गुरुकुलरूपी धर्मशिक्षणपद्धती !

कधी एकदा परीक्षा होऊन हा अभ्यास संपेल, असे झाले आहे. मुलांना अभ्यास करून अगदी कंटाळा आला आहे. पाठ्यपुस्तकातील सारखे तेच तेच परिच्छेद वाचून मुले अतिशय कंटाळून गेली आहेत. परीक्षा संपल्या की, कुठेतरी मस्तपैकी जाऊन मजा करून यायला हवे….. असे संवाद परीक्षेच्या काळात घरोघरी पालकांच्या आणि मुलांच्या तोंडून ऐकायला मिळतात आणि हेच तर आजकालच्या अभ्यासक्रमाचे, विज्ञानाचे मोठे अपयश आहे. अभ्यास करून मुले आनंदीत झाली आहेत, असे दृश्य क्वचितच पहायला मिळते.

याउलट अध्यात्माचे आहे. जरा पूर्वीच्या गुरुकुलाचे दृश्य आठवून पहा.. !, लगेचच आपल्या तोंडवळ्यावर आनंद पसरतो; कारण पूर्वी गुरुकुलात हिंदुधर्मविषयक आचार आणि विचार पद्धतींना, हिंदुधर्मातील शास्त्रशुद्ध प्रमाणांना अत्यंतिक महत्त्व देऊन देवतांच्या, ऋषींच्या कृपेने अध्ययन आणि अध्यापन केले जात असल्याने ते वातावरणच चैतन्याने आनंदीत झालेले असायचे. आता हे सर्व काळाच्या ओघात नष्ट झाले आहे.

अध्यात्मविषयक ग्रंथ, संतांची चरित्रे, देवतांच्या पौराणिक कथा, संतांनी एखाद्या विषयावर केलेले मार्गदर्शन हे कितीही वाचले, प्रतिदिन तेच तेच वाचले, तरी त्यातील प्रतिदिन मिळणार्‍या आनंदात उलट वाढच होत जाते. या वाचनाचा कधीच कंटाळा येत नाही; कारण अशा प्रकारच्या ग्रंथवाचनातून चैतन्य मिळते आणि यातून बुद्धीची शुद्धी होत गेल्याने आनंद मिळत असतो. म्हणून संतांची चरित्रे ही प्रतिदिन वाचली, तरी प्रतिदिन आपल्याला त्यांतील नवीनच अर्थ उमगल्यासारखे वाटते. असे का होते, तर प्रतिदिनाच्या वाचनाने आपल्या देहाची अनुक्रमे स्थूलदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह अशी आतील शुद्धी होत गेल्याने त्या त्या देहाच्या स्तरावर मनाला आणि बुद्धीला भावणारा संत-चरित्रामधील भावार्थ निराळा असतो; म्हणून प्रतिदिन निराळा आनंद मिळतो.

विज्ञान हे चैतन्यरहित असल्याने ते विद्यार्थ्यांना पाट्याटाकूपणा शिकवते. हे पाट्याटाकूपण कंटाळा आणणारे असते, म्हणून अशा अभ्यासाचा विद्यार्थ्यांना ताण येतो, तर अध्यात्म मात्र नित्यनूतन आणि चैतन्यमय असल्याने ते भक्तांना, भाविकांना दररोज निराळ्या पद्धतीचा आनंद देते, जसे वाचनात आपण खोल खोल जाऊ तसा आनंद द्विगुणीत होत असल्याचे समाधान आपल्याला लाभते, म्हणूनच संत-चरित्र वाचतांना त्याचा खूप कंटाळा आला आहे, हे कधी एकदा वाचून संपते आहे, असे झाले आहे, अशी वाक्ये कोणाच्याच तोंडून बाहेर पडतांना दिसत नाहीत, याचे कारण म्हणजे संत-चरित्रातील चैतन्य आणि त्यातील संतांचे अनुभूतींचे प्रत्यक्ष बोल !

मग, चला तर परत एकवार आनंददायी गुरुकुलरूपी धर्मशिक्षणपद्धती भारतात आणण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि पुढील पिढ्यांना तरी चैतन्याचा आणि यातून मिळणार्‍या देवकृपेचा आनंद देण्यासाठी सज्ज होऊया !

– सौ. अंजली गाडगीळ,रामनाथी, गोवा. (चैत्र पौर्णिमा, कलियुग वर्ष ५११३)

Leave a Comment