कथा गौरीची

आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण रहात होता. एके दिवशी काय झाले ? भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनीं गौरी आणल्या, रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिले. मुले घरी आली. आईला सांगितले, आई, आई, आपल्या घरी गौर आण ! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करूं ? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर काही नाही. तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातले सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौर आणीन ! मुले तिथून उठली, बाबांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा, घावनघाटल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील !

बाबांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढं उपाय नाही. मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने ह्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचं समाधान केले. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले.

बायको घरात गेली आणि आंबिलीकरिता कण्या पाहू लागली. तो मडके आपले कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले. तिला मोठे नवले वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेज केली, सगळ्यांनीं पोटभर खाल्ली. सगळे जण आनंदाने निजली. सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली. घावनघाटले देवाला कर, नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला, बायकोला हाक मारली, अगं अगं ऐकलेस का ? आजीबाईला न्हाऊ घाल, असे सांगितले. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळे सामान आणले. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलबाळसुद्धा पोटभर जेवली.

म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी, आजी, दूध कोठून आणू ? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता ऊठ आणि तुला जितक्या गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुटे पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशीची नाव घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याच दूध काढ ! ब्राह्मणाने तसे केले, गाई-म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांसहित धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई-म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले.

दुसऱ्याच दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता पोचती कर ! ब्राह्मण म्हणू लागला आजी, तुमच्या कृपेने मला आता सगळे प्राप्त झाले. आता तुम्हाला पोचत्या कशा करू ? तुम्ही गेला म्हणजे हे सगळे नाहीसे होईल ! म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच ! मला आज पोचती कर ! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग !

गौरीने सांगितले, तुला येतांना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक. हाड्यावर टाक, मडक्यावर टाक, गोठ्यात टाक असे केलेस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणाने बरे म्हटले. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भादव्याच्या महिन्यांत तळ्याच्या पाळी जावे. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावे. संध्याकाळीं हळदकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतत मिळेल. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईंच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.