तेरेडोकी गावात गोरा कुंभार हा एक विठ्ठलभक्त होता.कुंभारकाम करत असताना देखील तो पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन असे. पांडुरंगाच्या नामस्मरणात तो नेहमी मग्न असे.
एकदा त्याची पत्नी आपल्या एकुलत्या एका लहान मुलास अंगणात ठेवून पाणी आणण्यासाठी गेली.त्या वेळी गोरा कुंभार मडकी करण्यास लागणारी माती तुडवीत पांडुरंगाचे भजन करीत होता. त्यात तो अगदी तल्लीन झाला होता. जवळच रांगत, खेळत असलेलं ते मूल तिकडे येऊन आळ्यात पडले. त्या मातीत आले. गोरा कुंभार पायांनी माती खाली-वर करीत होता. मातीबरोबर त्याने आपल्या मुलालाही तुडविले. पांडुरंगाच्या भजनात तो निमग्न असल्यामुळे तुडविताना रडलेले मूलही त्याला समजले नाही.
पाणी आणल्यावर त्याची पत्नी मुलास शोधू लागली.ते मूल तिला तिथे दिसले नाही, म्हणून ती गोरा कुंभाराकडे गेली. इतक्यात तिची नजर चिखलाकडे गेली, तो चिखल रक्ताने लाल झालेला पाहून मूल तुडविले गेल्याचे तिच्या लक्षात आले. तिने हंबरडा फोडला, आक्रोश केला. या नकळत झालेल्या कृत्याचे प्रायच्छित म्हणून गोरा कुंभाराने आपले दोन्ही हात तोडून घेतले. त्यामुळे त्याचा कुंभारकीचा धंदा बसला. विठ्ठल-रखुमाई मजूर बनून त्याच्या घरी येऊन राहू लागले.त्याचा तो कुंभाराचा धंदा पुन्हा बहरला.
पुढे काही दिवसांनी आषाढी एकादशी आली. श्री ज्ञानेश्वर व श्री नामदेव ही संतमंडळी पंढरपुरास निघाली. वाटेत तेरेडोकी येथे येऊन श्री ज्ञानेश्वरांनी गोराकुंभार व त्याच्या पत्नीला पंढरपुरास आपल्या बरोबरआणले.
गरुड पारावर नामदेवांचे कीर्तन उभे राहिले. ज्ञानेश्वर आदि करून सर्व संतमंडळी कीर्तन ऐकण्यास बसली. गोरा कुंभारसुद्धा आपल्या पत्नीसह कीर्तनास बसला. कीर्तनात लोक वर हात करून टाळ्या वाजवू लागले. विठ्ठलाचा गजर करू लागले; त्या वेळी गोरा कुंभाराने देखील आपले थोटे हात अभावितपणे उचलले. तेव्हा त्या थोट्या हातांना हात फुटले. ते पाहून संतमंडळींना आनंद झाला. पांडुरंगाचा सर्वांनी जयजयकार केला.
गोरा कुंभाराच्या पत्नीने श्री विठ्ठलाची करुणा भाकली. ”पंढरीनाथा, माझे मूल पतीच्या पायाखाली तुडविले गेले; मी मुलावाचून दुःखी कष्टी झाले आहे. विठ्ठला, माझ्यावर दया कर. मला माझे मूल दे.” पंढरीनाथाने तिची विनवणी ऐकली. तीचे चिखलात तुडवून मेलेले मूल रांगत रांगत सभेतून तिच्या जवळ येत असल्याचं तिन पाहिलं. त्या मुलाला तिने जाऊन उचलून कडेवर घेतले. संतमंडळींसह सर्वांनी आनंदाने टाळ्यांचा गजर चालविला.
संत नामदेव
गोंदवलेकर महाराज
श्रीपाद श्रीवल्लभ
सम्राट विक्रमादित्य यांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न म्हणजे महाकवी कालीदास
कृष्णभक्त संत मीराबाई ! (इ.स. १४९९-१५४६)
संत तुकाराम : भागवतधर्म मंदिराचा कळस !