हर्षगड

नाशिक जिल्हा गिरीदुर्गासाठी अतिशय समृद्ध आहे. सिलबारी, डोलबारी, सातमाळा आणि त्रंबकरांग या जिल्ह्यात आहे. हर्षगड उर्फ हरिषगड अशा नावानी ओळखला जाणारा हा दुर्गम किल्ला त्रंबक रांगेत आहे. नाशिक पुर्वेला असलेल्या त्रंबकेश्वराच्या प्रसिद्ध मंदिरामुळे आणि गोदावरी या नदीच्या उगमस्थानामुळे हा परिसर धार्मिक दृष्टीनेही प्रसिद्ध पावलेला आहे.

पुर्वपश्चिम पसरलेली त्रंबकरांग भास्करगडापासून सुरु होवून हर्षगड, त्रंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी असे किल्ले आपल्या कवेत घेवून धावते.

भास्करगडाच्या पुर्वेला आणि त्रंबकगडाच्या पश्चिमेला हर्षगड आपला कातळमाथा उंचावून उभा आहे. हर्षगडाला जाण्यासाठी दोन चार मार्ग हे ट्रेकिंगच्या दृष्टीने उत्तम आहेत. पण किल्ला चढायचा असेल तर पायथ्याचे गाव गाठणेच सोयीचे आहे. हर्षगडाच्या दक्षिण पायथ्याला टाकेहर्ष म्हणून लहानसे गाव आहे. येथून तासाभरात आपण हर्षगडाचा पायथा गाठू शकतो. तसेच उत्तर बाजुला असलेल्या जांभुळपाडा या गावाकडूनही भास्करगडाच्या खिंडीत येवून भुंडी, फणी, असे डोंगर ओलांडून आपण हर्षगड गाठू शकतो. मात्र जांभुळपाडा गाठण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागतो हे लक्षात असू द्यावे.

हर्षगडाचा उभा असलेला कातळमाथा लक्षवेधी असला तरी त्याच्या चहुअंगाचे सरळसोट कडे मात्र आपल्याला धडकी भरवतात. गडावर चढण्यासाठी उत्तरबाजु कडून वाट आहे ही एकमेव वाट पायर्‍यांची आहे. उभ्या कातळात या पायर्‍या कोरुन काढलेल्या असल्याने दमछाक करणार्‍या आहेत. टाकेहर्षकडून तासादीडतासातआपण येथ पर्यंत पोहचू शकतो.

टाकेहर्ष हे गाव नाशिक ते खोडाळा या गाडीरस्त्यावर आहे. नाशिक कडून येताना अंजनेरीचा किल्ला ओलांडल्यावर डावीकडे इगतपुरीकडे जाणारा फाटा आहे. या फाटय़ावरुन पुढे निघाल्यावर इगतपुरीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे वळाल्यावर आपण खोडाळाच्या दिशेने जावू लागतो. या वाटेवर आखलीहर्ष, टाकेहर्ष अशी गावे लागतात. ठाण्याकडून येताना कसारा घाटाच्या सुरवातीलाच खोडाळा तसेच जव्हारकडे जाणारा गाडीमार्ग आहे. येथून खोडाळा कडूनही आपण टाकेहर्ष गाठू शकतो.

टाकेहर्ष कडून साधारण चारपाच तासांचा अवधी हाताशी ठेवून सोबत पाणी आणि खाण्याचे साहित्य घेवून हर्षगडाकडे प्रयाण करावे.

हर्षगडाच्या नावात जरी हर्ष असला तरी पायर्‍या चढताना मात्र तो हर्ष मावळतो. जसजश्या पायर्‍यांनी आपण वर चढतो तस तसा विस्तृत प्रदेश दिसासला लागतो. पायर्‍यांच्या माथ्यावर प्रवेशद्वार आहे. एवढे प्रवेशद्वार अडवले की हा किल्ला शत्रुला जिंकणे कठीणच आहे.

गडाचा माथा लहान व लांबोळका आहे. चारही बाजुने ताशीव कडे असल्यामुळे तटबंदीची आवश्यकता नव्हती. पाण्याची टाकी, घरांची जोती, दारु कोठार अशा गडपणाचा खुणा किल्ल्यावर पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरुन भास्कर, उतवड, भुंडी, फणी, वाघेरा, त्रंबकगड, अंजनेरी तसेच स्वच्छ वातावरण असल्यास सिद्धगड आणि माहूलीची रांगही दिसते.

या किल्ल्याचे नाव हर्षगड का पडले ? याची एक कथा या भागात प्रसिद्ध आहे. हर्षगड उर्फ हरिहरगड हा मराठय़ांच्या ताब्यात होता तेव्हाचीही कथा एकदा मोघलांच्या एका सरदाराने किल्ल्याला वेढा घातला. किल्ला दुर्गम असल्यामुळे तो मोघलांना जिंकता येईना. गडावर फक्त पन्नास-साठ लोकांचीच शिबंदी होती. ती शिबंदी बाहेरुन होणार्‍या मदतीच्या प्रतिक्षेत होती. तर मोगल सरदार किल्ल्याची रसद रोखण्यावर भर देत होता. किल्ल्याची कोंडी केली तर मराठय़ांना अन्नपाण्याचा तुटवडा जाणवेल आणि त्यांना गड सोडावा लागेल अशी योजना आखून गडाचा वेढा आवळला होता.

महिन्या दोन महिन्यात बाहेरुन मदत आली नाही. येण्याची काही आशाही दिसत नव्हती. रसदीशिवाय परिस्थिती बिकट होत आली होती. गडावर एक म्हातारी होती. तिने वेढा उठवण्यासाठी एक युक्ती केली. गडावरील शिबंदीची जेवण उरकल्यावर खरकाटय़ा पत्रवळ्या गोळा केल्या. त्याबरोबर शेकडो पत्रावळ्या मिसळून त्याही खरकाटय़ा केल्या. गडावर तोफांचे बार काढण्यात आले. नगारे कर्णे वाजवण्यात आले. गडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे गडाखाली गोळा झालेले मोघल चकीत झाले. ते वर पाहू लागले. म्हातारीने कडय़ावरुन नेहमीप्रमाणे पत्रावळ्या खाली टाकण्यास सुरवात केली. मोघलांनी विचार केला की रोज पन्नाससाठ पत्रावळ्या खाली पडतात म्हणजे गडावर पन्नास एक लोक असावेत पण आज दोन अडीचशे पत्रावळ्या खाली पडल्या म्हणजे मराठय़ांना गडावर रसद आणि सैन्याची जादा कुमक मिळाली असावी म्हणूनच गडावर आनंदोत्सव साजरा होतोय. म्हणजे आता गड जिंकणे अवघडच की? मोघल सरदार वेढा उठवून चालता झाला. म्हातारीच्या युक्तीने वेढा उठल्याचा सर्वांना हर्ष झाला म्हणून गडाचे नाव हर्षगड असे झाले. म्हतारीच्या युक्तीची गंमत आपल्यालाही हर्षेउल्हासीत करते आणि त्याच आनंदात आपण परतीच्या मार्गावर चालू लागतो.