हरिश्चंद्रगड


स्थान

हा किल्ला पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे.

भौगोलिक माहिती

पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.

पौराणिक महत्व

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे.खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.

कल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होवू शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.

किल्ल्याबद्दल

हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा होय.

रस्त्यातील व्याघ्रशिल्प

पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेवून जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.

येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.

पाहण्यासारखी ठिकाणेयेथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.

हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.

गणपती,हरिश्चंद्रेश्वर मंदिरमंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.


कोंकणकडा

हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याण पर्यंतचा प्रदेश दिसतो.

हरिश्चंद्रगडावरुन शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरख, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.

गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.

ऐतिहासिक महत्व

महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.