गीताई – (अध्याय १८)

अर्जुन म्हणाला

संन्यासाचे कसे तत्त्व त्यागाचे हि कसे असे ।
मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती ।
फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग बोलती ॥ २ ॥

दोष-रूप चि ही कर्मे सोडावी म्हणती कुणी ।
न सोडावी चि म्हणती यज्ञ-दान-तपे कुणी ॥ ३ ॥

तरी ह्याविषयी ऐक माझा निश्चित निर्णय ।
त्यग जो म्हणती तो हि तिहेरी भेदला असे ॥ ४ ॥

यज्ञ-दान-तपे नित्य करणीय अवश्यक ।
न सोडावी चि ती होती ज्ञानवंतास पावक ॥ ५ ॥

परी ही पुण्य-कर्मे हि ममत्व फळ सोडुनी ।
करणे योग्य हा माझा जाण उत्तम निर्णय ॥ ६ ॥

नेमिले कार्य जे त्याचा संन्यास नजुळे चि तो ।
केला तसा जरी मोहे त्याग तामस बोलिला ॥ ७ ॥

कष्टामुळे चि जे कर्म सोडणे आंग राखुनी ।
त्याग राजस तो वांझ न देखे आपुले फळ ॥ ८ ॥

करणे नेमिले कर्म कर्तव्य चि म्हणूनिया ।
ममत्व फळ सोडूनि त्याग तो मान्य सात्त्विक ॥ ९ ॥

कर्मी शुभाशुभी जेंव्हा राग-द्वेष न राखतो ।
सत्त्वांत मुरला त्यागी ज्ञने छेदूनि संशय ॥ १० ॥

अशक्य देहवंतास सर्वथा कर्म सोडणे ।
म्हणूनि जो फल-त्यागी तो त्यागी बोलिला असे ॥ ११ ॥

तिहेरी फळ कर्माचे बरे वाईट मिश्रित ।
त्याग-हीनास ते लाभे संन्यासी मुक्त त्यांतुनी ॥ १२ ॥

ऐक तू मजपासूनि ज्ञात्यांचा कर्म-निर्णय ।
परभारे चि हे कर्म करिती पांच कारणे ॥ १३ ॥

अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने ।
वेगळाल्या क्रिया नाना दैव ते येथ पांचवे ॥ १४ ॥

काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी ।
धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे ॥ १५ ॥

तेथ जो शुद्ध आत्म्यास कर्ता मानूनि बैसला ।
संस्कार-हीन तो मूढ तत्त्व नेणे चि दुर्मति ॥ १६ ॥

नसे ज्यास अहंभाव नसे बुद्धीत लिप्तता ।
मारी विश्व जरी सारे न मारी चि न बांधिला ॥ १७ ॥

ज्ञाता ज्ञेय तसे ज्ञान तिहेरी कर्म-बीज हे ।
क्रिया करण कर्तृत्व कर्मांगे तीन त्यांतुनी ॥ १८ ॥

ज्ञाता-कर्मांत कर्त्यांत त्रिगुणी तीन भेद जे ।
रचिले ते कसे ऐक गुण-तत्त्वज्ञ वर्णिती ॥ १९ ॥

भूत-मात्रांत जे पाहे भाव एक सनातन ।
अभिन्न भेदलेल्यांत जाण ते ज्ञान सात्त्विक ॥ २० ॥

भेद-बुद्धीस पोषूनि सर्व भूतांत पाहते ।
वेगळे वेगळे भाव जाण ते ज्ञान राजस ॥ २१ ॥

एका देहांत सर्वस्व मानुनी गुंतले वृथा ।
भावार्थ-हीन जे क्षुद्र जाण ते ज्ञान तामस ॥ २२ ॥

नेमिले जे न गुंतूनि राग-द्वेष न राखता ।
केले निष्काम-वृत्तीने कर्म ते होय सात्त्विक ॥ २३ ॥

ध्रूनि कामना चित्ती जे अहंकार-पूर्वक ।
केले महा खटातोपे कर्म ते होय राजस ॥ २४ ॥

विनाश वेच निष्पत्ति सामर्थ्य हि न पाहता ।
आरंभिले चि जे मोहे कर्म ते होय तामस ॥ २५ ॥

निःसंग निरहंकार उत्साही धैर्य-मंडित ।
फळो जळॉ चळे ना तो कर्ता सात्त्विक बोलिला ॥ २६ ॥

फल-कामुक आसक्त लोभी अस्वच्छ हिंसक ।
मारिता हर्ष-शोके तो कर्ता राजस बोलिला ॥ २७ ॥

स्वच्छंदी क्षुद्र गर्विष्ठ घातकी शठ आळशी ।
दीर्घ-सूत्री सदा खिन्न कर्ता तामस बोलिला ॥ २८ ॥

बुद्धीचे भेद जे तीन धृतीचे हि तसे चि जे ।
गुणानुसार ते सारे सांगतो वेग्वेगळे ॥ २९ ॥

अकर्तव्ये बंध-भय कर्तव्ये मोक्ष निर्भय ।
जाणे सोडू धरू त्यांस बुद्धि सात्त्विक ओळख ॥ ३० ॥

कार्याकार्य कसे काय काय धर्म अधर्म तो ।
जी जाणू न शके चोख बुद्धि राजस ओळख ॥ ३१ ॥

धर्म मानी अधर्मास अंधारे भरली असे ।
अर्थ जी उलटा देखे बुद्धि तामस ओळख ॥ ३२ ॥

जी इंद्रिये मन प्राण ह्यांचे व्यापर चालवी ।
समत्वे स्थिर राहूनि धृति सात्त्विक जाण ती ॥ ३३ ॥

धर्मार्थकाम सारे चि चालवी सोय पाहुनी ।
बुडवी जी फलाशेत धृति राजस जाण ती ॥ ३४ ॥

निद्रा भय न जी सोडी शोक खेद तसा मद ।
घाली झांपड बुद्धीस धृति तामस जाण ती ॥ ३५ ॥

तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐक ते ॥ ३६ ॥

अभ्यासे गोड जे होय दुःखाचा अंत दाखवी ।
जे कडू विख आरंभी अंती अमृत-तुल्य चि ।
आत्म्यांत शुद्ध बुद्धीस लाभले सुख सात्त्विक ॥ ३७ ॥

आरंभी गोडसे वाटे अंती मारक जे विख ।
भासे विषय-संयोगे इंद्रिया सुख राजस ॥ ३८ ॥

निद्रा आळस दुर्लक्ष ह्यांनी आत्म्यास घेरुनी ।
आरंभी परिणामी हि गुंगवी सुख तामस ॥ ३९ ॥

इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी देवादिकांत हि ।
काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणांतुनी ॥ ४० ॥

ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती ती विभागिली ।
स्वभाव-सिद्ध जे ज्याचे गुण त्यास धरूनिया ॥ ४१ ॥

शांति क्षमा तप श्रद्धा ज्ञान विज्ञान निग्रह ।
ऋजुता आणि पावित्र्य ब्रह्म-कर्म स्वभावता ॥ ४२ ॥

शौर्य दैर्य प्रजा-रक्षा युद्धी हि अ-पलायन ।
दातृत्व दक्षता तेज क्षात्र-कर्म स्वभावता ॥ ४३॥

शेती व्यापार गो-रक्षा वैश्य-कर्म स्वभावता ।
करणे पडिली सेवा शूद्र-कर्म स्वभावता ॥ ४४ ॥

आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी ।
ऐक लाभे कसा मोक्ष स्व-कर्मी लक्ष लावुनी ॥ ४५ ॥

जो प्रेरी भूत-मात्रास ज्याचा विस्तार विश्व हे ।
स्व-कर्म-कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो ॥ ४६ ॥

उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा ।
स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ ॥

सहज-प्राप्त ते कर्म न सोडावे सदोष हि ।
दोष सर्व चि कर्मांत राहे अग्नींत धूर तो ॥ ४८ ॥

राखे कुठे न आसक्ति जिंकूनि मन निःस्पृह ।
तो नैष्कर्म्य महा-सिद्धि पावे संन्यास साधुनी ॥ ४९ ॥

सिद्धीस लाभला ब्रह्म गांठी कोण्यापरी मग ।
ज्ञानाची थोर ती निष्ठा ऐक थोडांत सांगतो ॥ ५० ॥

बुद्धि सात्त्विक जोडूनि धृतीचा दोर खेचुनी ।
शब्दादि-स्पर्श टाळूनि राग-द्वेषांस जिंकुनी ॥ ५१ ॥

चित्त वाचा तनू नेमी एकांती अल्प सेवुनी ।
गढला ध्यान-योगात दृढ वैराग्य लेउनी ॥ ५२ ॥

बळ दर्प अहंकार काम क्रोध परिग्रह ।
ममत्वासह सोडूनि शांतीने ब्रह्म आकळी ॥ ५३ ॥

ब्रह्म झाला प्रसन्नत्वे न करी शोक कामना ।
पावे माझी परा भक्ति देखे सर्वत्र साम्य जी ॥ ५४ ॥

भक्तीने तत्त्वता जाणे कोण मी केवढा असे ।
ह्यापरी मज जाणूनि माझ्यात मिसळे मग ॥ ५५ ॥

करूनि हि सदा कर्मे सगळी मज सेवुनी ।
पावे माझ्या कृपेने तो अवीट पद शाश्वत ॥ ५६ ॥

मज मत्पर-वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी ।
समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेव तू ॥ ५७ ॥

मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू ।
मीपणे हे न मानूनि पावशील विनाश चि ॥ ५८ ॥

म्हणसी मी न झुंजे चि हे जे मीपण घेउनी ।
तो निश्चय तुझा व्यर्थ स्वभाव करवील चि ॥ ५९ ॥

स्वभाव-सिद्ध कर्माने आपुल्या बांधिलास तू ।
जे टाळू पाहसी मोहे अवश्य करिशील ते ॥ ६० ॥

राहिला सर्व भूतांच्या हृदयी परमेश्वर ।
मायेने चाळवी त्यास जणू यंत्रांत घालुनी ॥ ६१ ॥

त्याते चि सर्व-भावे तू जाई शरण पावसी ।
त्याच्या कृपा-बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत ॥ ६२ ॥

असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुज ।
ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ॥ ६३ ॥

सर्व गूढांतले गूढ पुन्हा उतम वाक्य हे ।
हितार्थ सांगतो ऐक फार आवडसी मज ॥ ६४ ॥

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज ।
प्रिय तूमिळसी माते प्रतिज्ञा जाण सत्य ही ॥ ६५ ॥

सगळे धर्म सोडुनि एका शरण ये मज ।
जाळीन सर्व मी पापे तुझी शोक करू न्को ॥ ६६ ॥

न कथी हे कधी त्यास तपो-हीन अभक्त जो ।
श्रवणेच्छा नसे ज्यास माझा मत्सर जो करी ॥ ६७ ॥

सांगेल गुज हे थोर माझ्या भक्त-गणांत जो ।
तो त्या परम भक्तीने मिळेल मज निश्चित ॥ ६८ ॥

कोणी अधिक त्याहूनि माझे प्रिय करी चि ना ।
जगी आवडता कोणी न होय मज त्याहुनी ॥ ६९ ॥

हा धर्म-रूप संवाद जो अभ्यासील आमुचा ।
मी मानी मज तो पूजी ज्ञान-यज्ञ करूनिया ॥ ७० ॥

हे ऐकेल हि जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडुनी ।
पावेल कर्म-पूतांची तो हि निर्वेध सद्-गति ॥ ७१ ॥

तू हे एकाग्र चित्ताने अर्जुना ऐकिलेस की ।
अज्ञान-रूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा ॥ ७२ ॥

अर्जुन म्हणाला

मोह मेला चि तो देवा कृपेने स्मृति लाभली ।
झालो निःशंक मी आता करीन म्हणसी तसे ॥ ७३ ॥

संजय म्हणाला

असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्भुत ।
थोरांचा ऐकिला तो मी नाच्वी रोम रोम जो ॥ ७४ ॥

व्यास-देवे कृपा केली थोर योग-रहस्य हे ।
मी योगेश्वर कृष्णाच्या मुखे प्रत्यक्ष ऐकिले ॥ ७५ ॥

हा कृष्णार्जुन-संवाद राया अद्भुत पावन ।
आठवूनि मनी फार हर्षतो हर्षतो चि मी ॥ ७६ ॥

स्मरूनि बहु ते रूप हरीचे अति अद्भुत ।
राया विस्मित होऊनि नाच्तो नाच्तो चि मी ॥ ७७ ॥

योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर ।
तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री जय वैभव ॥ ७८ ॥

गीताई संपूर्ण