थाळनेर

धुळे जिल्हा हा खानदेशातील एक जिल्हा आहे. धुळे जिल्ह्यातील थाळनेरचा किल्ला हा इतिहासप्रसिद्ध किल्ला असून तो धुळ्याच्या ईशान्य दिशेला आहे. तापी नदीच्या काठावर वसलेल्या थाळनेर गावालगतच थाळनेरचा किल्ला आहे.

धुळ्यापासून साधारण ५० कि.मी. अंतरावर थाळनेर किल्ला असून धुळ्यापासून थाळनेरला जाण्यासाठी एस.टी. बसेसची नियमित सेवा उपलब्ध आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूरकडून तसेच जळगांव जिल्ह्यातील चोपडा या गावांकडूनही आपण थाळनेर येथे पोहोचू शकतो.

थाळनेर म्हणजे थळ + निर या शब्दांची संधी आहे. थळ म्हणजे जमीन आणि निर म्हणजे पाणी. जेथे समृद्ध जमीन आहे आणि मुबलक पाणी आहे असे थाळनेर.

थाळनेर बद्दल एक दंतकथाही प्रसिद्ध आहे. मलिकखान हा लष्करी सेवेतील एक सैनिक होता. ता काही कारणाने या परिसरामध्ये आला असताना त्याने येथे एक विचित्र दृष्य पाहील. तो गावात पोहोचला असताना त्याला एक कुत्रा एका सश्याच्या मागे धावताना दिसला. कुत्रा सशाचा पाठलाग करीत असताना पुढे धावणारा ससा अचानक थांबला आणि त्याने कुत्र्यावर आक्रमण केले. सशाच्या या पावित्र्याने कुत्रा माघारी पळू लागला आणि ससा त्याचा पाठलाग करु लागला. असे अनोखे दृष्य पाहून मलिकखान एकदम चकीत झाला. त्याने विचार केला की ‘ज्या भूमीमध्ये ससा कुत्र्याला पळवू शकतो ती भूमी निश्चीतपणे शौर्याची भूमी असली पाहीजे.’ या भूमीमध्ये जर आपण वास्तव्य केले तर निश्चितच आपल्या हातून पराक्रम घडेल व आपल्याला उर्जितावस्था प्राप्त होईल. म्हणून मलिकखान याने तेथील वतनदाराला ही घटना सांगून तेथे रहाण्याची परवानगी मागितली. वतनदाराने या गोष्टीला नकार दिला. मलिकखान तडक दिल्लीला गेला. दिल्लीमध्ये त्यावेळी सुलतान घराण्याची सत्ता होती. फिरोजशहा तुघलग हा त्यावेळी सुलतान होता.

या सुलतानाकडून मलिकखान याने थाळनेर व करवंद हे परगणे जहागीर म्हणून मिळवले आणि तो थाळनेरला परतला. थाळनेर ताब्यात घेवून त्याने फारुखी घराण्याची सत्ता तेथे स्थापित केली. इ.स. १३७० मध्ये त्याने सत्ता स्थापन करुन थाळनेर येथे किल्ला बांधला.

तापी नदीच्या काठावर असलेल्या एका लहानश्या टेकडीवजा जागेवर साधारण त्रिकोणी आकाराचा किल्ला बांधण्यात आला. तटबंदी आणि भक्कम बुरुज बांधून हा किल्ला अभेद्य करण्यात आला. एक बाजूने तापीनदी असल्याने ती बाजू अतिशय संरक्षित झाली होती. किल्ल्यामध्ये येण्याचा एक मार्ग असल्यामुळे त्याबाजूला दरवाजा बांधलेला होता. तो आता काळाच्या ओघात नष्ट झाला आहे. तापी नदीचे पाणी किल्ल्याच्या पायथ्याला धडकून ते पश्चिमेकडे वळण घेते. या पाण्याने संबध टेकडी हळूहळू कापून काढल्यामुळे या बाजूची संपुर्ण तटबंदी ढासळली आहे. किल्ल्यामध्ये झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे जपूनच फिरावे लागते. एकेकाळी अत्यंत समृद्ध आणि बलदंड असलेला थाळनेरचा किल्ला आज मात्र दुर्लक्षीत झाल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर येवून पोहोचला आहे.

थाळनेरच्या किल्ल्यावर सुरवातीला फारुखी घराण्याची सत्ता होती. इ.स.१६०० मध्ये मोगल बादशहा अकबर याने बहादूरशहा फारुखी याचा पराभव करुन थाळनेरवर कब्जा मिळवला.

मोगलांकडुन हा किल्ला पुढे मराठ्यांच्या ताब्यात आला. निंबाळकरांच्या कडून थाळनेर हा होळकरांकडे गेला. थॉमस हिस्लॉप याने इ.स. १८१८ मध्ये तो इंग्रजी अंमलाखाली आणला. पण इंंग्रजांना मात्र प्रखर झुंज द्यावी लागली. यात मराठ्यांचे २५ ते ३० लोक ठार झाले. इंग्रजांचे २५ लोक मारले गेले यात त्यांचे सात अधिकारीही कामी आले.

Leave a Comment