सरदारसिंग राणा

अभिनव भारतचे इंग्लंड आणि पॅरिस येथील आधारस्तंभ देशभक्त विधिवक्ता सरदारसिंग राणा !

१. मवाळ कामांत न रमणारे राणा !

सौराष्ट्रामधील कंठरिया या गावात १२.४.१८७० या दिवशी एका लहानशा; परंतु प्राचीन संस्थानिकांच्या वंशात सरदारसिंग राणा यांचा जन्म झाला. वर्ष १८९८ मध्ये बॅरिस्टरच्या अभ्यासासाठी ते लंडन येथे आले. लंडनमध्ये चालणा-या राजकीय कामात भाग घ्यायच्या ओढीने ते प्रारंभी दादाभाई नौरोजींच्या लंडन इंडियन सोसायटीचे आजीव सभासद झाले आणि ब्रिटिश काँग्रेस कमिटीत काम करू लागले. अर्थात या मवाळ कामांमध्ये ते फारसे रमले नसावेत; कारण लंडनमध्येच त्यांचा पं. वर्मा यांच्याशी परिचय झाला आणि श्यामजींच्या राष्ट्रीय जहाल विचारसरणींशी ते पूर्णपणे सहमत नि समरस झाले. १८.२.१९०५ या दिवशी पं. श्यामजींनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली होमरूल सोसायटीची स्थापना केली. उपाध्यक्षपदी विधिवक्ता राणा आणि श्री. गोदरेज होते. कार्यवाह म्हणून जे.सी. मुखर्जी काम बघू लागले. विधिवक्ता राणा यांनी उघडपणे राजकीय कार्यास आरंभ केला. त्यांचा पॅरिस येथे हिर्यागमोत्यांचा व्यवसाय होता.

२. राष्ट्राभिमान्यांसाठी आर्थिक साहाय्य

विधिवक्ता राणा यांनी डिसेंबर १९०५ मधील इंडियन सोशिओलॉजिस्टच्या अंकात एक पत्र लिहून पं. वमार्र्ंप्रमाणेच भारतीय विद्यार्थ्यांसाठी राणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे प्रत्येकी २ सहस्र रुपयांच्या शिष्यवृत्त्या घोषित केल्या. त्यासाठी ही शिष्यवृत्ती घेऊन परदेशी शिक्षण घेणार्या्ने भारतात परतल्यावर ब्रिटिशांकित असलेले कोणतेही पद, वतन, अधिकार आणि नोकरी स्वीकारू नये, तर स्वतंत्रपद निर्माण करावे, अशा अटी घातल्या. त्या पत्रात त्यांनी प्रांजळपणे असे लिहिले, पूर्वी माझ्या शिक्षणासाठी माझ्या काही भारतीय मित्रांनी आर्थिक साहाय्य केले होते. आता तसे करण्याची माझी पाळी आल्याने देशबांधवांपैकी दोघा-तिघांनी तरी स्वतंत्र देशाचा प्रवास करून राजकीय स्वतंत्रतेचा लाभ घेता यावा, यास्तव मी आर्थिक साहाय्य करावे, हे माझे कर्तव्य आहे.

अर्थात राणाजींची शिवाजी शिष्यवृत्ती लोकमान्य टिळक, कार्यकर्ते परांजपे आणि पं. वर्मा यांच्या अनुग्रहाने विनायक दामोदर सावरकर यांना मिळाली. त्यानुसार जुलै १९०६ मध्ये ते लंडनला विधिवक्ता शिक्षणासाठी प्रविष्ट झाले. तेथील भारत भवनामध्ये राहून सावरकरांनी लंडनमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत चेतवली. अभिनव भारत या संस्थेची शाखा स्थापन केली आणि ४ वर्षांत लंडनमध्ये स्वातंत्र्यार्थ जे कार्य केले, ते अजोड ठरले. स्वातंत्र्यवीरांच्या या कार्याचे निमित्त ठरले, ते विधिवक्ता सरदारसिंग राणा ! या गोष्टींचा राणाजींना सार्थ अभिमान होता.

३. पॅरिसमधील कार्य

१४.४.१९०६ या दिवशी बंगालमधील विख्यात पुढारी श्री. सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी वन्दे मातरम् घोषणेवरील बंदी मोडली. यास्तव त्यांना बारीसाल येथे अटक झाल्याचे वृत्त कळताच त्याच्या निषेधार्थ ४.५.१९०६ या दिवशी होमरूल सोसायटीच्या वतीने पं. वर्मा यांनी लंडनमध्ये सार्वजनिक सभा घेतली. पॅरिसमधील सभेद्वारा ब्रिटिश दडपशाहीच्या प्रकट निषेधाचा फ्रान्समध्ये प्रारंभ झाला आणि हा व्याप वाढत वाढत पुढे १० वर्षांपर्यंत पॅरिस हे अभिनव भारताच्या सशस्र क्रांतीकारक संघटनेचे मुख्य केंद्र बनले. विधिवक्ता राणा, मॅडम कामा, पं. वर्मा, लाला हरदयाळ आदी अभिनव भारताच्या अग्रगण्य क्रांतीकारक पुढार्यांअची पॅरिस हीच काशी झाली होती.

४. स्टटगार्ट मधील प्रतिनिधीत्व

ऑगस्ट १९०७ मध्ये जर्मनीतील स्टटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजसत्ता मेळाव्यात मॅडम कामा आणि विधिवक्ता राणा हे हिंदी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. तेथेच मॅडम कामा यांनी सभेमध्ये भारतीय तिरंगा फडकावला आणि ब्रिटिश राज्यकर्ते हबकले. अर्थात हा ध्वज सिद्ध करणे आणि तो गुप्तपणे सभेपर्यंत नेणे, या सर्व योजनेत सावरकर, पं. वर्मा, मॅडम कामा, विधिवक्ता राणा, व्ही.व्ही.एस्. अय्यर यांचा प्रामुख्याने सहभाग होता.

५. वृत्तपत्राच्या संपादकांना खडसावणारे राणा !

लंडन आणि पॅरिस येथे क्रांतीकारकांनी चालवलेल्या या स्वातंत्र्यलढ्याची दहशत ब्रिटिशांना वाटे, याचा प्रत्यय अनेक वेळा येई. विधिवक्ता राणा आणि त्यांची जर्मन पत्नी यांच्या संदर्भात घडलेली एक घटना अशी… पॅरिस येथील हिंदी लोकांचा एक राजद्रोही गट आहे, अशी माहिती रंगवून सांगतांना इंग्लडमधील मॉर्निंग पोस्टच्या वार्ताहराने त्यात राणा आणि त्यांची पत्नी यांच्यासंबंधी निंदाव्यंजक लिखाण लिहिले. हे वाचताच विधिवक्ता राणा यांनी मॉर्निंग पोस्टच्या संपादकांना समज देणारे एक खरमरीत पत्र लिहिले. त्यामुळे संपादक महाशयांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी श्री. आणि सौ. राणा यांची सपशेल क्षमायाचना केली.

६. स्वातंत्र्यसमर उत्सव

अभिनव भारत या क्रांतीकारक संघटनेचे प्रमुख वि.दा. सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली १०.५.१९०८ या दिवशी वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा उत्सव लंडनमधील भारत भवनमध्ये उत्साहाने आणि थाटात साजरा करण्यात आला. सभागृह गच्च भरून बाहेरही पुष्कळ हिंदी मंडळी उभी होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, देशभक्त राणा ! त्यासाठी ते पॅरिसहून आले. त्यांनी अध्यक्षीय समारोपही समयोचित भाषणाने केला. सर्व मंडळी या कार्यक्रमाने भारावून गेली. अनेकांनी देशभक्तीच्या प्रतिज्ञा घेतल्या आणि देशवीरांसाठी साहाय्यकोष उभारला. या कार्यक्रमाला मॅडम कामा उपस्थित राहू शकल्या नाहीत; पण त्यांनी यासाठी शुभसंदेश आणि निधीसाठी ७५ रुपये पाठवले. सरदारसिंग राणा यांनी स्वतःचे मे मासाचे सर्व उत्पन्न या निधीसाठी दिले.

७. योगायोग

विधिवक्ता राणा यांचे नातू श्री. राजेन्द्र सिंग राणा हे लोकसभेचे विद्यमान सदस्य असून ते गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. उल्लेखनीय योगायोग म्हणजे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्म वर्ष १८५७ मध्ये झाला. त्यानंतर तेरा वर्षांनी १८७० मध्ये सरदारसिंग राणा जन्मले आणि त्यानंतर तेरा वर्षांनी १८८३ मध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. पुढे राजकोट येथे १२.४.१९५७ मध्ये विधिवक्ता राणा यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.

– सौ. स्वामीनी विक्रम सावरकर (प्रज्वलंत, जानेवारी २००३)

Leave a Comment