
मुंबई – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्या दर्शनाला गेले; म्हणून ‘माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊ नये’, अशी वल्गना शाम मानव करत आहेत. सरन्यायाधीश एखादे चर्च किंवा दर्गा या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी गेले असते, तर शाम मानव यांनी वरीलप्रमाणेच वक्तव्य केले असते का ? हा पोटशूळ माजी सरन्यायाधीश हिंदु संतांकडे गेल्यामुळेच आहे, अशा शब्दांत शाम मानव यांचा हिंदुद्वेष सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी उघड केला. याविषयीच्या वक्तव्याचा व्हिडिओ श्री. अभय वर्तक यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे.
अभय वर्तक म्हणाले, ‘‘शाम मानवांना अंधश्रद्धा निर्मूलनाशी काही देणे-घेणे नाही. केवळ हिंदु धर्मावर आघात करणे, हाच त्यांचा इतिहास आहे. यापूर्वीही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली यांचा उल्लेख शाम मानव यांनी ‘कुलकर्ण्याचे १२ वर्षांचे पोर’ असा केला आहे. सद्यस्थितीत मुंबईमध्ये बंगाली बाबांची पत्रके लावून ‘मी वशीकरण करू शकतो’, ‘करणी करू शकतो’, असे सार्वजनिकरित्या दिलेले असते; पण शाम मानव त्या ठिकाणी ८० लाख रुपयांचे आव्हान देत नाहीत; कारण ते मुसलमान असतात. ठाणे किंवा रायगड येथील दुर्गम भागांमध्ये अनेक पास्टर (ख्रिस्ती धर्मप्रचारक), फादर हे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी सभा घेतात. त्यामध्ये ‘लंगडा चालायला लागेल’, ‘आंधळ्याला दिसायला लागेल’, ‘मुका बोलायला लागेल’ अशा प्रकारच्या बतावण्या करतात. त्याविषयी शाम मानव अवाक्षरही काढत नाहीत. तुम्हाला हिंदूंच्या विरोधातच काम करायचे असल्यामुळे प्रत्येक हिंदु संत भोंदू दिसतो. शाम मानव हे हिंदुद्रोही आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारच्या एका समितीवरही ते आहेत. त्यामध्ये सरकारी पैशांचा अपव्यय ते करतात का ? याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, शाम मानव यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.’’
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात







