उज्जैन सिंहस्थपर्वात अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावरील दुसर्‍या वैश्‍विक अमृत स्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी !

  • साधू-संतांच्या चरणस्पर्शाने क्षिप्रा नदी चैतन्यमय झाली !
  • साधू-संतांच्या आधीच स्नान करून भाविकांकडून अधर्माचरण !

kumbh_shahi_snan1

kumbh_shahi_snan5

उज्जैन (मध्यप्रदेश) : भगवान श्री महाकालेश्‍वराची मोक्षदायिनी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैन येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सिंहस्थपर्वातील दुसर्‍या अमृत (शाही) स्नानाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली. अक्षय्य तृतीयेच्या या अमृत स्नानाच्या औचित्यावर संतांच्या चरणस्पर्शाने क्षिप्रा नदीही श्रद्धाळू आणि भाविक यांप्रमाणे पवित्र होऊन चैतन्यमय झाली.

kumbh_shahi_snan6

kumbh_shahi_snan10

मागील स्नानाप्रमाणे दुसर्‍या अमृत स्नानासाठी भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी करून क्षिप्रातटी संतांच्या आधी स्नान करून प्रथा मोडली, तर लोकांच्या प्रचंड गर्दीपुढे हतबल झालेले पोलीस आणि प्रशासन यांनी संत अन् आखाडे यांचे दुपारी २ वाजेपर्यंत स्नान होण्याआधीच लोकांना स्नानासाठी रामघाटावर सोडले. (संतस्नानानंतर त्या पाण्यात अधिक सात्त्विकता येते. त्यामुळे त्यांच्या स्नानानंतर स्नान केल्यास अधिक लाभ होतो, हे हिंदूंना कोणी न शिकवल्याचे हे फळ आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

kumbh_shahi_snan11

शंकराचार्य, १० शैव आखाडे, ३ वैष्णव आखाड्यांसह त्यांच्या अंतर्गत येणारे अनेक खालसे, संत, महंत, महामंडलेश्‍वर, नागा साधू यांनी मंगलमय वातावरणात अमृत स्नान केले.

Shahi_snan_resize

१. पहाटे ४ वाजता आखाड्यांच्या स्नानाला प्रारंभ झाला. स्नानापूर्वी प्रत्येक आखाड्याने स्वतःची वाजत-गाजत मिरवणूक काढली. त्यानंतर श्री पंच दशनाम जुना आखाडा, श्री पंचायती आवाहन आखाडा आणि श्री पंच अग्नी आखाडा, श्री तपोनिधी निरंजनी आखाडा, श्री पंचायती आनंद आखाडा, श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा आणि श्री पंच अटल आखाडा, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री पंचायती नया उदासीन आखाडा, श्री पंचायती निर्मल आखाडा, तसेच वैष्णव आखाड्यांमध्ये श्री निर्वाणी अनी आखाडा, श्री दिगंबर अनी आखाडा आणि श्री निर्मोही अनी आखाडा यांनी स्नान केले. या वेळी प्रत्येक आखाड्याने स्नानापूर्वी आपली उपास्य देवता आणि शस्त्र यांचे वेदमंत्राद्वारे पूजन केले. या वेळी शासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक मनोहर शर्मा, तसेच प्रभारी मंत्री भूप्रेंद सिंह यांनी आखाड्यांचे स्वागत केले.

kumbh_shahi_snan13

२. या वेळी सर्व आखाड्यांतील साधूंनी तलवार, भाले, त्रिशूळ, दांडपट्टे, गदा, परशु आदी विविध शस्त्रे उंचावत स्नान केले. स्नान झाल्यावर पुन्हा सर्वांगाला भस्म लावत प्रस्थान केले. यात विशेषत: परमहंस स्वामी नित्यानंद महाराज यांची शोभायात्रा विदेशी भक्त, सोन्याने मढवलेल्या रुद्राक्षांच्या माळा, धूतवस्त्र यांमुळे उठून दिसत होती. या वेळी विविध देशांतील नागरिक सहभागी झाले होते.

kumbh_shahi_snan14

३. सकाळी श्री निरंजनी पंचायती आखाड्याच्या स्नानाच्या वेळी एका पोलीस अधिकार्‍याने लवकर स्नान उरकण्यास सांगितल्यावर आखाड्यातील साधू असंतूष्ट झाले. त्यांनी निषेध म्हणून तेथे ठिय्या घातला. परिणामी पोलीस अधीक्षक आणि प्रभारी मंत्री भूप्रेंद सिंह यांनी क्षमायाचना करत संबंधित अधिकार्‍याला निलंबित करण्याचे आश्‍वासन दिल्यावर आखाडा स्नान झाल्यावर पुढे गेला.
kumbh_shahi_snan2

४. स्नान करण्यासाठी आलेल्यांमध्ये पुरी पीठाधीश्‍वर शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती महाराज, द्वारका आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज, काशी-सुमेरू पीठाधीश्‍वर श्री नरेंद्रानंदगिरी सरस्वती महाराज, जुना आखाड्याचे पिठाधिश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरी महाराज, तसेच परमहंस नित्यानंद स्वामी यांचा समावेश होता.

kumbh_shahi_snan9

क्षणचित्रे

१. कुंभमेळ्यात विशेष वाहन पास असल्याविना कोणत्याही वाहनाला प्रवेश नसतांना पोलीस अधिकारी साधी वाहने वापरून सर्रास प्रवास करत होते; जेथे अन्य महत्त्वाच्या लोकांना पास असलेली वाहने घेऊन जाणे प्रतिबंधित होते.

२. क्षिप्रा नदीच्या किनारी चपलांना लागलेली माती आणि पाणी यांमुळे बराच चिखल झाला होता; मात्र तो घाट स्वच्छ करतांना तो संपूर्ण चिखल पुन्हा नदीच्या पात्रात सोडून दिला जात होता आणि आलेले सर्व पूजनीय संत त्या पाण्यात अमृत स्नान करत होते. याविषयी उपस्थित असलेले विश्‍वमंगल धर्म चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी मस्तबाबा म्हणाले, हा संतांचा अपमान आहे. संतांना अशा घाण पाण्यात आंघोळ करण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. (सिंहस्थ प्रशासनाने उत्तरदायींवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. शेष पास असूनही पोलीस पत्रकारांना वार्तांकन आणि छायाचित्रे यांसाठी सोडत नव्हते. या वेळी छायाचित्रकार आणि पोलीस यांच्यात वाद झाला. त्यावर पत्रकारांनी पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. शेवटी छायाचित्र काढण्यासाठी मुक्त प्रवेश दिल्यावर छायाचित्रकार शांत झाले.

४. क्षिप्रा नदीच्या तटावर साधूंची छायाचित्रे काढण्यासाठी देशी-विदेशी छायाचित्रकारांनी मोठी गर्दी केली होती. हे पाहून प्रत्येक आखाड्यातील नागा आणि अन्य साधू विशिष्ट पोज देऊन छायाचित्रे काढत होते. उदा. शस्त्र उंचावून दाखवणे, नग्न उभे राहणे, भस्म लेपन करून उभे रहाणे, हर हर महादेव चा जयघोष करणे, गांजा ओढणे, सिगारेट ओढणे, चित्रविचित्र अंगविक्षेप करणे

५. पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी संतांचे स्नान पूर्ण होण्यापूर्वी मधल्या वेळेत स्वतः, तसेच स्वतःच्या नातेवाइकांना स्नानासाठी नेत होते. (अशा अधर्मामुळे त्यांना कधीतरी स्नानाचा लाभ मिळेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

६. एका मोठ्या आखाड्याचे प्रमुख स्नानासाठी आल्यावर तेथे पत्रकार नव्हते; म्हणून ती जागा पालटून जेथे पत्रकार आणि छायाचित्रकार आहेत, त्या ठिकाणी येऊन स्नान करू लागले. जेणेकरून त्यांचे छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हावे.

७. साधू-संतांनी स्वतःच्या गळ्यातील पुष्पहार पत्रकारांकडे प्रसाद म्हणून फेकल्यावर पत्रकार ते टाकून देत होते, तर दुसरीकडे सामान्य लोक ते आशीर्वाद म्हणून गळ्यात घालत होते. (स्वतःला सर्वज्ञानी समजणारे अहंकारी पत्रकार ! ज्यांच्यात भाव नाही, त्यांना असा प्रसाद दिल्यावर त्याचे मोल काय रहाणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

८. या वेळी विदेशातून आलेल्या अश्‍वेतवर्णीय (निग्रो) भाविकांनी स्नान केले.

kumbh_shahi_snan15

kumbh_shahi_snan4

सिंहस्थामध्ये सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यासारख्या खर्‍या संतांची आवश्यकता आहे ! – मस्तबाबा

सिक्कीम येथील विश्‍वमंगल धर्म चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मस्तबाबा म्हणाले, मी कुंभमेळ्यात आल्यावर येथे कोणी देवाच्या चित्रापेक्षा स्वतःची छायाचित्रे फलकावर आणि कटआऊटवर लावतात. प्रत्येक जण आपल्या वैभवाचे आणि ऐश्‍वर्याचे प्रदर्शन करत आहे. सर्व ढोंग-पाखंडीपणाचा दिखावा आहे. ज्ञानाचा, वेदांचा प्रसार करण्यापेक्षा स्वतःच मोठे मंडप उभारणे, विद्युत रोखणाई करणे, मोठ्या कमानी उभारणे आदी केले जात आहे. असे करत राहिल्यास धर्म बुडण्यास वेळ लागणार नाही. आपल्याकडे विदेशी लोक येऊन धर्माचा अभ्यास करतात आणि आपण धर्माच्या नावावर चंगळवाद निर्माण करत आहोत. यामुळे येणार्‍या पिढीवर वाईट परिणाम होईल. धर्म हा कृतीत आणण्याची गोष्ट असतांना धर्माचा देखावा उभा केला गेला आहे. खरे संत क्षिप्रा नदीला पवित्र करण्यासाठी येथे येतात; मात्र सध्या येथे क्षिप्रा नदीमध्ये लोक आपली पापे धुण्यासाठी येतात. आज सिंहस्थामध्ये सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यासारख्या खर्‍या संतांची आवश्यकता आहे. त्यांच्या चरणस्पर्शानेच क्षिप्रा नदी पवित्र होईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment








Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​