सम्राट विक्रमादित्य यांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न म्हणजे महाकवी कालीदास

प्रारंभीस कालीदास अडाणी, अशिक्षित आणि मूर्ख असणे
अन् त्याच्या जीवनाचा कायापालट काशीच्या राजकन्येमुळे होणे

‘उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य याच्या दरबारातल्या नवरत्नातील एक रत्न म्हणजे कालीदास. कालीदास ब्राह्मण कुटुंबात जन्मला. तो शिवाचा उपासक होता. प्रारंभीस कालीदास अडाणी, अशिक्षित आणि मूर्ख होता. त्यामुळे कुणीही त्याची मस्करी करायचे; परंतु त्याच्या जीवनाचा कायापालट काशीच्या राजकन्येमुळे झाला. ती विलक्षण बुद्धीमान आणि प्रतिभावान अशी पंडिता होती. वाङ्मय, कला आदी विद्यांत ती अग्रणी होती. तिच्याशी विवाह करायला आलेल्या अनेक तरुणांना तिने बुद्धीच्यातेजाने पराभूत केले. त्या सगळ्या असंतुष्टांनी त्या राजकन्येचा सूड घ्यायचे ठरवले. त्यांनी एका महामूर्ख तरुणाला हाती धरले. त्याला विपुल, उत्तम अन्न आणि सुंदर वस्त्रे देण्याचे प्रलोभन दाखवले. राजकुमारीसमोर त्याला केवळ उभे रहायचे होते. राजकुमारी जे प्रश्न विचारील, त्याचे उत्तर न देता त्याने मौन रहायचे, अवाक रहायचे. त्या महामुर्खाला सुंदर वेशभूषा करून नटवण्यात आले. अलंकार घातले आणि अत्यंत बुद्धीमान, प्रतिभावान असा दार्शनिक म्हणून त्याला राजकुमारीसमोर उभे केले.

लग्न झाल्यावर राजकुमारीला तो महामुर्ख असल्याचे
लक्षात येणेआणि तिने त्याला राजवाड्याबाहेर काढून
‘जोवर तू पंडित होत नाहीस,तोवर इकडे फिरकू नकोस’, असे सांगणे

जेव्हा राजकुमारीने कूट प्रश्न विचारले, त्या वेळी तो मान हलवायचा आणि चमत्कारिक नजरेने राजकन्येकडे पहायचा. त्या चतुर लोकांनी ‘अत्यंत प्रतिभासंपन्न आणि शहाणपणाचा कळस’, अशी त्याची उत्तरे त्या मौनातून अभिव्यक्त होत असल्याचे सांगितले. त्याच्या दृष्टीक्षेपाचे निर्वचन असे केले की, त्या राजकुमारीचे समाधान झाले. राजकुमारीचे त्याच्याशी लग्न झाले आणि काही दिवसांतच तिच्या लक्षात आले की, तो महामूर्ख आहे. तिने त्या महामुर्खाची भयंकर निंदा केली आणि त्याला राजवाड्याबाहेर काढले. त्याला सांगितले की, जोवर तू पंडित होत नाहीस, तोवर इकडे फिरकू नकोस.

एका रात्री अकस्मात त्या मूर्तीतून महाकाली प्रगटलेली
दिसणे, दिव्य देवी त्याच्याजवळ येणे, तिने त्याच्या जिभेवर
मातृका लिहिणे आणि आशीर्वाद देऊन कालीदास नाव ठेवणे

तो तरुण प्रामाणिक, निष्कपट आणि साधाभोळा होता. ‘त्या दुष्टांनी आपला उपयोग राजकुमारीला फसवण्याकरता केला’, हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपला प्रमाद ओळखला. तो तडक देवीच्या देवळात गेला. रात्री देवळातच राहिला. काय घडले, कसे घडले, ते त्याला काहीच कळेना. पुजार्‍याने त्याला देवीची आराधना करायला सांगितले. नंतर त्याने त्या देवळात राहून महाकालीची उपासना केली. जसे पुजार्‍याने सांगितले, तसेच कडक व्रत केले. एका रात्री त्याला अकस्मात त्या मूर्तीतून महाकाली प्रगटलेली दिसली. ती दिव्य देवी त्याच्याजवळ आली. तिने त्याच्या जिभेवर मातृका लिहिल्या आणि त्याला आशीर्वाद दिला, `तू महापंडित, महाकवी होशील.’ त्याचे नाव कालीदास ठेवले.

कालीदासाने चार महाकाव्यांनी राजकुमारीच्या प्रश्नाचे उत्तर देणे

नंतर तो कालीदास राजवाड्यात आला. राजकुमारीने विचारले, `अस्ति कश्चित् वग्विशेषः। …तू परत का आलास ? काही पांडित्य संपादिले का ?’ कालीदासाने चार महाकाव्यांनी तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले. प्रत्येक महाकाव्याचा प्रारंभ राजकुमारीने विचारलेल्या प्रश्नाच्या एकेका शब्दापासून होता आणि त्याने ती चार शब्दांनी प्रारंभ होणारी चार महाकाव्ये धडाधड म्हणून दाखवली.

कुमारसंभव महाकाव्याची प्रारंभीची ओळ अशी,…

`अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा
हिमालयो नाम नगाधिराजः।
पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य
स्थित: पृथिव्या इव मानदण्ड: ।।’

अर्थ : उत्तर दिशेला देवतांचा निवास असलेला ‘हिमालय’ नावाचा पर्वतांचा स्वामी पूर्व आणि पश्चिम दिशेला असलेल्या समुद्रमध्ये पृथ्वीचा मानदंड म्हणून उभा आहे.

मेघदूत या महाकाव्याचा प्रारंभ असा,

कश्चित् कांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः ।
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु ।
स्निग्धच्छायातरूषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ।।

अर्थ : स्वकर्तव्यापासून ढळलेला, प्रेयसीच्या विरहाने व्याकुळ झालेला, कुबेराच्या शापामुळे महती अल्प झालेला एक यक्ष सीतेच्या डुंबण्याने जेथील नदी पवित्र झाली आहे आणि जिथे घनदाट सावली आहे, अशा रामगिरीनामक पर्वतावर राहू लागला.

रघुवंशाचा प्रारंभ असा,…

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।
जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ।।

अर्थ : शब्द आणि अर्थ यांप्रमाणे एकरूप असलेल्या जगत्पालक शिवपार्वतींना शब्द अन् अर्थ यांचे आकलन होण्यासाठी मी वंदन करतो.

ऋतुसंहार महाकाव्याच्या प्रारंभी ग्रीष्माचे वर्णन याप्रमाणे आहे.

`विशेषसूर्यः स्पृहणीयचंद्रमाः ।’

अर्थ : उग्र असा सूर्य आणि मनोरम्य चंद्र असणारा ग्रीष्म ऋतू (आला आहे)’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००५)