां ।
सांगें झुंजावेळे सदयता । उचित कायी ? ॥ १९ ॥
हे असतीये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।
म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३॥

म्हणौनि शोकु न करी । तूं पुरता धीरु धरीं ।
हें शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥
तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत ।
तूं अझुनी वरी हित । विचारीं पां ॥ २२ ॥
येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळूपण नुपकरे ।
हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ? ॥ २३ ॥
तूं आधींचि काय नेणसी ? । कीं हे गोत्रज नोळखसी ? ।
वायांचि काय करिसी । अतिशो आतां ? ॥ २४ ॥
आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज ? ।
हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ॥ २५ ॥
तरी आतां काय जाहलें । कायि स्‍नेह उपनलें ।
हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥ २६ ॥
मोहो धरिलीया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल ।
आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥
हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।
हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २८ ॥
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु ।
हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥

अर्जुन उवाच ।
कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ ४॥

देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं ।
आधीं तूंचि विचारीं । संग्रामु हा ॥ ३० ॥
हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु ।
हा उघड लिंगभेदु । वोढवला आम्हां ॥ ३१ ॥
देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोषु पावविजती ।
तिये पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं ॥ ३२ ॥
देवा संतवृंद नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे ।
हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ? ॥ ३३ ॥
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे ।
मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥ ३४ ॥
जयांलागीं मनें विरूं । आम्ही स्वप्नींही न शकों धरूं ।
तयां प्रत्यक्ष केवीं करूं । घातु देवा ? ॥ ३५ ॥
वरी जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहले ।
जे यांच्या वधीं अभ्यासिले । मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥
मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला ।
तेणें उपकारें काय आभारैला । वधी तयातें ? ॥ ३७ ॥
जेथींचिया कृपा लाहिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु ।
तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥

गुरुनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान्रुधिरप्रदिग्धान् ॥ ५॥

देवा समुद्र गंभीर आइकिजे । वरि तोहि आहाच देखिजे ।
परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥
हें अपार जें गगन । वरी तयाही होईल मान ।
परि अगाध भलें गहन । हृदय याचें ॥ ४० ॥
वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्रही फुटे ।
परी मनोधर्मु न लोटे । विकरविलाही ॥ ४१ ॥
स्‍नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये ।
परी कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥
हा कारुण्याची आदि । सकल गुणांचा निधि ।
विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥
हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागीं कृपावंतु ।
आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥
ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें ।
तें मना न ये आघवें । जीवितेसीं ॥ ४५ ॥
हें येणें मानें दुर्धर । जे याहीहुनी भोग सधर ।
ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥
ना तरी देशत्यागें जाइजे । कां गिरिकंदर सेविजे ।
परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥
देवा नवनिशतीं शरीं । वावरोनी यांच्या जिव्हारीं ।
भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥
ते काढूनि काय किजती ? । लिप्त केवी सेविजती ? ।
मज नये हे उपपत्ती । याचिलागीं ॥ ४९ ॥
ऐसें अर्जुन तिये अवसरी । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।
परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥
हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला ।
म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥ ५१ ॥

न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ ६॥

येर्‍हवीं माझ्या चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें ।
परी निकें काय यापरौतें । तें तुम्हीं जाणा ॥ ५२ ॥
पैं वीरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे ।
ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥
आतां ऐसियांतें वधावें । कीं अव्हेरूनियां निघावें ।
या दोहींमाजीं बरवें । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥

कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ ७॥

आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ ।
जें मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ॥ ५५ ॥
तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे ।
मग पासींच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥
देवा तैसें मज जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें ।
आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥ ५७ ॥
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें ।
जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥ ५८ ॥
तूं गुरु बंधु पिता । तूं आमुची इष्ट देवता ।
तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥ ५९ ॥
जैसा शिष्यांतें गुरु । सर्वथा नेणें अव्हेरु ।
कीं सरितांतें सागरु । त्यजीं केवी ॥ ६० ॥
नातरी अपत्यांतें माये । सांडूनि जरी जाये ।
तरी तें कैसेंनि जिये । ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥
तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी ।
आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥ ६२ ॥
तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा ।
तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्‍नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥

हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपनलासे मनीं ।
तो तुझिया वाक्यावांचुनी । न जाय आणिकें ॥ ६४ ॥
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल ।
परी मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जर्‍ही पेरिलीं ।
तरी न विरूढती सिंचिलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥
ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे ।
एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥
तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीव बुद्धि ।
एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥
ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला ।
मग पुनरपि व्यापिला । उर्मी तेणें ॥ ६९ ॥
कीं मज पाहतां उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे ।
तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥ ७० ॥
सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं ।
लागला म्हणोनि लहरी । भांजेचिना ? ॥ ७१ ॥
हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवेंचि विष फेडी ।
तो धांवया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा ।
तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥
म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु ।
म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु ।
जैसा घनपटळीं भानु । आच्छादिजे ॥ ७५ ॥
तयापरी तो धनुर्धरु । जाहलासे दुःखें जर्जरु ।
जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥
म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु ।
तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ ७७ ॥
तेथ सुदशनांची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती ।
गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ ७८ ॥
आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल ।
मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची ॥ ७९ ॥
ते कथा आइका । मनाचिया आराणुका ।
ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥

संजय उवाच ।
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतप ।
न योत्स्य इति गोविंमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९॥

ऐसें संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थु ।
पुनरपि शोकाकुळितु । काय बोले ॥ ८१ ॥
आइके सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें ।
मी सर्वथा न झुंजें एथें । भरंवसेनी ॥ ८२ ॥
ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला ।
तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥ ८३ ॥

तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरूभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ १०॥

मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें ।
अर्जुन सर्वथा कांहीं नेणें । काय कीजे ॥ ८४ ॥
हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरू स्वीकारी ।
जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥
ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि ।
वैद्य सूचि निरवधि । निदानीची ॥ ८६ ॥
तैसे विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोन्ही सैन्याआंतु ।
जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥ ८७ ॥
तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें ।
जैसे मातेच्या कोपीं थोकुलें । स्‍नेह आथी ॥ ८८ ॥
कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणीं ।
ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥
तैसीं वरिवरी पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें ।
तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥ ९० ॥

श्रीभगवानुवाच ।
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ ११॥

मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें ।
जें तुवां एथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥
तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी ।
आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥
जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें ।
तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥
तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी ।
हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥ ९४ ॥
तरी सांग पां अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ? ।
हे अनादि विश्वरचना । तें लटके कायी ? ॥ ९५ ॥
एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती ।
तरी हें वायांचि काय बोलती । जगामाजीं ? ॥ ९६ ॥
हो कां सांप्रत ऐसें जाहलें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें ।
आणि नाशु पावे नाशिलें । तुझेनि कायी ॥ ९७ ॥
तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं ।
तरी सांगें कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥
कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता ।
ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥ ९९ ॥
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें ।
तरी तुवां कां शोचावें । सांगें मज ॥ १०० ॥
परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतीसी ।
आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥ १०१ ॥
देखैं विवेकी जे होती । ते दोहीतेंहीं न शोचिती ।
जे होय जाय हे भ्रांती । म्हणौनियां ॥ १०२ ॥

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२॥

अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख ।
आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥ १०३ ॥
नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनी ।
हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाहीं ॥ १०४ ॥
हे उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे ।
एर्‍हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥ १०५ ॥
जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें ।
तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ? ॥ १०६ ॥
तेंचि वायूचें स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाट जाहलें ।
तरी आतां काय निमालें । विचारीं पां ॥ १०७ ॥

देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ १३॥

आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक ।
हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ १०८ ॥
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे ।
परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥
तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं ।
ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४॥

एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे ।
परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥
तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं ।
ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥
एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियां आधीनपण ।
तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती ।
ते अंतर आप्‍लविती । संगें येणें ॥ ११२ ॥
जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।
तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ ११३ ॥
देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।
तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥
मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।
जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥
भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख ।
जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।
जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ११७ ॥
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु ।
म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥
देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे ।
आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥
या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।
ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।
कां स्वप्‍नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥
देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं ।
हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५॥

हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोनी न पवती ।
आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ १२३ ॥
तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा ।
जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ १६॥

आतां अर्जुना कांहीं एक । सांगेन मी आईक ।
जे विचारपर लोक । वोळखिती ॥ १२५ ॥
या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥
सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे ।
परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥ १२७ ॥
कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ ।
निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥ १२८ ॥
ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी ।
मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥ १२९ ॥
कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट ।
तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ॥ १३० ॥
तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें ।
मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ॥ १३१ ॥
म्हणौनि अनित्याच्या ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं ।
निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥ १३२ ॥

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ १७॥

देखें सारासार विचारितां । भ्रांति ते पाहीं असारता ।
तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥ १३३ ॥
हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु ।
तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाहीं ॥ १३४ ॥
जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु ।
तया केलियाहि घातु । कदा नोहे ॥ १३५ ॥

अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥ १८॥

आणि शरीरजात आघवें । हें नाशिवंत स्वभावें ।
म्हणौनि तुवां झुंजावें । पंडुकुमरा ॥ १३६ ॥

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९॥

तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि शरीरातें ।
मी मारिता हे मरते । म्हणतु आहासी ॥ १३७ ॥
तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी ।
तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥

न जायते म्र्यिते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २०॥

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१॥

जैसें स्वप्‍नामाजीं देखिजे । तें स्वप्‍नींचि साच आपजे ।
मग चेऊनियां पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥ १३९ ॥
तैसी हे जाण माया । तूं भ्रमतु आहासी वायां ।
शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रुपे ॥ १४० ॥
कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला ।
परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥ १४१ ॥
ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे ।
तो भंगलिया आपैसें । स्वरूपचि ॥ १४२ ॥
तैसें शरीराच्या लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं ।
म्हणौनि तू हें नारोपी । भ्रांति बापा ॥ १४३ ॥

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २२॥

जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।
तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥ १४४ ॥

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३॥

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४॥

हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु ।
म्हणौनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥ १४५ ॥
हा प्रळयोदकें नाप्‍लवे । अग्निदाहो न संभवे ।
एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥ १४६ ॥
अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु ।
सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥१४७ ॥

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५॥

हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरीटी ।
ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥
हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना ।
निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥
हा गुणत्रयरहितु । अनादि अविकृतु ।
व्यक्तीसी अतीतु । सर्वरूप ॥ १५० ॥
अर्जुना ऐसा हा जाणावा । सकळात्मकु देखावा ।
मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ॥ १५१ ॥

अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शौचितुमर्हसि ॥ २६॥

अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि मानिसी ।
तर्‍ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥ १५२ ॥
जो आदि स्थिति अंतु । हा निरंतर असे नित्यु ।
जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥ १५३ ॥
तें आदि नाहीं खंडलें । समुद्रीं तरी असे मीनलें ।
आणि जातचि मध्यें उरलें । दिसे जैसें ॥ १५४ ॥
इयें तिन्ही तयापरी । सरसींच सदा अवधारीं ।
भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना ॥ १५५ ॥
म्हणौनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें ।
जे स्थितीचि हे स्वभावें । अनादि ऐसी ॥ १५६ ॥
ना तरी हें अर्जुना । नयेचि तुझिया मना ।
जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥ १५७ ॥
तरी एथ कांहीं । तुज शोकासि कारण नाहीं ।
हे जन्ममृत्यु पाहीं । अपरिहर ॥ १५८ ॥

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २७॥

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥ १५९ ॥
ना तरी उदो अस्तु आपैसें । अखंडित होत जात जैसें ।
हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ १६० ॥
महाप्रळयावसरें । हें त्रैलोक्यहि संहरे ।
म्हणौनि हा न परिहरे । आदि अंतु ॥ १६१ ॥
तूं जरी हें ऐसें मानिसी । तरी खेदु कां करिसी ? ।
काय जाणतुचि नेणसी । धनुर्धरा ॥ १६२ ॥
एथ आणीकही एक पार्था । तुज बहुतीं परी पहातां ।
दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥ १६३ ॥

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २८॥

जियें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमूर्तें ।
मग पातली व्यक्तीतें । जन्मलेया ॥ १६४ ॥
तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती ।
देखें पूर्वस्थितीच येती । आपुलिये ॥ १६५ ॥
येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्‍न जैसें ।
तैसा आकारु हा मायवशें । तत्स्वरूपीं ॥ १६६ ॥
ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार ।
कां परापेक्षां अळंकार । व्यक्ती कनकीं ॥ १६७ ॥
तैसे सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित ।
जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥ १६८ ॥
तैसें आदीचि जें नाहीं । तयालागीं तूं रुदसी कायी ।
तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥ १६९ ॥
जयाचि आर्तीचि भोगित । विषयीं त्यजिले संत ।
जयालागीं विरक्त । वनवासिये ॥ १७० ॥
दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें ।
मुनीश्वर तपातें । आचरताती ॥ १७१ ॥

आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः श्रुणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९॥

एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ ।
विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥
एकां गुणानुवादु करितां । उपरति होऊन चित्ता ।
निरवधि तल्लीनता । निरंतर ॥ १७३ ॥
एक ऐकतांचि निवाले । ते देहभावी सांडिले ।
एक अनुभवें पातले । तद्रूपता ॥ १७४ ॥
जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजीं मिळत ।
परी माघौते न समात । परतले नाहीं ॥ १७५ ॥
तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळवणीसवें एकवटती ।
परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥ १७६ ॥

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ ३०॥

जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं ।
तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥ १७७ ॥
जयाचेनि स्वभावें । हें होत जात आघवें ।
तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥ १७८ ॥
एर्‍हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता ।
परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥ १७९ ॥

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्माद्धि युद्धाच्छेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१॥

तूं अझुनी कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी ।
स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥ १८० ॥
या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातलें ।
कीं युगचि हें बुडालें । जर्‍ही एथ ॥ १८१ ॥
तरी स्वधर्मु एकु आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे ।
मग तरिजेल काय पाहें । कृपाळूपणें ॥ १८२ ॥
अर्जुना तुझें चित्त । जर्‍ही जाहलें द्रवीभूत ।
तर्‍ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥ १८३ ॥
अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें ।
ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥
तैसें आनी आन करितां । नाशु होईल हिता ।
म्हणौनि तूं आतां । सावध होई ॥ १८५ ॥
वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं ।
जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ॥ १८६ ॥
जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा ।
कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥ १८७ ॥
तयापरी पार्था । स्वधर्में राहाटतां ।
सकळ कामपूर्णता । सहजें होय ॥ १८८ ॥
म्हणौनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं ।
संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥ १८९ ॥
निष्कपटा होआवें । उसिणा घाई झुंजावें ।
हें असो काय सांगावें । प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥ ३२॥

अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो कां जें दैव तुमचें ।
कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥ १९१ ॥
हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें ।
मूर्त कां प्रतापें । उदो केला ॥ १९२ ॥
ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तीचेनि पडिभरें ।
हें कीर्तीचि स्वयंवरें । आली तुज ॥ १९३ ॥
क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तैं झुंज ऐसें लाहिजे ।
जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणि ॥ १९४ ॥
ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख ।
तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥ १९५ ॥

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ ३३॥

आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं बैसिजे ।
तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥ १९६ ॥
पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें ।
जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ॥ १९७ ॥
असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल ।
आणि गिंवसित पावतील । महादोष ॥ १९८ ॥
जैसीं भातारेंहीन वनिता । उपहती पावे सर्वथा ।
तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥
ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरी गिधीं विदारिजे ।
तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ॥ २०० ॥

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४॥

म्हणौनि स्वधर्मु हा सांडसील । पापा वरपडा होसील ।
आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ॥ २०१ ॥
जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे ।
आणि सांग पां केवीं निगावें । एथोनियां ? ॥ २०२ ॥
तू निर्मत्सर सदयता । येथूनि निघसील कीर माघौता ।
परी ते गती समस्तां । न मनेल ययां ॥ २०३ ॥
हे चहूंकडूनि वेढितील । बाणवरी घेतील ।
तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणें ॥ २०४ ॥
ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे ।
तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥ २०५ ॥

भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ ३५॥

तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी ।
आणि सकणवपणें निघालासी । मागुता जरी ॥ २०६ ॥
तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां ।
कां प्रत्यया येईल मना । सांगैं मज ॥ २०७ ॥

अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥ ३६॥

हे म्हणती गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला ।
हा सांगैं बोलु उरला । निका कायी ? ॥ २०८ ॥
लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें ।
परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥ २०९ ॥
ते तुज अनायासें । अनकळित जोडिली असे ।
हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥ २१० ॥
तैसी कीर्ती निःसीम । तुझ्या ठायीं निरुपम ।
तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥ २११ ॥
दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती ।
जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥ २१२ ॥
ऐसी महिमा घनवट । गंगा जैसी चोखट ।
जया देखीं जगीं सुभट । वाट जाहली ॥ २१३ ॥
तें पौरुष तुझें अद्‍भुत । आइकोनियां हे समस्त ।
जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥ २१४ ॥
जैसा सिंहाचिया हाकां । युगांतु होय मदमुखा ।
तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥ २१५ ॥
जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडातें ।
तैसे अर्जुना हे तूतें । मानिती सदा ॥ २१६ ॥
तें अगाधपण जाईल । मग हीणावो अंगा येईल ।
जरी मागुता निघसील । न झुंजतुचि ॥ २१७ ॥
आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनिं अवकळा करिती ।
न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥ २१८ ॥
मग ते वेळीं हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुजावें ? ।
हे जिंतलें तरी भोगावें । महीतळ ॥ २१९ ॥

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७॥

ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित ।
तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२०॥
म्हणौनि ये गोठी । विचारु न करी किरीटी ।
आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजैं वेगीं ॥ २१॥
ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित ।
तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२० ॥
म्हणौनि ये गोठी । विचारु न करी किरीटी ।
आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजैं वेगीं ॥ २२१ ॥
देखैं स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता ।
तुज भ्रांति हे कवण चित्ता । पातकाची ॥ २२२ ॥
सांगैं प्‍लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे ।
परी विपायें चालों नेणिजे । तरी तेंही घडे ॥ २२३ ॥
अमृतें तरीच मरिजे । जरी विखेंसि सेविजे ।
तैसा स्वधर्मीं दोषु पाविजे । हेतुकपणें ॥ २२४ ॥
म्हणौनियां पार्था । हेतू सांडोनि सर्वथा ।
तुज क्षात्रवृत्ति झुंजतां । पाप नाहीं ॥ २२५ ॥

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८॥

सुखीं संतोषां न यावें । दुःखीं विषादा न भजावें ।
आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥ २२६ ॥
एथ विजयपण होईल । कीं सर्वथा देह जाईल ।
हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥
आपणयां उचिता । स्वधर्में राहाटतां ।
जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥
ऐसियां मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें ।
म्हणौनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥

एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ ३९॥

हे सांख्यस्थिति मुकुळित । सांगितली तुज येथ ।
आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥ २३० ॥
जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था।
कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पवे ॥ २३१ ॥
जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।
परी जैतेसीं उरिजे । अचुंबित ॥ २३२ ॥

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४०॥

तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे ।
जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ॥ २३३ ॥
कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे ।
जैसा मंत्रज्ञु न बंधिजे । भूतबाधा ॥ २३४ ॥
तियापरी जे सुबुद्धि । आपुलालिया निरवधि ।
हा असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥ २३५ ॥
जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप ।
गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ २३६ ॥
अर्जुना तें पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे ।
तरी अशेषही नाशे । संसारभय ॥ २३७ ॥

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥ ४१॥

जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रकटी ।
तैसी सद्‍बुद्धी हे थेकुटी । म्हणों नये ॥ २३८ ॥
पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरीं ।
जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥ २३९ ॥
आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु ।
कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ २४० ॥
तैसी दुर्लभ जे सद्‍बुद्धि । जिये परमात्माचि अवधि ।
जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ २४१ ॥
तैसें ईश्वरावाचुंनी कांहीं । जिये आणीक लाणी नाहीं ।
ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ २४२ ॥
येर ते दुर्मति । जे बहुधा असे विकरति ।
तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ २४३ ॥
म्हणौनि तयां पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था ।
आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२॥

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३॥

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४॥

वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती ।
परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥ २४५ ॥
म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे ।
मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥ २४६ ॥
येथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं ।
ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥
देखैं कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत ।
ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ २४८ ॥
क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें ।
निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती ॥ २४९ ॥
परी एकचि कुडें करितीं । जे स्वर्गकामु मनीं धरिती ।
यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥
जैसा कर्पूराचा राशी कीजे । मग अग्नि लाऊन दीजे ।
कां मिष्टान्नीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥
दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।
तैसा नासिती धर्मु निपजला । हेतुकपणें ॥ २५२ ॥
सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु कां अपेक्षिजे ? ।
परी नेणती ते काय कीजे । अप्राप्य देखें ॥ २५३ ॥
जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोलें विकी ।
तैसा भोगासाठीं अविवेकी । धाडिती धर्मु ॥ २५४ ॥
म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा ।
तया वेदवादरतां । मनीं वसे ॥ २५५ ॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५॥

तिन्हीं गुणीं आवृत । हे वेद जाणैं निभ्रांत ।
म्हणौनि उपनिषदादि समस्त । सात्विक तें ॥ २५६ ॥
येर रजतमात्मक । जेथ निरूपिजे कर्मादिक ।
जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥ २५७ ॥
म्हणौनि तूं जाण । हे सुखदुःखांसीच कारण ।
एथ झणें अंतःकरण । रिगों देसी ॥ २५८ ॥
तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं ।
एक आत्मसुख अंतरीं । विसंब झणीं ॥ २५९ ॥

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्‍लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥

जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले ।
तर्‍ही आपण हित आपुलें । तेंचि घेपें ॥ २६० ॥
जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती ।
तरी तेतुलेहि काय चालिजती । सांगैं मज ॥ २६१ ॥
कां उदकमय सकळ । जर्‍ही जाहले असें महीतळ ।
तरी आपण घेपें केवळ । आर्तीचिजोगें ॥ २६२ ॥
तैसें ज्ञानीये जे होती । ते वेदार्थातें विवरिती ।
मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥ २६३ ॥

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥

म्हणोनि आइकें पार्था । याचिपरी पाहतां ।
तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥ २६४ ॥
आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेचि हें मना आलें ।
जें न सांडिजे तुवां आपुलें । विहित कर्म ॥ २६५ ॥
परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मीं संगति न व्हावी ।
हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥ २६६ ॥

योगस्थः कुरु कर्माणि सङ्गंत्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ ४८॥

तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संगु टाकुनी ।
मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥ २६७ ॥
परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे ।
तरी विशेषें तेथ तोषावें । हेंही नको ॥ २६८ ॥
कीं निमित्तें कोणें एकें । तें सिद्धी न वचतां ठाके ।
तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥ २६९ ॥
आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाची कीर आलें ।
परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥
देखैं जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे ।
तरी परिपूर्ण सहजें । जहालें जाणैं ॥ २७१ ॥
देखैं संतासंतकर्मीं । हें जें सरिसेंपण मनोधर्मीं ।
तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥ २७२ ॥

दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ ४९॥

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥ ५०॥

अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाणैं योगाचें ।
जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥ २७३ ॥
तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें पार्था ।
दिसे हा अरुता । कर्मभागु ॥ २७४ ॥
परी तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे ।
जें कर्मशेष सहजें । योगस्थिति ॥ २७५ ॥
म्हणौनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु ।
मनें करीं अव्हेरु । फलहेतूचा ॥ २७६ ॥
जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले ।
इहीं उभयबंधीं सांडिले । पापपुण्यीं ॥ २७७ ॥

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥ ५१॥

ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती ।
आणि यातायाति न लोपती । अर्जुना तयां ॥ २७८ ॥
मग निरामयभरित । पावती पद अच्युत ।
ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥ २७९ ॥

यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५२॥

तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें यया सांडिसी ।
आणि वैराग्य मानसीं । संचरैल ॥ २८० ॥
मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान ।
तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥ २८१ ॥
तेथ आणिक कांहीं जाणावें । कां मागिलातें स्मरावें ।
हें अर्जुना आघवें । पारुषेल ॥ २८२ ॥

श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ ५३॥

इंद्रियांचिया संगति । जिये पसरु होतसे मति ।
ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥ २८३ ॥
समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ ।
तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥ २८४ ॥

अर्जुन उवाच ।
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ ५४॥

तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा ।
मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधी ॥ २८५ ॥
मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें ।
तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥ २८६ ॥
या बोला पार्थें । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें ।
काय म्हणिपें स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥ २८७ ॥
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसिया चिन्हीं जाणिजे ।
जो समाधिसुख भुंजे । अखंडित ॥ २८८ ॥
तो कवणें स्थिती असे । कैसेनि रूपीं विलसे ।
देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥ २८९ ॥
तंव परब्रह्म अवतरणु । जो षडगुणाधिकरणु ।
तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥ २९० ॥

श्रीभगवानुवाच ।
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ ५५॥

म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं ।
तो अंतराय स्वसुखेंसीं । करीतु असे ॥ २९१ ॥
जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरण भरितु ।
परी विषयामाजीं पतितु । जेणें संगें कीजे ॥ २९२ ॥
तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे ।
तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणैं ॥ २९३ ॥

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ ५६॥

नाना दुःखीं प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं ।
आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥ २९४ ॥
अर्जुना तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं ।
आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्णु तो ॥ २९५ ॥
ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि ।
जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥ २९६ ॥

यः सर्वत्रानभिस्‍नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७॥

जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्णु चंद्रु कां जैसा ।
अधमोत्तम प्रकाशा- । माजीं न म्हणे ॥ २९७ ॥
ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता ।
आणि पालटु नाहीं चित्ता । कवणें वेळे ॥ २९८ ॥
गोमटें कांहीं पावे । तरी संतोषें तेणें नाभिभवे ।
जो वोखटेनि नागवे । विषादासी ॥ २९९ ॥
ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु ।
तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥ ३०० ॥

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८॥

कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।
ना तरी इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥ ३०१ ॥
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिति । पातली असे ॥ ३०२ ॥

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९॥

अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक ।
या विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥
श्रेत्रादि इंद्रियें आवरिती । परि रसने नियमु न करिती ।
ते सहस्त्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥ ३०४ ॥
जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।
तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥ ३०५ ॥
तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवेनि आंगें फांके ।
तैसा मानसीं विषो पोखे । रसनाद्वारें ॥ ३०६ ॥
येरां इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें ।
जे जीवन हें न घटे । येणेंविण ॥ ३०७ ॥
मग अर्जुना स्वभावें । ऐसियाही नियमातें पावे ।
जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ॥ ३०८ ॥
तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती ।
जैं सोहंभाव प्रतीति । प्रगट होय ॥ ३०९ ॥

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ ६०॥

येर्‍हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना ।
जे राहटताती जतना । निरंतर ॥ ३१० ॥
जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी ।
जे मनातें सदा मुठी । धरूनि आहाती ॥ ३११ ॥
तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी ।
जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥ ३१२ ॥
देखैं विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धिचेनि मिषें ।
मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥ ३१३ ॥
तिये संधीं मन जाये । मग अभ्यासीं ठोठावलें ठाये ।
ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचें ॥ ३१४ ॥

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१॥

म्हणौनि आइकें पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा ।
सर्व विषयीं आस्था । सांडूनियां ॥ ३१५ ॥
तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण ।
जयाचे विषयसुखें अंतःकरण । झकवेना ॥ ३१६ ॥
जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु ।
जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥ ३१७ ॥
येर्‍हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं ।
तरी साद्यंतुचि पाहीं । संसारु असे ॥ ३१८ ॥
जैसा कां विषाचा लेशु । घेतलियां होय बहुवसु ।
मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥ ३१९ ॥
तैसी विषयाची शंका । मनीं वसती देखा ।
घातु करी अशेखा । विवेकजाता ॥ ३२० ॥

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ ६२॥

क्रोधाद्‍भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद्‍बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ ६३॥

जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती ।
संगें प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥ ३२१ ॥
जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला ।
क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ॥ ३२२ ॥
संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति ।
चडवातें ज्योति । आहत जैसी ॥ ३२३ ॥
कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्य तेजातें ग्रासी ।
तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥ ३२४ ॥
मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्‍लविजे सकळ ।
तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ॥ ३२५ ॥
जैसें जात्यंधा पळणीं पावे । मग ते काकुळती सैरा धांवे ।
तैसें बुद्धीसि होती भंवे । धनुर्धरा ॥ ३२६ ॥
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे ।
तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥ ३२७ ॥
चैतन्याच्या भ्रंशीं । शरीरा दशा जैशी ।
तैसें पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखैं ॥ ३२८ ॥
म्हणौनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधना ।
मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥ ३२९ ॥
तैसें विषयांचें ध्यान । जरी विपायें वाहे मन ।
तरी येसणें हें पतन । गिंवसित पावे ॥ ३३० ॥

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४॥

म्हणौनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे ।
मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥ ३३१ ॥
पार्था आणिकही एक । जरी नाशले रागद्वेष ।
तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाहीं ॥ ३३२ ॥
जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरें जगातें स्पर्शतु ।
तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिचेनि ॥ ३३३ ॥
तैसा इंद्रियार्थीं उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न ।
जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥ ३३४ ॥
तरी विषयां तयां कांहीं । आपणपेंवांचूनि नाहीं ।
मग विषय कवण कायी । बाधितील कवणा ॥ ३३५ ॥
जरी उदकीं उदक बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे ।
तरी विषयसंगे आप्‍लविजे । परिपूर्णु तो ॥ ३३६ ॥
ऐसा आपणचि केवळु । होऊनि असे निखळु ।
तयाचि प्रज्ञा अचळु । निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ ६५॥

देखैं अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।
तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३३८ ॥
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।
तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥
तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ? ।
तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥ ३४० ॥
जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणें कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शांतिरशान्तस्य कुतः सुखम् ॥ ६६॥

ये युक्तीची कडसणी । नाहीं जयाच्या अंतःकरणीं ।
तो आकळिला जाण गुणीं । विषयादिकीं ॥ ३४२ ॥
तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा ।
आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥ ३४३ ॥
निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखैं मना ।
तरी शांति केवीं अर्जुना । आपु होय ॥ ३४४ ॥
जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं ।
जैसा पापियाच्या ठायीं । मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥
देखैं अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरूढती ।
तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥ ३४६ ॥
म्हणौनि अयुक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दुःखाचें ।
या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥ ३४७ ॥

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनु विधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ ६७॥

इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।
ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥
जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता ।
तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥ ३४९ ॥
तैसीं प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।
तरी आक्रमिला जाण दुःखें । संसारिकें ॥ ३५० ॥

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।
इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६८॥

म्हणौनि आपुलीं आपणपेया । जरी इंद्रियें येती आया ।
तरी अधिक कांहीं धनंजया । सार्थक असे ? ॥ ३५१ ॥
देखैं कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।
ना तरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ॥ ३५२ ॥
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥
आतां आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह ।
अर्जुना तुज सांगैन । परिस पां ॥ ३५४ ॥

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ ६९॥

देखैं भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें ।
आणि जीव जेथ चेइलें । तेथ निद्रितु जो ॥ ३५५ ॥
तोचि तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि ।
तोचि जाणें निरवधि । मुनीश्वर ॥ ३५६ ॥

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्‍नोति न कामकामी ॥ ७०॥

पार्था आणीकही परी । तो जाणों येईल अवधारीं ।
जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ॥ ३५७ ॥
जर्‍ही सरितावोघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत ।
तर्‍ही अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥ ३५८ ॥
ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता ।
परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ॥ ३५९ ॥
तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धीं । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी ।
आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥ ३६० ॥
सांगैं सूर्याच्या घरीं । प्रकाशु काय वातीवेरी ।
कां न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥ ३६१ ॥
देखैं ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी ।
तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥ ३६२ ॥
जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे ।
तो केवीं रंजे पालिवणें । भिल्लांचेनि ? ॥ ३६३ ॥
जो अमृतासी ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी ।
तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥
पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं ।
तेथ ऋद्धिसिद्धी कायी । प्राकृता होती ॥ ३६५ ॥

विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति ॥ ७१॥

ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला ।
तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तूं ॥ ३६६ ॥
तो अहंकारातें दंडुनी । सकळ कामु सांडोनी ।
विचरे विश्व होऊनी । विश्वामाजीं ॥ ३६७ ॥

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ ७२॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‍भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगोनाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥

हे ब्रह्मस्थिति निःसीम । जे अनुभवितां निष्काम ।
ते पावले परब्रह्म । अनायासें ॥ ३६८ ॥
जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीचि व्याकुळता ।
आड ठाकों न सके चित्ता । प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥
तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति ।
सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥ ३७० ॥
ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें ।
आतां आमुचियाचि काजा कीर आलें । उपपत्ति इया ॥ ३७१ ॥
जें कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें ।
तरी पारुषलें म्यां झुंजावें । म्हणौनियां ॥ ३७२ ॥
ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवाइला ।
आतां प्रश्नु करील भला । आशंकोनी ॥ ३७३ ॥
तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासी आगरु ।
कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥ ३७४ ॥
जो आपण सर्वज्ञनाथु । निरूपिता होईल श्रीअनंतु ।
ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तिदासु ॥ ३७५ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः ॥

Leave a Comment