हिंदु राष्ट्राच्या ध्येयासाठी संघटित व्हा – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

नवी सांगवी (पुणे) – आज हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर चहूबाजूंनी आक्रमणे होत आहेत. या काळात जाती-पातीचे भेद विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत, हे यश सहज मिळालेले नाही.

अनेक स्वयंसेवकांचे बलीदान, संघर्ष आणि समर्पण यांमुळेच आज हिंदुत्व टिकून आहे. आता आपल्याला हेच हिंदुत्व अधिक बळकट करून ‘हिंदु राष्ट्रा’च्या ध्येयापर्यंत पोचायचे आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. नवी सांगवी येथील वैदुवाडी भागात आयोजित करण्यात आलेल्या ‘विराट हिंदु संमेलना’त त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या वेळी व्यासपिठावर भाजपचे स्थानिक आमदार श्री. शंकरशेठ जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. माधव खोत, हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले उपस्थित होते. आमदार शंकरशेठ जगताप म्हणाले की, अशा विराट हिंदु संमेलनांमुळे समाजामध्ये खर्या अर्थाने जागृती निर्माण होते. हिंदुत्वाचा विचार घराघरांत पोचवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम ठिकठिकाणी होणे आवश्यक आहे. या कार्याला आमचे सदैव सहकार्य राहील. या संमेलनाला ५०० हून अधिक धर्माभिमानी नागरिक उपस्थित होते.







