गीताई – अध्याय ३

अर्जुन म्हणाला

बुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना ।
मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥

मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकिसी ।
ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥

श्री भगवान् म्हणाले

दुहेरी ह्या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे ।
ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करूनिया ॥ ३ ॥

न कर्मारंभ टाळूनि लाभे नैष्कर्म्य ते कधी ।
संन्यास्याच्या क्रियेने चि कोणी सिद्धि न मेळवी ॥ ४ ॥

कर्माविण कधी कोणी न राहे क्षण-मात्र हि ।
प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितात चि ॥ ५ ॥

इंद्रिये करिती कर्म मूढ त्यास चि रोधुनी ।
राहतो भोग चिंतूनि तो मिथ्याचार बोलिला ॥ ६ ॥

जो इंद्रिये मनाने ती नेमुनी त्यास राबवी ।
कर्म-योगात निःसंग तो विशेष चि मानिला ॥ ७ ॥

नेमिले तू करी कर्म करणे हे चि थोर की ।
तुझी शरीर-यात्रा ही कर्माविण घडॅ चि ना ॥ ८ ॥

यज्ञार्थ कर्म सोडूनि लोक हा बांधिला असे ।
यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त-संग तू ॥ ९ ॥

पूर्वी प्रजेसवे ब्रम्हा यज्ञ निर्मूनि बोलिला ।
पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा काम-धेनु चि ॥ १० ॥

रक्षा देवांस यज्ञाने तुम्हा रक्षोत देव ते ।
एकमेकास रक्षूनि पावा कल्याण सर्व हि ॥ ११ ॥

यज्ञ-तुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित ।
त्यांचे त्यांस न देता जो खाय तो ऐक चोर चि ॥ १२ ॥

यज्ञात उरले खाती संत ते दोष जाळिती ।
रांधिती आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती ॥ १३ ॥

अन्नापासूनि ही भूते पर्जन्यातूनि अन्न ते ।
यज्ञे पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळे घडे ॥ १४ ॥

प्रकृतीपासुनी कर्म ब्रम्ही प्रकृति राहिली ।
ऐसे व्यापक ते ब्रम्ह यज्ञात भरले सदा ॥ १५ ॥

प्रेरिले हे असे चक्र ह्या लोकी जो न चालवी ।
इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी ॥ १६ ॥

परी आत्म्यात जो खेळे आत्मा भोगूनि तृप्त जो ।
आत्म्यामध्ये चि संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले ॥ १७ ॥

केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा ।
कोणामधे कुठे त्याचा न काही लोभ गुंतला ॥ १८ ॥

म्हणूनि नित्य निःसंग करी कर्तव्य कर्म तू ।
निःसंग करिता कर्म कैवल्य-पद पावतो ॥ १९ ॥

कर्म-द्वारा चि सिद्धीस पावले जनकादिक ।
करी तू कर्म लक्षूनि लोक-संग्रह-धर्म हि ॥ २० ॥

जे जे आचरितो श्रेष्ठ ते ते चि दुसरे जन ।
तो मान्य करितो जे जे लोक चालवितात ते ॥ २१ ॥

करावे-मिळवावेसे नसे काही जरी मज ।
तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतो चि की ॥ २२ ॥

मी चि कर्मी न वागेन जरी आळस झाडुनी ।
सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग ॥ २३ ॥

सोडिन मी जरी कर्म नष्ट होतिल लोक हे ।
होईन संकर-द्वारा मी चि घातास कारण ॥ २४ ॥

गुंतूनि करिती अज्ञ ज्ञात्याचे मोकळेपणे ।
करावे कर्म तैसे चि इच्छुनी लोक-संग्रह ॥ २५ ॥

नेणत्या कर्म-निष्ठांचा बुद्धि-भेद करू नये ।
गोडी कर्मात लावावी समत्वे आचरूनि ती ॥ २६ ॥

कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणामुळे ।
अहंकार-बळे मूढ कर्ता मी हे चि घेतसे ॥ २७ ॥

गुण हे आणि ही कर्मे ह्यांहुनी बेगळा चि मी ।
जाणे तत्त्व-ज्ञ गुंते ना गुणात गुण वागता ॥ २८ ॥

गुंतले गुण-कर्मी जे भुलले प्रकृती-गुणे ।
त्या अल्प जाणणारांस सर्व-ज्ञे चाळवू नये ॥ २९ ॥

मज अध्यात्म-वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी ।
फलाशा ममता सर्व सोडुनी झुंज तू सुखे ॥ ३० ॥

माझे शासन हे नित्य जे निर्मत्सर पाळिती ।
श्रद्धेने नेणते ते हि तोडिती कर्म-बंधने ॥ ३१ ॥

परी मत्सर-बुध्हीने जे हे शासन मोडिती ।
ज्ञान-शून्य चि ते मूढ पावले नाश जाण तू ॥ ३२ ॥

ज्ञानी हि वागतो त्याच्या स्वभावास धरूनिया ।
स्वभाव-वश ही भूते बलात्कार निरर्थक ॥ ३३ ॥

इंद्रियी सेविता अर्थ राग-द्वेष उभे तिथे ।
वश होऊ नये त्यांस ते मार्गातील चोर चि ॥ ३४ ॥

उणा हि आपुला धर्म पर-धर्माहुनी बरा ।
स्व-धर्मात भला मृत्यु पर-धर्म भयंकर ॥ ३५ ॥

अर्जुन म्हणाला

मनुष्य करितो पाप कोणाच्य प्रेरणेमुळे ।
आपुली नसता इच्छा वेठीस धरिला जसा ॥ ३६ ॥

श्री भगवान् म्हणाले

काम हा आणि हा क्रोध घडिला जो रजोगुणे ।
मोठा खादाड पापिष्ठ तो वैरी जाण तू इथे ॥ ३७ ॥

धुराने झाकिला अग्नि धुळीने आरसा जसा ।
वारेने वेष्टिला गर्भ कामाने ज्ञान हे तसे ॥ ३८ ॥

काम-रूप-महा-अग्नि नव्हे तृप्त कधी चि जो ।
जाणत्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले ॥ ३९ ॥

घेऊनि आसर्‍यासाठी इंद्रिये मन बुद्धि तो ।
मोह पाडी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गुंडुनी ॥ ४० ॥

म्हणूनि पहिला थारा इंद्रिये ती चि जिंकुनी ।
टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्व हि ॥ ४१ ॥

इंद्रिये बोलिली थोर मन त्याहूनि थोर ते ।
बुद्धि थोर मनाहूनि थोर तीहूनि तो प्रभु ॥ ४२ ॥

असा तो प्रहु जाणूनि आवरी आप आपणा ।
संहारी काम हा वैरी तू गाठूनि परोपरी ॥ ४३ ॥

अध्याय तिसरा संपूर्ण