संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे एकदा एकत्र तीर्थयात्रेला निघाले. वाराणसी, गया, प्रयाग अशी गावे फिरत फिरत ते आवंढ्या नागनाथ या ठिकाणी आले. ते शंकराचे स्थान होते. इतर ठिकाणांप्रमाणेच याही ठिकाणी कीर्तन करून आपली सेवा ईश्वरचरणी अर्पण करायची, असे त्यांनी ठरवले.
महादेवाला वंदन करून नामदेवांनी कीर्तनास प्रारंभ केला. कीर्तनाला पुष्कळ लोक आले होते. ते कीर्तन ऐकण्यात तल्लीन झाले. इतक्यात लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. लोकांच्या नजरा मागे वळल्या. कीर्तन थांबले. दारातून काही विरोधकआत आले. ते विरोधक रागावून नामदेवांना म्हणाले, ''हा कैलासपती उमारमण आहे. यांना हरिकीर्तन प्रिय नाही. तुम्ही पंढरपुरात जा आणि तेथे भले नाचा.''
विरोधकांचे हे बोलणे ऐकून श्रोते म्हणाले की, विठ्ठल काय आणि शंकर काय, या दोघांत भेद नाही. शंकरासमोर कीर्तन करू नये, असे कुठे सांगितले आहे ? हे ऐकून विरोधक अधिकच चिडले. ते म्हणाले, ''तुम्ही अभिमानाचा ताठा धरून आम्हाला ज्ञान शिकवता काय ? तुम्ही इथून चालते व्हा, नाहीतर व्यर्थ मार खाल.'' सारे शांतपणे तसेच उभे राहिले. तेथून कोणीच हलावयास सिद्ध होईना. ते पाहून विरोधकांनी ठरवले की, या नामदेवालाच इथून हालवले पाहिजे. ते विरोधक नामदेवांना म्हणाले, ''तुझ्या कीर्तनामुळे देवळात येण्याची वाट बंद झाली. तू देवळाच्या मागे जा आणि भले कीर्तन कर.''
हे ऐकून नामदेवांनी विरोधकांना साष्टांग नमस्कार केला आणि ते देवळाच्या मागच्या बाजूस आले आणि तेथे कीर्तन करू लागले. भगवंताच्या कीर्तनात खंड पडल्याने सदगदित अंत:करणाने त्यांनी पांडुरंगाचा धावा चालू केला.
त्यांच्या विठ्ठलनामातली तळमळ इतकी वाढली की, त्यांची आर्ततेची हाक भगवंताला ऐकू गेली. पूर्व दिशेला तोंड असलेले शंकराचे देऊळ नामदेवाच्या समोर येऊन उभे ठाकले. हा चमत्कार पाहून जमलेले सारे श्रोते अचंबित झाले. 'कैलासपती नामदेवांस पावन झाले', असे सारे म्हणू लागले.
तितक्यात शंकराची पूजा आटोपून विरोधक देवळाबाहेर आले, तो पुन्हा नामदेवांचे कीर्तन समोर चालूच ! काहीतरी गडबड आहे, हे त्यांच्या लक्षात आले. भगवंताने साक्षात् देऊळ फिरवले, हे कळल्यावर विरोधक लज्जित झाले. परमेश्वराचा प्रिय भक्त कोण, हे परमेश्वराने स्वत:च दाखवून दिले. खेद झालेले विरोधक कीर्तनास बसले. फिरलेले देऊळ मात्र आजतागायत तसेच आहे.
बालमित्रांनो, ईश्वराची भक्ती केल्यास, त्याला तळमळीने हाक मारल्यास तो आपल्या हाकेला धाऊन येतो. ईश्वराला आपला भक्त कोण, हे ठाऊक असते. तो नेहमीच भक्ताला साहाय्य करतो.
गोंदवलेकर महाराज
श्रीपाद श्रीवल्लभ
सम्राट विक्रमादित्य यांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न म्हणजे महाकवी कालीदास
कृष्णभक्त संत मीराबाई ! (इ.स. १४९९-१५४६)
संत तुकाराम : भागवतधर्म मंदिराचा कळस !
भागवतधर्म मंदिराचा पाया : संत ज्ञानेश्वरमाऊली !