Menu Close

ज्यांना वाटत असेल, त्यांनी खुशाल आमच्या दरबारात यावे; आमच्याकडील ईश्वरी विद्येचे दर्शन घडवू – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

  • हिंदुद्वेष्ट्यांच्या आव्हानाला पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे चोख प्रत्युत्तर !

  • ‘अंनिस’ला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाविकांची गर्दी !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री व शाम मानव

नागपूर – हिंदु धर्माचा प्रसार आणि संतांचा अवमान करणार्‍या तथाकथित निधर्मीवाद्यांना बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी नागपूरच्या भूमीतून आव्हान दिले आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) शाम मानव यांनी दिलेल्या आव्हानाचा स्वीकार करत, ‘ज्यांना वाटत असेल, त्यांनी दरबारात यावे; आम्ही आमच्याकडील ईश्वरी विद्येचे दर्शन घडवू’, अशा शब्दांत त्यांनी हिंदुद्वेष्ट्यांचा समाचार घेतला आहे. दुसरीकडे हिंदूंच्या श्रद्धांवर प्रहार करणार्‍या अंनिसला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाविकांनी रेशीम बागेत मोठी गर्दी केली आहे.

सध्या नागपूर येथील रेशीम बाग मैदानावर २६ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘श्रीराम कथे’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाम मानव यांनी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना ८० लाख रुपयांचे आव्हान दिले होते. शाम मानव यांनी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्रींना १० लोकांची नावे, त्यांच्या वडिलांचे नाव, वय आणि भ्रमणभाष क्रमांक अचूक सांगण्याचे आव्हान दिले आहे, तसेच ‘अतींद्रिय शक्ती’च्या परीक्षेसाठी बंद खोलीत ठेवलेल्या १० वस्तू ओळखण्याचेही आव्हान दिले आहे. दोन्ही परीक्षांमध्ये किमान ९० टक्के अचूकता आवश्यक ठेवण्यात आली असून ही प्रक्रिया नागपूरमध्ये पत्रकारांच्या उपस्थितीत झाली पाहिजे, असे अंनिसने म्हटले आहे. अंनिसकडून सांगण्यात आले की, धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना यश मिळाल्यास ८० लाख रुपये दिले जातील, अन्यथा त्यांची कृती लोकांच्या भावनांचा अपलाभ घेणे मानले जाईल. यावर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्रींनी अत्यंत निर्भीडपणे हे आव्हान स्वीकारले आहे.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले, ‘‘या वेळी आम्ही नागपुरातच आहोत. मध्यप्रदेशात नाहीत. एक घंट्यांसाठी नाही, तर ५ दिवसांसाठी आहोत. कथेच्या मंडपातच आहोत. राज्य त्यांचे, शहर त्यांचे आणि मंचही त्यांचाच. मी एकटाच आहे. ज्यांना हौस असेल, त्यांनी दरबारात या. आमच्याकडे जी विद्या असेल आणि जी शक्ती असेल, आम्ही तिचे सादरीकरण करू. आम्ही जादूगार नाही. आम्हाला ईश्वर जी प्रेरणा देईल, त्यानुसारच आम्ही लोकांना मार्गदर्शन करू. ते आले तर त्यांनाही मार्गदर्शन करू.’’

सनातन धर्माचा प्रचार, म्हणजे अंधश्रद्धा नव्हे !

यापूर्वी जानेवारी २०२३ मध्येही अशाच प्रकारचे कुभांड रचण्यात आले होते. बागेश्वर सरकार यांच्या विरोधात शाम मानव यांनी तक्रार केली होती. ‘धीरेंद्रकृष्ण शास्त्री अंधश्रद्धा पसरवत आहेत आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवायला हवा’, असे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. यावर नागपूर पोलिसांनी सांगितले, ‘व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह असे काहीही नाही. त्यांनी असे काहीही म्हटले नव्हते, ज्यामुळे अंधश्रद्धा पसरेल किंवा कायद्यानुसार गुन्हा ठरेल.’ पोलिसांच्या या वक्तव्यानंतर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्रींनी म्हटले होते की, सनातनाचा प्रचार अंधश्रद्धा नाही.

नागपूरमध्ये ‘संतांचा अवमान सहन करणार नाही’, अशा भावना भक्त व्यक्त करत आहेत. पोलिसांच्या पडताळणीतही पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कार्यात काहीही अनधिकृत नसल्याचे सिद्ध झाले आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Read more on Hinduism

Latest News