श्री गजानन विजय – अध्याय १०

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे अरुपा अव्यया । पूर्णब्रह्मा पंढरीराया ।
सज्जनाच्या विसाविया । मजला परते लोटूं नको ॥१॥

देवा हा दासगणू । नको परक्याचा आतां म्हणूं ।
माझ्या पातकाचा नको आणूं । विचार चित्तीं नारायणा ॥२॥

माझ्या करें न झालें पुण्य । हें ठाउकें मजलागून ।
फाय काय तुला वदन । दावण्या मी योग्य नसे ॥३॥

ऐसी स्थिति आहे जरी । परि देवा कृपा करी ।
ओहळास गोदावरी । पोटीं आपल्या घेतसे ॥४॥

तैसें तुवां करावें । दुःख अवघें निवारावें ।
पातकाला न उरुं द्यावें । माझ्या ठायीं यत्किंचित्‌ ॥५॥

तूं आणिल्या मनांत । अवघेंच कांहीं घडून येत ।
रंकाचाही राव होत । तुझा लाधतां वशीला ॥६॥

असो एकदां पुण्यराशी । गेले उमरावतीसी ।
जाऊन उतरले सदनासी । आत्माराम भिकाजीच्या ॥७॥

हा आत्माराम भिकाजी-सुत । उमरावतीचा असे प्रांत ।
मोठा अधिकार हातांत । होता त्याच्या विबुध हो ॥८॥

कायस्थ प्रभू याची जात । हा संतांचा प्रेमी अमित ।
सदाचारसंपन्न गृहस्थ । गृहस्थाश्रमीं वर्ततसे ॥९॥

त्याच्या घरीं समर्थ गेले । ते त्यानें सांग पूजिले ।
मंगलस्नान घातिलें । उष्णोदकानें गजानना ॥१०॥

उटणीं नाना प्रकारचीं । अंगा लाविलीं साचीं ।
वृत्ति आनंदली त्याची । संतसहवासें तेधवां ॥११॥

कर्वतीकांठी उमरेडचा । धोतरजोडा नेसविला साचा ।
भालीं केशरी गंधाचा । भव्य तिलक लाविलासे ॥१२॥

कंठामाजीं पुष्पहार । नैवेद्याचे नाना प्रकार ।
दक्षिणेसी शंभर । रुपये त्यानें ठेविले ॥१३॥

धूप, दीप आरती झाली । पुष्पांजली समर्पिली ।
दर्शनालागीं दाटी झाली । उमरावतीच्या लोकांची ॥१४॥

प्रत्येका ऐसें वाटावें । समर्थ आपल्या घरीं न्यावें ।
यथासांग करावें । पूजन त्यांचें येणें रितीं ॥१५॥

इच्छा ऐसी बहुतां झाली । परी थोडक्याची मनीषा पुरली ।
सदनीं पाऊलें लागण्या भलीं । पुण्य पाहिजे बलवत्तर ॥१६॥

तें ज्यांच्यापासीं होतें । समर्थ गेले तेथें तेथें ।
कां कीं साधूस अवघें कळतें । अंतर्ज्ञानें करुन ॥१७॥

गणेश श्रीकृष्ण खापर्डे । उमरावतीचे गृहस्थ बडे ।
वकीलींत ज्यांच्यापुढें । ढीग रुपयांचे पडती कीं ॥१८॥

दादासाहेब यांप्रत । म्हणत होते वर्‍हाडांत ।
हा सज्जन भाविक अत्यंत । ब्राह्मण शुक्लयजुर्वेदी ॥१९॥

त्यानें विनंति करितां खरी । महाराज गेले त्याच्या घरीं ।
तेथें ही झाली याचपरी । समर्थांची पूजा हो ! ॥२०॥

गणेश आप्पा म्हणूनी । होता लिंगायतवाणी ।
चंद्राबाई कामिनी । त्याची परम भाविक असे ॥२१॥

ती बोलली पतीला । हा साधु पाहिजे नेला ।
कसेंही करुन घराला । पाहा विनंति करुन ॥२२॥

आपुलें निष्पाप असल्या मन । याच्या आगमनें करुन ।
होईल आपलें पवित्र सदन । भाविकाचा देव असे ॥२३॥

गणेश आप्पा म्हणे तिला । वेड लागलें आहे तुला ।
हा सदनीं साधु न्यावयाला । वशिला पाहिजे बलवत्तर ॥२४॥

पाहा खापडर्यालागुनी । हा साधु न्यावया सदनीं ।
श्रम पडले ते आण ध्यानीं । उगा हट्ट धरुं नको ॥२५॥

चंद्राबाई म्हणे नाथा । हें न पटे माझ्या चित्तां ।
सांगे माझी मनदेवता । सदनीं साधु येतील हो ॥२६॥

तुम्ही करा हो त्यांना नुसती । सदनीं येण्यास विनंति ।
गरीबावरी असते प्रीति । संतांची ती विशेष ॥२७॥

परि आप्पा बोलेना । छाती त्याची होईना ।
बोलावयासी निजसदना । श्रीगजानन साधुतें ॥२८॥

महाराज वदले अखेर । गणेश आप्पाचा धरुन कर।
तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ॥२९॥

तुझ्या सदनीं वाटतें यावें । कांहीं वेळ बसावें ।
अरे चित्तीं असेल तें बोलावें । भीड न धरितां कवणाची ॥३०॥

ऐसें महाराज बोलतां । गणेश आप्पाचिया चित्ता ।
हर्ष झाला तत्त्वतां । तो न शब्दें बोलवे ॥३१॥

समर्थांस नेऊन सदनीं । पूजा केली उभयतांनीं ।
आपुला संसार त्यांचे चरणीं । अर्पण केला तात्काळ॥३२॥

असो ऐशा पूजा अमित । झाल्या उमरावतींत ।
त्या प्रत्येक पूजेप्रत । एक गृहस्थ हजर असे ॥३३॥

तो आत्माराम भिकाजीचा । नात्यानें हा होता भाचा ।
राहणार मुंबई शहरींचा । तारमास्तर असे कीं ॥३४॥

तो रजा घेऊन भला । उमरावतीस होता आला ।
भेटण्या आपुल्या मामाला । बाळाभाऊ नाम ज्याचें ॥३५॥

त्या बाळाभाऊकारण । समर्थांचें लागलें ध्यान ।
म्हणे ऐशा साधूचे चरण । सोडून कुठें जाऊं नये ॥३६॥

प्रपंच अवघा अशाश्वत । त्यांत कशाला गोवूं चित्त ।
केला आजपर्यंत । तोच आतां पुरे झाला ॥३७॥

कांहीं असो आजपून । मी न सोडी त्याचे चरण ।
अमृताला टाकून । विष प्याया कोणी जावें ? ॥३८॥

म्हणून प्रत्येक पूजेला । बाळाभाऊ हजर भला ।
होता बुध हो राहिला । दुसरें न कांहीं कारण ॥३९॥

असो कांहीं दिवसांनीं । शेगांवीं आले परतोनी ।
मळ्यासी न जातां जाणी । आले मंदिरीं मोठयाच्या ॥४०॥

त्या मंदिराच्या पूर्वेस । एक जागा होती ओस ।
गजानन पुण्य पुरुष । येऊन बसला ते ठायां ॥४१॥

बातमी महाराज आल्याची । कृष्णा पाटला कळली साची ।
त्यांनीं जागा मळ्याची । सोडिली हें समजलें ॥४२॥

म्हणून आला धांवत । त्या ओस जागेवरी सत्य ।
महाराजा करुन दंडवत । अधोवदन बैसला ॥४३॥

डोळ्यांतून वाहे पाणी । खंड त्याला नसे जाणी ।
वस्त्र टाकलें भिजवोनी । त्या अश्रूंनीं छातीचें ॥४४॥

तैं महाराज वदले पाटलाला । ऐसा कां रे रडसी भला ? ।
शोक कोणता तुला झाला ? । तें वेगें सांग मज ॥४५॥

पाटील बोले त्यावर । जोडोन आपले दोन्ही कर ।
महाराज मळ्याचा अव्हेर । कां हो आज केलांत हा ? ॥४६॥

ऐसा अक्षम्य कोणता । अपराध झाला सांगा आतां ।
माझ्याकडून ज्ञानवंता । मी लेकरुं आपुलें असे ॥४७॥

ही देशमुखाच्या बाजूची । जागा आहे बघा साची ।
एका माळ्याच्या मालकीची । येथें तुम्ही राहूं नका ॥४८॥

मळ्यांत मर्जी नसेल जरी । तरी चला राहात्या घरीं ।
तें खालीं करितों सत्वरीं । तुम्हांसाठीं दयाळा ॥४९॥

कां कीं तुम्हांवांचून । मला न कांहीं प्रिय आन ।
हें कळलें वर्तमान । अवघ्या पाटील मंडळीतें ॥५०॥

तेही तेथें धांवून आले । महाराजा विनवूं लागले ।
निजसदना या या भले । हरी आणि नारायणा ॥५१॥

महाराज बोलले तयासी । मी जो या जागेसी ।
येऊन बसलों आज दिवशीं । तें तुमच्या हितास्तव ॥५२॥

तें पुढें येईल कळोन । आतां न करा भाषण ।
वाद दोघांचें निर्मूलन । करील हें विसरुं नका ॥५३॥

जितके जगीं जमेदार । तितके न करिती विचार ।
मागचा पुढचा साचार । हेंच उणें त्यांच्या ठायीं ॥५४॥

जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसीं । मी सोडितां तत् गृहासी ।
तो नाहीं रागावला ॥५५॥

तें कां हें त्यासी विचार । माझी कृपा तुमच्यावर ।
आहे ती न ढळणार । कोणत्याही कारणांनीं ॥५६॥

बंकटलालही आला तेथ । घालूं लागला समजूत ।
यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यांत । तुम्ही यांना नेऊं नका ॥५७॥

माझ्या घरुन जेव्हां आले । तेव्हां सांगा मीं काय केलें ।
आपण आहोंत त्यांचीं बाळें । ते सारखे अवघ्यांना ॥५८॥

सखाराम आसोलकार । आहे मनाचा उदार ।
तो जागा देण्यास इन्‌कार । करणार नाहीं वाटतें ॥५९॥

सखाराम देईल जागा । पुढचें करुं आपण बघा ।
म्हणजे अवघ्यांस यांत भागा । घेतां येईल सहजची ॥६०॥

समेट अवघ्यांचा होऊनी । मठ बांधिला त्या ठिकाणीं ।
परशराम सावजींनीं । मेहेनत घेतली विशेष ॥६१॥

समर्थांच्या बरोबर । निस्सीम भक्त होते चार ।
भास्कर, बाळाभाऊ, पितांबर । उमरावतीचा गणेश आप्पा ॥६२॥

रामचंद्र गुरव त्याचपरी । राहात होता बरोबरी ।
हे पांच पांडव श्रीहरी । गजानन शोभूं लागले ॥६३॥

वृत्ति बाळाभाऊची । अतिविरक्त झाली साची ।
पर्वा न त्यानें नौकरीची । केली यत्किंचित्‌ आपुल्या ॥६४॥

पत्रें येती वरच्यावरी । बाळाभाऊस येण्या घरीं ।
परी परिणाम अंतरीं । कांहींच त्याच्या होईना ॥६५॥

भास्कर म्हणे गुरुराया । हा सोकला पेढे खाया ।
म्हणून ना इच्छी जाया । आपल्यापासून कोणीकडे ॥६६॥

तुम्ही द्यावा यातें मार । म्हणजेच हा जवळ करील घर ।
रत्‍न चौदावें पाहिल्याबिगर । हा येथून हलणें नसे ॥६७॥

लकडीवांचून माकड । पाहा न होई कधीं धड ।
मोठमोठाले ते पहाड । भिऊं लागती वज्राला ॥६८॥

एकदां बळेंच घालवून । दिलें बाळाभाऊकारण ।
परी तो आला परतून । राजीनामा देवानिया ॥६९॥

बाळाभाऊ शेगांवासी । येतां भास्कर बोलला त्यासी ।
कां रे आम्हां त्रास देसी ? । येथें येऊन वरच्यावर ॥७०॥

ओढाळ बैल हिरव्यावर । पाहे पडाया निरंतर ।
त्यास जरी दिला मार । तरी तो येई तेथ पुनः ॥७१॥

तैसी लोचटा तुझी कृति । तंतोतंत निश्चिति ।
झाली जयाला विरक्ति । त्यानेंच येथें यावें रे ॥७२॥

हें अहंकाराचें भाषण । समर्था न खपलें जाण ।
त्यांनीं भास्कराचें अज्ञान । निवटाया कृत्य केलें ऐसें ॥७३॥

एका गृहस्थाच्या हातीं । भली थोरली छत्री होती ।
ती गजाननें घेऊनी हातीं । बाळास झोडूं लागले ॥७४॥

मारतां मारतां मोडली । बुध हो छत्री भली ।
मग एक मोठी घेतली । भरीव काठी वेळूची ॥७५॥

तिनें मारणें सुरुं केलें । तें पाहतां लोक भ्याले ।
कांहीं कांहीं पळून गेले । सोडून त्या मठाला ॥७६॥

परी बाळाभाऊ तसाच पडला । समर्थांच्या पुढें भला ।
कैक म्हणती असेल मेला । तो या अशा मारानें ॥७७॥

भास्करही झाला चिंतातुर । बाळाभाऊचा पाहून मार ।
परी समर्थांच्या समोर । बोलण्या छाती होईना ॥७८॥

तीही काठी मोडली खरी । बाळाभाऊच्या पाठीवरी ।
मग तो कंटाळून अखेरीं । तुडवूं लागले तयाला ॥७९॥

जैसा का तो कुंभार । माती तुडवितो साचार ।
तैसाच केला प्रकार । महाराजांनीं तुडविण्याचा ॥८०॥

मठीं हा प्रकार चालला । शिष्यसमुदाय पळत सुटला ।
कोणी गेले बोलावण्याला । त्यांच्या आवडीच्या मंडळीस ॥८१॥

बंकटलाल कृष्णाजी । धांवूनी आले मठामाजीं ।
समर्थ हात धरण्या राजी । कोणी तयार होईना ॥८२॥

बंकटलाल म्हणे भीत भीत । समर्था हा आपुला भक्त ।
पुरें झालें याप्रत । आतां ऐसें तुडवणें ॥८३॥

ऐसें ऐकतां भाषण । समर्थ वदले हांसून ।
हें असंबद्ध भाषण । कां करितां कळेना ॥८४॥

मी न बाळासी मारिलें । नाहीं तयासी तुडविलें ।
निरखून पहा चांगलें । म्हणजे येईल कळोनी ॥८५॥

महाराज म्हणाले बाळासी । ऊठ वत्सा वेगेसी ।
या आलेल्या मंडळीसी । आंग तुझें दाखिव ॥८६॥

ऐसी आज्ञा होता भला । बाळाभाऊ उठून बसला ।
लोक त्याच्या अंगाला । पाहूं लागले निरखून ॥८७॥

तों वळाचें नांव नाहीं । कोठेंही न लागलें कांहीं ।
तो पहिल्यापरीच होता पाही । निमग्न आपुल्या आनंदांत ॥८८॥

त्यायोगें भास्कराला । बाळाभाऊचा अधिकार कळला ।
मग तोही ना पुन्हां बोलला । वेडेंवांकुडें बाळासी ॥८९॥

सोनें कसासी उतरतें । तेव्हांच त्याची किंमत कळते ।
आश्चर्य झालें समस्तांतें । तो प्रकार पाहून ॥९०॥

सुकलाल नामें आगरवाला । होता बाळापुराला ।
श्रोते त्याच्या आगराला । गाय एक द्वाड होती ॥९१॥

तिनें गांवांत फिरावें । मुलांमाणसां तुडवावें ।
सशक्तांसी हुंदाडावें । शिंगानें कीं आपुल्या ॥९२॥

वाटेल त्याच्या दुकानांत । गाईनें शिरावें अवचित ।
धान्याचिया टोपल्यांत । तोंड आपुलें खुपसावें ॥९३॥

वाटेल तितुकें यथेच्छ खावें । राहिलेलें नासावें ।
तेल तुपाचें लवंडावें । पिंप अंगाच्या धक्क्यानें ॥९४॥

घरीं बांधून ठेवितां । चर्‍हाटें तोडी हां हां म्हणतां ।
सांखळीसी आणिली लघुता । बांधतां त्या गाईनें ॥९५॥

ती गाय नोव्हे वाघीण । बाळापुराकारण ।
लोक गेले कंटाळून । त्रास सोसितां तियेचा ॥९६॥

गाभण मुळींच होईना । कास कधींच करीना ।
कोंडून ठेवितां राहीना । घरामाजीं कोठेंही ॥९७॥

लोक म्हणती सुकलालाला । दे या खाटकास गाईला ।
किंवा मारुन टाका तिला । तूंच गोळी घालून ॥९८॥

सुकलाल म्हणे लोकांसी । तुम्हीच मारुन टाका तिसी ।
वाटेल त्या प्रयत्‍नासी । करुन या विबुध हो ॥९९॥

एका पठाणानें तिला । मारण्याचा यत्‍न केला ।
गोळी भरुन बंदुकीला । टपून बैसला होता हो ॥१००॥

तें कसें काय कोण जाणे । कळलें गाईकारणें ।
तिनें येऊन शिंगानें । पठाण पाडिला उताणा ॥१॥

मी परगांवा नेऊन । दिली होती सोडून ।
परी ती आली परतून । त्याला सांगा काय करुं ॥२॥

ऐसें ऐकतां लोक म्हणती । आतां याला एक युक्ति ।
गोविंदबुवाचा घोडा म्हणती । समर्थानें गरीब केला ॥३॥

तूंही या गाईला । घेऊन जा शेगांवाला ।
अर्पण करी समर्थाला । म्हणजे अवघें संपलें ॥४॥

साधूस गाय दिल्याचें । पुण्य तुला लाभेल साचें ।
आणि संकट आमुचें । टळेल बापा त्यायोगें ॥५॥

तें अवघ्यांस मानवलें । गाय नेण्याचें ठरविलें ।
तिला धरण्यासाठीं केले । प्रयत्‍न नानापरीचे ॥६॥

एकही यत्‍न नाहीं फळला । शेवटीं एक्या पटांगणाला ।
हरळकुंद्याचा ढीग केला । सरकी ठेवली शेजारीं ॥७॥

ती खायालागून । गाय आली धांवून ।
ती येतां फांस टाकून । धरिली दहावीस जणांनीं ॥८॥

साखळदंडानें बांधून पुरी । गाय घातली गाडीवरी ।
आणिली शेगांवा भीतरीं । गजाननासी द्यावया ॥९॥

जवळ शेगांव जसें जसें । येऊं लागलें तसें तसें ।
स्वभावांत पडलासे । त्या गाईच्या पालट ॥११०॥

समर्थांपुढें येतांक्षणीं । गाय झाली दीनवाणी ।
तिनें लोचनीं आणून पाणी । पाहिलें त्या पुण्यपुरुषा ॥११॥

महाराज म्हणाले अवघ्यांना । हा काय तुमचा मूर्खपणा ।
गाईस ऐशा यातना । देणें कांहीं बरें नव्हे ॥१२॥

चारही पाय बांधलेत । गळां साखळदंड लाविलेत ।
शिंगांचीही तीच गत । केली चर्‍हाटें काथ्याच्या ॥१३॥

ऐसा मोठा बंदोबस्त । शोभतसे वाघिणीप्रत ।
ही गाय बिचारी साक्षात् । तिला न ऐसें करणें बरें ॥१४॥

अरे खुळ्यांनो, ही गाय । अवघ्या जगाची आहे माय ।
तिला बांधिलें हाय हाय । केवढा कठीण प्रसंग आला ॥१५॥

तिला आतांच करा मुक्त । ती न हुंदाडी कोणाप्रत ।
परी लावण्या तिला हात । छाती कोणाची होईना ॥१६॥

जो तो पाहून मागें सरे । तेथ समर्थ आले त्वरें ।
आपुल्या त्या पुनीत करें । बंधनें तोडिलीं धेनूचीं ॥१७॥

बंधनें अवघीं तुटतां भलीं । गाय गाडीच्या खालीं आली ।
पुढले पाय टेकिती झाली । समर्थां वंदन करावया ॥१८॥

खालीं घालूनिया मान । प्रदक्षिणा त्या केल्या तीन ।
समर्थांचे दिव्य चरण । चाटूं लागली जिभेनें ॥१९॥

ऐसा प्रकार तेथें झाला । तो अवघ्यांनीं पाहिला ।
समर्थांच्या प्रभावाला । शेषही वर्णूं शकेना ॥१२०॥

समर्थ म्हणाले धेनूस । बाई कोणा न द्यावा त्रास ।
तूं या सोडून मठास । कोठेंही जाऊं नको ॥२१॥

ऐसा घडतां प्रकार । अवघ्यांनीं केला जयजयकार ।
उच्च स्वरानें त्रिवार । समर्थांच्या नांवाचा ॥२२॥

बाळापूरची मंडळी । बाळापुरा निघून गेली ।
गाय तेथेंच राहिली । शेगांवासी मठामध्यें ॥२३॥

त्या दिवसापासून । ठावे न तिला चर्‍हाट जाण ।
सुज्ञ धेनूचे अवघे गुण । तिच्या ठायीं पातले ॥२४॥

अजून त्या शेगांवातें । तिची संतती नांदते ।
जे कांहीं वदती ब्रह्मवेत्ते । तेंच येतें घडोन ॥२५॥

असो एक कारंज्याचा । लक्ष्मण घुडे नांवाचा ।
विप्र वाजसनीय शाखेचा । धनकनक संपन्न असे ॥२६॥

त्यासी रोग झाला पोटांत । उपाय केले अत्यंत ।
परि न आला गुण किंचित्‌ । खर्च सारा व्यर्थ गेला ॥२७॥

त्यानें समर्थांची कीर्ति । कर्णोपकर्णी ऐकिली होती ।
म्हणून सहपरिवारें सत्वर गती । आला शेगांवाकारणें ॥२८॥

रोगव्यथेनें चालवेना । श्रोते तया लक्ष्मणा ।
दोघांतिघांनीं उचलून जाणा । आणिले त्या मठांत ॥२९॥

करण्या नुसता नमस्कार । असमर्थ होतें शरीर ।
त्याच्या कुटुंबानें पदर । समर्थांपुढें पसरिला ॥१३०॥

आणि म्हणाली दयाघना ! । मी आपली धर्मकन्या ।
माझ्या पतीच्या यातना । हरण कराव्या आपण ॥३१॥

अमृताचें दर्शन । होतां कां यावें मरण ।
माझ्या कुंकवालागून । टिकवा हीच विनंती ॥३२॥

त्या वेळीं समर्थस्वारी । आंबा खात होती खरी ।
तोच फेकिला अंगावरी । त्या लक्ष्मणकांतेच्या ॥३३॥

जा दे हा पतीस खाया । व्याधि त्याची बरी व्हाया ।
तूं शोभसी त्यास जाया । पति-भक्ति-परायण ॥३४॥

यापुढें न कांहीं वदले । चिलीम ओढूं लागले ।
श्रीगजाननस्वामी भले । आपुल्या मठांत शेगांवीं ॥३५॥

भास्कर म्हणे ’अहो बाई । आतां न बसा ये ठाईं ।
आपल्या पतीस लवलाही । घेऊन जा कारंज्यातें ॥३६॥

प्रसाद आंब्याचा जो कां तुला । समर्थ-करीं प्राप्त झाला ।
तोच घाली खावयाला । आपुल्या पतीकारणें ॥३७॥

यानें तुझें होईल काम । गुण येईल अत्युत्तम ।
लक्ष्मणासी आराम । होईल आंबा खातांच’ ॥३८॥

बाई घेऊन आंब्याला । येती झाली कारंज्याला ।
प्रसाद खाऊं घातला । आंब्याचा आपल्या पतीस ॥३९॥

निजगृहीं जोडपें आलें । आप्त पुसूं लागले ।
शेगांवांत काय घडलें । तें सांगावें साकल्यें ॥१४०॥

बाईनें अवघें वर्तमान । कळविलें लोकांलागून ।
आंब्याचा तो प्रसाद म्हणून । दिला समर्थें मजलागीं ॥४१॥

आणि आज्ञा केली वरी । खाऊं घाला अत्यादरीं ।
आंबा प्रसाद निजकरीं । आपुल्या त्या पतीला ॥४२॥

त्याप्रमाणें मींही केलें । आज सकाळीं खाऊं घातलें।
हें वैद्यांनीं जईं ऐकिलें । तईं त्या वाटलें वाईट ॥४३॥

अहो बाई तुम्ही काय । केलेंत हें हाय हाय ।
आंबा हेंच कुपथ्य होय । या पोटांतील रोगाला ॥४४॥

माधवनिदानीं हेंच कथिलें । सुश्रुतांनींही वर्णिलें ।
निघंटानें कथन केलें । शारंगधर म्हणे ऐसेंच ॥४५॥

तुम्ही तो प्रसाद दिलेला । पाहिजे होता भक्षण केला ।
पत्‍नीचें पुण्य पतीला । उपयोगीं पडतसे ॥४६॥

ऐसें वैद्य बोलले । आप्त अवघे घाबरले ।
जे ते टोचूं लागले । लक्ष्मणाच्या पत्‍नीस ॥४७॥

परी झालें अघटित । लक्ष्मणाचें पोट सत्य ।
रेच होऊन अकस्मात । मऊ होऊन गेलें हो ॥४८॥

शौच्यावाटें व्याधि गेली । हळुंहळूं शक्ति आली ।
पहिल्या परीच होती झाली । प्रकृति लक्ष्मणाची ॥४९॥

निसर्गाच्या बाहेरी । वैद्यशास्त्र कांहीं न करी ।
तेथें उपयोगी पडे खरी । कृपा देवसंतांची ॥१५०॥

लक्ष्मण बरा झाल्यावर । आला शेगांवीं सत्वर ।
म्हणे महाराजा माझें घर । पाय लावून पवित्र करा ॥५१॥

मी आलों त्याचसाठीं । चला कारंज्यास ज्ञानजेठी ।
मला न करा हिंपुटी । नाहीं ऐसें म्हणूं नका ॥५२॥

आग्रह त्याचा विशेष पडला । महाराज गेले कारंज्याला ।
तेधवां होते संगतीला । शंकर-भाऊ पितांबर ॥५३॥

घरीं नेऊन पूजा केली । दक्षिणा ती निवेदिली ।
अवघी संपत्ति आपुली । आहे मी कोण देणार ? ॥५४॥

परी एका ताटांत । कांहीं रुपये ठेविले सत्य ।
महाराज बघून त्याप्रत । ऐशा रितीं बोलले ॥५५॥

म्हणशी माझें कांहीं न उरलें । मग हे रुपये कोठून आणिले ? ।
लक्ष्मणा ऐसे चाळे । दांभिकपणाचे करुं नको ॥५६॥

मला दिले तूं आपलें घर । आतां उघडीं अवघीं दारें ।
फेकून देई रस्त्यावर । अवघीं कुलपें येधवां ॥५७॥

लक्ष्मण कांहीं न बोलला । मौन धरुन बैसला ।
परी समर्थें आग्रह धरिला । खजिन्याचें दार उघडी ॥५८॥

भीत भीत मोकळें द्वार । केलें त्यानें अखेर ।
खजिन्याच्या उमर्‍यावर । स्वतः जाऊन बैसला ॥५९॥

आणि म्हणाला महाराज यावें । वाटेल तें घेऊन जावें ।
ऐसें बोलला जरी बरवें । परी अन्यभाव अंतरींचा ॥१६०॥

हें त्याचें दांभिकपण । समर्था आलें कळोन ।
बहुरुप्याचें राजेपण । कोठून टिके बाजारीं ? ॥६१॥

जैसें कडू वृंदावन । वरुन पाहतां दिसे छान ।
परी अंतरीं कडवटपण । पूर्ण त्याच्या भरलें असे ॥६२॥

सोडून त्याच्या घरासी । उपासी निघाले पुण्यरासी ।
दांभिकाच्या सदनासी । संत न होती तृप्त कदा ॥६३॥

तेथें त्याच्या घराची । वा धनदौलतीची ।
गरज समर्था नव्हती साची । ते वैराग्याचे सागर ॥६४॥

परी तो जें कांहीं बोलला । त्याचा सत्यपणा पाहिला ।
खोटेंपणाचा राग आला । म्हणून गेले उठोन ॥६५॥

जातां जातां बोलले । माझें माझें म्हणसी भलें ।
भोग आतां त्याचीं फळें । माझा उपाय त्यास नसे ॥६६॥

मी कृपा करावया । आलों होतों या ठायां ।
याहीपेक्षां दुप्पट द्याया । परी तें न तुझ्या प्रारब्धीं ॥६७॥

तेंच पुढें झालें सत्य । एका सहा महिन्यांत ।
अवघी लक्ष्मी झाली फस्त । त्या भिक्षेची वेळ आली ॥६८॥

म्हणून श्रोते परमार्थांत । खोटेपणा न खपे किंचित् ।
याचसाठीं हें चरित्र । समर्थें घडून आणिलें ॥६९॥

श्रीगजानन चिंतामणी । त्या गार काय शोभा आणी ? ।
वा सुवर्णालागुनी । भूषवावें का कथिलानें ? ॥१७०॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । श्रीगजाननविजय नामें ग्रंथ ।
सदा भाविक परिसोत । निज कल्याण व्हावया ॥१७०॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥१०॥


Leave a Comment