गीताई – अध्याय ४

श्री भगवान् म्हणाले

योग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो ।
मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥

अशा परंपरेतूनि हा राजर्षीस लाभला ।
पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥

तो चि हा बोलिलो आज तुज योग पुरातन ।
जीवीचे गूज हे थोर तू हि भक्त सखा तसा ॥ ३ ॥

अर्जुन म्हणाला

ह्या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन ।
तू बोलिलास आरंभी हे मी जाणू कसे बरे ॥ ४ ॥

श्री भगवान् म्हणाले

माझे अनेक ह्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे ।
जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी ॥ ५ ॥

असूनि हि अजन्मा मी निर्विकार जगत्-प्रभु ।
माझी प्रकृति वेढूनि मायेने जन्मतो जणू ॥ ६ ॥

गळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना ।
अधर्म उठतो भारी तेंव्हा मी जन्म घेतसे ॥ ७ ॥

राखावया जगी संता दुष्टा दूर करावया ।
स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी ॥ ८ ॥

जन्म-कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे ।
देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज ॥ ९ ॥

नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय ।
झाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले ॥ १० ॥

भजती मज जे जैसे भजे तैसा चि त्यास मी ।
माझ्या मार्गास हे येती लोक कोणीकडूनि हि ॥ ११ ॥

जे कर्म-सिद्धि वांछूनि यजिती येथ दैवते ।
मनुष्य-लोकी कर्माचे पावती फळ शीघ्र ते ॥ १२ ॥

निर्मिले वर्ण मी चारी गुण-कर्मे विभागुनी ।
करूनि सर्व हे जाण अकर्ता निर्विकार मी ॥ १३ ॥

कर्मे न बांधिती माते फळी इच्छा नसे मज ।
माझे स्वरूप हे जाणे तो कर्मात हि मोकळा ॥ १४ ॥

केली कर्मे मुमुक्षूंनी पूर्वी हे तत्त्व जाणुनी ।
तैसी तू हि करी कर्मे त्यांचा घेऊनि तो धडा ॥ १५ ॥

नेणती जाणते ते हि काय कर्म अकर्म हे ।
तुज ते सांगतो कर्म जाणूनि सुटशील जे ॥ १६ ॥

सामान्य कर्म जाणावे विकर्म हि विशेष जे ।
अकर्म ते हि जाणावे कर्माचे तत्त्व खोल हे ॥ १७ ॥

कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे ।
तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृत-कृत्य तो ॥ १८ ॥

उद्योग करितो सारे काम-संकल्प सोडुनी ।
ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित ॥ १९ ॥

नित्य-तृप्त निराधार न राखे फल-वासना ।
गेला गढूनि कर्मात तरी काही करी चि ना ॥ २० ॥

संयमी सोडुनी सर्व इच्छेसह परिग्रह ।
शरीरे चि करी कर्म दोष त्यास न लागतो ॥ २१ ॥

मिळे ते चि करी गोड न जाणे द्वंद्व मत्सर ।
फळो जळो जया एक करूनि हि न बांधिला ॥ २२ ॥

ज्ञनात बैसली वृत्ति संग सोडूनि मोकळा ।
यज्ञार्थ करितो कर्म जाय सर्व जिरूनि ते ॥ २३ ॥

ब्रम्हात होमिले ब्रम्ह ब्रम्हाने ब्रम्ह लक्षुनी ।
ब्रम्ही मिसळले कर्म तेंव्हा ब्रम्ह चि पावला ॥ २४ ॥

देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्टिती ।
ब्रम्हाग्नित तसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाळिती ॥ २५ ॥

श्रोत्रादी इंद्रिये कोणी संयमाग्नीत अर्पिती ।
कोणी विषय शब्दादि इंद्रियाग्नीत अर्पिती ॥ २६ ॥

प्राणेंद्रिय-क्रिया कोणी सर्व होमूनि टाकिती ।
चिंतनाने समाधीस अंतरी चेतवूनिया ॥ २७ ॥

द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वा अशापरी ।
संयमी यजिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी ॥ २८ ॥

होमिती एकमेकात कोणी प्राण-अपान ते ।
रोधूनि गति दोहोंची प्राणायामास साधिती ॥ २९ ॥

प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी ।
यज्ञ-वेत्ते चि हे सारॆ यज्ञाने दोष जाळिती ॥ ३० ॥

यज्ञ-शेषमृते धाले पावले ब्रम्ह शाश्वत ।
न यज्ञाविण हा लोक कोठूनि पर-लोक तो ॥ ३१ ॥

विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे ।
कर्माने घडिले जाण जाणूनि सुटशील तू ॥ ३२ ॥

द्रव्य-यज्ञादिकांहूनि ज्ञान-यज्ञ चि थोर तो ।
पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता ॥ ३३ ॥

सेवा करूनि ते जाण नम्र-भावे पुसूनिया ।
ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुज ॥ ३४ ॥

ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू ।
आत्म्यात आणि माझ्यात भूते निःशेष देखुनी ॥ ३५ ॥

जरी पाप्यांमधे पापी असशील शिरो-मणि ।
तरी ह्या ज्ञान-नौकेने पाप ते तरशील तू ॥ ३६ ॥

संपूर्ण पेटला अग्नि काष्ठे जाळूनि टाकितो ।
तसा ज्ञानाग्नि तो सर्व कर्मे जाळूनि टाकितो ॥ ३७ ॥

ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी ।
योग-युक्त यथा-काळी ते पावे अंतरी स्वये ॥ ३८ ॥

श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध ।
ज्ञानाने शीघ्र तो पावे शांति शेवटची मग ॥ ३९ ॥

नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा ।
न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी ॥ ४० ॥

योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले ।
जो सावधान आत्म्यात कर्मे त्यास न बांधिती ॥ ४१ ॥

म्हणूनि अंतरातील अज्ञान-कृत संशय ।
तोडुनी ज्ञान-खडगाने ऊठ तू योग साधुनी ॥ ४२ ॥

अध्याय चवथा संपूर्ण